Thursday, 17 January 2019


काल बऱ्याच वर्षांनी.. सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडताना मला पाहायला आणि ऐकायला मिळत होता. हे सगळं काही, नेहमीप्रमाणे सिनेमातील कोण्या मादक लावण्यवतीला पाहून घडत नव्हतं. तर प्रेक्षकांकडून हे एवढं भरभरून प्रेम दिलं जात होतं, ते आपल्या भारतीय जवानांना, आणि इंडियन आर्मीला..
१८ सप्टेंबर २०१६ रोजी, जम्मू आणि काश्मीर येथील उरी सेक्टरमध्ये, एल.ओ.सी. शेजारी असणाऱ्या भारतीय सेनेच्या मुख्यालयावर भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये आपले अठरा जवान शहीद झाले होते. या कारवाईत प्रत्युत्तरा दाखल भारतीय सेनेकडून चार आतंकवादी मारले गेले होते. असं सांगितलं जातं, कि..गेल्या वीस वर्षात भारतीय सेनेवर झालेला हा सर्वात मोठा आतंकवादी हमला होता.
आपल्या तंबूमध्ये आराम करत असणाऱ्या जवानांवर हा हल्ला झाला होता. यातील जवळपास सगळेच जवान हे गाढ झोपेत होते, अशा अवस्थेत निशस्त्र असताना आपल्या जवानांवर हा क्रूर हल्ला झाला होता. ज्यामध्ये भारतीय जवानांचा हकनाक बळी गेला होता.
या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून..अवघ्या दहाच दिवसात, २९ सप्टेंबर २०१६ रोजी इंडियन आर्मी, आणि भारतीय गुप्तचर विभागाणे मिळून संयुक्तरित्या हि सर्जिकल स्ट्राईक नामक कारवाई पार पाडली होती. यामध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीर भागातील आतंकवादी गट असणाऱ्या ठिकाणांवर घातक कारवाई करण्यात आली होती. सर्जिकल स्ट्राईक हा शब्द उच्चारायला जरी सोपा वाटत असला, तरी प्रत्यक्षात ते कार्य खूपच कठीण होतं. हे सिनेमा पाहताना आपल्या ध्यानात येतं. अनधिकृतपणे परकीय मुलखात जाऊन, अंधाऱ्या रात्री तेथील सात आतंकवादी अड्डे उध्वस्त करून, जवळपास अडोतीस आतंकवाद्यांचा खातमा करून, आपले सगळे भारतीय जवान सुखरूपपणे मायदेशी परत आले होते. सिनेमात हा सगळा थरार पाहत असताना, आपण अगदी सुन्न होऊन जातो, अंगावर रोमांच उभे राहतात. तर मग त्यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती असेल.? याची कल्पनाच केलेली बरी.
भारतीय जवान आणि अधिकारी काय आहेत, आणि कसे आहेत.?
हे समजून घेण्याकरिता प्रत्येक भारतीय नागरिकाने हा सिनेमा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जवानावर तोंडसुख घेणाऱ्या नालायक व्यक्तींनी तर हा सिनेमा आवर्जून पहावा. त्यावेळी भारतीय जवानांविषयी घृणास्पद वक्तव्य करताना, त्या महाभागांची जीभ कशी झडली नसेल.? किंवा राजकीय खेळ्या खेळू पाहणाऱ्यांनी, सर्जिकल स्ट्राईक हा एक बनाव होता. असं वक्तव्य करताना, त्यांना काहीच वाटलं नसेल का.? असं वक्तव्य करणं म्हणजे, आपल्या सेनेचा आणि जवानांचा आपण अपमान करत आहोत असं सुद्धा त्यांना वाटलं नसेल का.?
थंडी गारठ्यात, आपण आपल्या घरात बायका पोरांच्या कुशीत आरामात झोप घेत असताना, सीमेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत असतात. याची थोडी तरी जान आपल्याला असायला हवी. भारतीय सेना आणि जवान यांच्या सन्माना प्रीत्यर्थ हा सिनेमा प्रत्येकाने नक्कीच पाहायला हवा. सरकार नेमकं काय करतंय, किंवा आपली सेना काय करतेय. हे येवढ्या मोठ्या पडद्यावर आजवर आपल्याला कधीही दाखवलं गेलं नव्हतं. ते सगळं काही, आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
विकी कौशलने खरोखर त्याचं सगळं कौशल्य या सिनेमात पणाला लावलं आहे. हा सिनेमा पाहताना, आपली छाती अभिमानाने फुलून येते. आपल्या जवानांचा पराक्रम पाहून उर भरून येतो, तर काही गंभीर प्रसंग पाहताना, नकळत आपल्या डोळ्याच्या कडा सुद्धा ओलावून जातात. सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम, मोहित रैना, रजत कपूर.. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. योगेश सोमण डिट्टो पर्रीकर यांच्या सारखे दिसत आहेत. लेखक निर्देशक आदित्य धर, निर्माता रोनी स्क्रीववाला आणि शाश्वत सचदेव यांच्या संगीताने या सिनेमाला अगदी चारचांद लावले आहेत.
हा सिनेमा चुकुनही चुकवू नका मित्रांनो. काल पाहून आलोय, तरी सुद्धा आज सगळी फॅमिली घेऊन पुन्हा निघालोय..!!


No comments:

Post a Comment