Thursday, 17 January 2019


काल बऱ्याच वर्षांनी.. सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडताना मला पाहायला आणि ऐकायला मिळत होता. हे सगळं काही, नेहमीप्रमाणे सिनेमातील कोण्या मादक लावण्यवतीला पाहून घडत नव्हतं. तर प्रेक्षकांकडून हे एवढं भरभरून प्रेम दिलं जात होतं, ते आपल्या भारतीय जवानांना, आणि इंडियन आर्मीला..
१८ सप्टेंबर २०१६ रोजी, जम्मू आणि काश्मीर येथील उरी सेक्टरमध्ये, एल.ओ.सी. शेजारी असणाऱ्या भारतीय सेनेच्या मुख्यालयावर भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये आपले अठरा जवान शहीद झाले होते. या कारवाईत प्रत्युत्तरा दाखल भारतीय सेनेकडून चार आतंकवादी मारले गेले होते. असं सांगितलं जातं, कि..गेल्या वीस वर्षात भारतीय सेनेवर झालेला हा सर्वात मोठा आतंकवादी हमला होता.
आपल्या तंबूमध्ये आराम करत असणाऱ्या जवानांवर हा हल्ला झाला होता. यातील जवळपास सगळेच जवान हे गाढ झोपेत होते, अशा अवस्थेत निशस्त्र असताना आपल्या जवानांवर हा क्रूर हल्ला झाला होता. ज्यामध्ये भारतीय जवानांचा हकनाक बळी गेला होता.
या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून..अवघ्या दहाच दिवसात, २९ सप्टेंबर २०१६ रोजी इंडियन आर्मी, आणि भारतीय गुप्तचर विभागाणे मिळून संयुक्तरित्या हि सर्जिकल स्ट्राईक नामक कारवाई पार पाडली होती. यामध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीर भागातील आतंकवादी गट असणाऱ्या ठिकाणांवर घातक कारवाई करण्यात आली होती. सर्जिकल स्ट्राईक हा शब्द उच्चारायला जरी सोपा वाटत असला, तरी प्रत्यक्षात ते कार्य खूपच कठीण होतं. हे सिनेमा पाहताना आपल्या ध्यानात येतं. अनधिकृतपणे परकीय मुलखात जाऊन, अंधाऱ्या रात्री तेथील सात आतंकवादी अड्डे उध्वस्त करून, जवळपास अडोतीस आतंकवाद्यांचा खातमा करून, आपले सगळे भारतीय जवान सुखरूपपणे मायदेशी परत आले होते. सिनेमात हा सगळा थरार पाहत असताना, आपण अगदी सुन्न होऊन जातो, अंगावर रोमांच उभे राहतात. तर मग त्यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती असेल.? याची कल्पनाच केलेली बरी.
भारतीय जवान आणि अधिकारी काय आहेत, आणि कसे आहेत.?
हे समजून घेण्याकरिता प्रत्येक भारतीय नागरिकाने हा सिनेमा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जवानावर तोंडसुख घेणाऱ्या नालायक व्यक्तींनी तर हा सिनेमा आवर्जून पहावा. त्यावेळी भारतीय जवानांविषयी घृणास्पद वक्तव्य करताना, त्या महाभागांची जीभ कशी झडली नसेल.? किंवा राजकीय खेळ्या खेळू पाहणाऱ्यांनी, सर्जिकल स्ट्राईक हा एक बनाव होता. असं वक्तव्य करताना, त्यांना काहीच वाटलं नसेल का.? असं वक्तव्य करणं म्हणजे, आपल्या सेनेचा आणि जवानांचा आपण अपमान करत आहोत असं सुद्धा त्यांना वाटलं नसेल का.?
थंडी गारठ्यात, आपण आपल्या घरात बायका पोरांच्या कुशीत आरामात झोप घेत असताना, सीमेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत असतात. याची थोडी तरी जान आपल्याला असायला हवी. भारतीय सेना आणि जवान यांच्या सन्माना प्रीत्यर्थ हा सिनेमा प्रत्येकाने नक्कीच पाहायला हवा. सरकार नेमकं काय करतंय, किंवा आपली सेना काय करतेय. हे येवढ्या मोठ्या पडद्यावर आजवर आपल्याला कधीही दाखवलं गेलं नव्हतं. ते सगळं काही, आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
विकी कौशलने खरोखर त्याचं सगळं कौशल्य या सिनेमात पणाला लावलं आहे. हा सिनेमा पाहताना, आपली छाती अभिमानाने फुलून येते. आपल्या जवानांचा पराक्रम पाहून उर भरून येतो, तर काही गंभीर प्रसंग पाहताना, नकळत आपल्या डोळ्याच्या कडा सुद्धा ओलावून जातात. सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम, मोहित रैना, रजत कपूर.. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. योगेश सोमण डिट्टो पर्रीकर यांच्या सारखे दिसत आहेत. लेखक निर्देशक आदित्य धर, निर्माता रोनी स्क्रीववाला आणि शाश्वत सचदेव यांच्या संगीताने या सिनेमाला अगदी चारचांद लावले आहेत.
हा सिनेमा चुकुनही चुकवू नका मित्रांनो. काल पाहून आलोय, तरी सुद्धा आज सगळी फॅमिली घेऊन पुन्हा निघालोय..!!


Monday, 7 January 2019


माझी छोटी चारधाम यात्रा तर पूर्ण झाली..
आता.. मला मोठा चारधाम पूर्ण करायचा आहे. मोठा चारधाम म्हणजे.. बद्रीनाथ, द्वारकानाथ, जगन्नाथ आणि रामनाथ म्हणजेच रामेश्वरम.
मोठ्या चारधामांपैकी माझं पूर्वी बद्रीनाथ धाम झालं होतं. आणि हल्लीच.. ओडिशा भूमीतील, जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ धाम येथे मी माथा टेकून आलो. माझी अजून.. दोन धामांची यात्रा करणं राहून गेलं आहे. लवकरच तेथे जाण्याचा मला योग यावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..
पुण्याहून सायंकाळी सात वाजताच्या कोणार्क एक्सप्रेसने आम्ही भुवनेश्वर येथे निघालो. दुसरा दिवस आणि रात्रभर प्रवास केल्यावर, पहाटे पाच वाजता आम्ही भुवनेश्वर येथे पोहोचलो. रेल्वेने हा चौतीस तासांचा असा बराच मोठा प्रवास आहे. तुम्ही विमानाने सुद्धा येथे जाऊ शकता. पुणे-कलकत्ता व्हाया भुवनेश्वर अशा विमानाची सुद्धा सोय आहे.
भुवनेश्वर ते ( जगन्नाथ ) पुरी हे साधारण साठ किलोमीटरचं अंतर आहे. सकाळच्या वेळी, बसने हे अंतर अगदी दीड तासात पूर्ण केलं जातं.
आमचं पूर्वनियोजित बुकिंग असल्याने, आम्ही पुरी येथील आमच्या रूमवर गेलो. रेल्वेत झोप पूर्ण झाली असल्याने, लगोलग आम्ही अंघोळी उरकल्या आणि सकाळी नऊ वाजता मंदिराच्या दिशेने चालते झालो. आमच्या लॉज पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर जगन्नाथाचं अतिशय देखणं असं मंदिर होतं.
मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही एखाद्या गाईडला नक्की घेऊन जा. म्हणजे तो गाईड आपल्याला सगळी माहिती तर पुरवतोच, आणि सोबतच छोट्या खाणाखुणा सहित मंदिर सुद्धा फिरवतो.
मंदिरात पारंपारिक वेश घालून जाण्याचं बंधन नाहीये. फक्त मंदिरात जाताना आपल्याला मोबाईल घेऊन जाता येत नाही. आणि इथे फक्त भारतीय व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. विदेशी नागरिकांना मंदिरात सोडलं जात नाही. इस्कॉन पंथाची स्थापना पुरी येथे झाली असल्याने, येथे हजारो विदेशी भक्त येत असतात. पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
पुरी मध्ये इस्कॉनचं एक मोठं मंदिर सुद्धा आहे, इस्कॉनचे जवळपास सगळे अनुयायी त्या मंदिरातच उतरत असतात. तिथे त्यांची सगळी सोय केली जाते.
जगन्नाथाचं मंदिर फार पुरातन आणि भव्य असल्याने, या मंदिराच्या भेटीकरिता एक दिवस तुम्ही राखूनच ठेवा. सगळं मंदिर शांत आणि निवांतपणे पाहायला तीनेक तास तरी नक्कीच लागतात. सुरवातीला आपल्याला मंदिराच्या भटारखान्याच्या परिसारत नेलं जातं. असं म्हणतात, कि जगभरातील हा सर्वात मोठा आणि जुना भटारखाना आहे. आजही इथे चुलीवर बनवलेल्या प्रसादालाच महत्व दिलं जातं. भटारखाना बंधिस्त असल्याने आपल्याला तो बाहेरुनच पहावा लागतो. भटारखाना मोठा जरी असला, तरी येथील स्वच्छता मात्र माझ्या मनाला फार खटकली. मंदिरात स्वयपाक बनवणारे जवळपास सगळेच आचारी तोंडात पानाचा तोबरा भरून काम करत होते. तिथे आसपासच्या भागात असणाऱ्या नाल्यामध्ये ते पानाची पिंक थूकत होते. हे दृश्य माझ्या मनाला काही पटलं नाही.
मंदिरात सगळा प्रसाद हा मातीच्या भांड्यात बनवला जातो. त्याकरिता देवस्थानाने मातीचे भांडे बनवण्यासाठी हजारो कुंभार कामाला ठेवले आहेत. सोबतच आठशे ते हजार आचारी प्रसाद बनवण्यासाठी येथे चोवीस तास झटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मातीच्या हंडीमध्ये बनणारा प्रत्येक प्रसाद ( इथे रोजच्याला छप्पन भोग बनवले जातात. ) कावडीच्या सहाय्याने मंदिरात नेला जातो. आणि त्याचा जगन्नाथाला नैवेद्य दाखवूनच तो बाहेर आणला जातो. प्रसाद घेऊन नैवद्य दाखवायला जाणाऱ्या व्यक्तीच्या नाकाला आणि तोंडाला विशिष्ट प्रकारच्या मुसक्या बांधलेल्या असतात. जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा त्या प्रसादाचा गंध येऊ नये, आणि त्यामुळे तो भोग उष्टा होऊ नये. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हि रीत अगदी पूर्वापार चालत आली आहे. त्यानंतर हा भोग, प्रसाद म्हणून विक्रीसाठी उपलब्ध केला जातो.
मंदिरामध्ये दैनंदिन नियमानुसार जगन्नाथाला वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद अर्पण केला जातो. हे प्रसाद दोन प्रकारचे असतात, देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याला प्रसाद म्हंटलं जातं. महाप्रसाद हा एक तांत्रिक शब्द आहे. त्यास.. निर्माल्य, कैवल्य वगैरे म्हंटल जातं.
जगन्नाथास अर्पित वस्तूला, विसर्जना अगोदर नैवेद्य आणि विसर्जना नंतर निर्माल्य म्हंटल जातं. पण ज्यास मनोभावे खाल्लं जातं, त्यास कैवल्य म्हंटल जातं. कैवल्य आणि महाप्रसादात एकच फरक आहे. कैवल्य हा थोडाच खाल्ला जाणारा प्रसाद असतो. तर महाप्रसाद हा पोटभर खाल्ला जातो.
जगन्नाथ मंदिर फारच भव्य आणि आकर्षक आहे. पण मंदिराचा गाभारा म्हणावा इतका मोठा नाहीये. त्यामुळे मंदिरात दर्शनाला जाताना फारच दाटी होते. किंवा भावीकांना झुंडीने सोडल्याने आतमध्ये फार गर्दी होत असते. मंदिरामध्ये श्री बळभद्र, ( बलराम ) श्री जगन्नाथ, आणि श्री. सुभद्रा या बहिण भावाच्या तीन मुर्त्या स्थानापन्न आहेत.
त्या अवाढव्य मंदिरात गर्दीचा लोंढा पुढे सारत मी त्या महा मुर्त्यांपाशी पोहोचलो. मनोभावे जगन्नाथाला बलरामाला आणि माता सुभद्रेला प्रणाम केला. आणि गर्दीच्या महापुरात, पुढे लोटला जाऊन, मी आपोआप मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलो.
माझ्याकडे बराच वेळ असल्याने, एका तासात मी अगदी मनोभावे आणि मनभरून अशी तीन दर्शनं करून घेतली. आणि मनापासून तृप्त झालो.
मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा सगळे पुजारी तोंडात पानाचा तोबरा भरूनच उभे होते. दान, दक्षिणेसाठी हातामध्ये आरतीची थाळी घेऊन प्रत्येकाची अगदी चढाओढ चालू होती. तर काही पुजारी, नारळाच्या पानापासून बनवलेल्या खोक्यातून खाजा नामक गोड प्रसाद विक्रीसाठी एकच गलका करत होते. तर काही पुजारी.. छोट्या-छोट्या माठामध्ये मंदिरात उपलब्ध झालेला मलई आणि लोण्याचा प्रसाद सुद्धा विकताना आढळत होते. अवीट गोडीचे हे दोन्ही प्रसाद मी खरेदी केले, आणि आप्तेष्टांसोबत त्याचा लाभ घेतला.
तेथून बाहेर पडत, आमच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली सगळं मंदिर माहितीसहित आम्ही फिरून घेतलं. आणि मंदिराच्या बाहेर पडलो..!
युट्युब सारख्या माध्यमातून, या मंदिराबाबत बर्याच अनाठायी अफवा पसरवल्या जात आहेत. अशाने बरीच धार्मिक मंडळी याठिकाणी जाण्यासाठी आकर्षित नक्की होतील. पण त्यामुळे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, अशा अफवा वेळीच थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे.
१ ) मंदिरात पक्षी येत नाहीत, किंवा त्या आसपासच्या भागात ते भटकत नाही.
पण असं काहीएक नाहीये, त्या मंदिरात मी बरेच पारवे उडताना किंवा बसलेले पाहिले आहेत.

२ ) मंदिरावर असणारा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो..
हे सुद्धा अत्यंत चुकीचं विधान आहे. मंदिरावरील ध्वज हवेच्या दिशेनेच फिरत असतो. हे मी माझ्या डोळ्याने पाहून आलो आहे.

३ ) मंदिरावरील ध्वज लावणारा व्यक्ती मंदिराच्या कळसा पर्यंत उलटा चढत जातो.
हे विधान सुद्धा तद्दन खोटं आहे, युट्युबवर तुम्ही हा विडीयो पाहू शकता. ज्यात व्यक्ती सरळ चढताना दिसत आहे.

४ ) मंदिराच्या सिंह द्वारात उभे असताना समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. आणि आतमध्ये गेल्यावर लाटांचा आवाज ऐकू येत नाही.
दिवसभर मंदिर परिसारत बराच गोंगाट चालू असतो, शिवाय मंदिरापासून समुद्र एक किलोमीटरभर दूर अंतरावर आहे. त्यामुळे किमान मला तरी दिवसा याची अनुभूती घेता आली नाही. त्याकरिता रात्री सगळी सामसूम झाल्यावर, वरील विषयाची अनुभूती घ्यावी लागेल, आणि कदाचित यात तथ्य सुद्धा असू शकेल.

( टीप :- इथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी, मंदिर परिसारत असणाऱ्या मिश्रा नामक पुजारी यांना गाईड म्हणून घेऊन जावा. ते सगळी माहिती अगदी योग्यप्रकारे सांगतात. )

बोलो जगन्नाथ भगवान कि जय..!!