Wednesday, 24 October 2018

 

सकाळच्या शोला सिनेमा पाहायला, खरं तर नाही गेलं पाहिजे..
पण काय करता, सकाळचे शो खिशाला जरा परवडतात. नव्वद रुपयात काम होऊन जातं. नाहीतर, ऐन दुपारी.. सिनेमा तोच असतो, पण सिनेमा पाहायला दोन अडीचशे रुपये खर्च होतो.

आज सोमवार.. आठवड्याचा आणि कॉलेजचा पहिलाच दिवस,

आजच्या शोला, सिनेमा पाहायला खूपच वात्रट मुलं मुली आली होती. मी बसलो होतो, त्याच्या मागील लाईन मध्ये, आठ दहा तरुण मुलं मुली सिनेमा पाहायला बसली होती.
सिनेमा सुरु झाला, तशी त्यांच्या तोंडाची टकळी सुरु झाली. ते सिनेमा संपेपर्यंत, ती काही बंद झाली नाही. त्या मुलांच्या तोंडाला अजिबात दम नव्हता.. सारखं काहीतरी बोलतच होते. तिथे बसलेली एक मुलगी, तिच्या बॉय फ्रेंडला विचारात होती.

तेरे दोस्त को गर्लफ्रेंड नहीये क्या.?

तर मुलगा म्हणत होता.. मिलेगी रे, तू कैसे मेरेको मिली. वैसे उसको भी कोही तो मिल जायेगी..!

फक्त बोलबच्चन मुलं होती..

मध्यंतरात, त्यातील एकानेही आपल्या गर्लफ्रेंडला साधं पॉपकॉर्न सुद्धा खाऊ घातलं नव्हतं.
या मूर्ख मुली अशा नकली मजनू लोकांना फसतात, आणि नंतर..
मी टू च्या भानगडी सुरु होतात.

काय वयं होती त्या पोरांची..सगळे विशीच्या आतील होते. कॉलेज बंक करून सिनेमा पाहायला जायचं. आई वडिलांच्या डोळ्यात धूळ फेकून मौज मज्जा करायची.

सिनेमा सुरु असताना, त्या मुलांची इतकी बडबड चालू होती, कि सांगता सोय नाही. आणि त्यांना कोणी दापत सुद्धा नव्हतं हो. त्यामुळे मी सुद्धा जास्ती इंटरेस्ट घेतला नाही, विनाकारण मी काहीतरी समजवायला जायचो. आणि चुकून त्यांनी चारचौघांत आपला पाणऊतारा केला तर.? आता काही.. आपलं भांडणं करायचं वय राहिलं नाही. नाही म्हणता.. तरी, अजूनही एखाद अर्ध्याला जमिनीवर लोळवायची ताकत आहे आपल्यात. पण नको तिथे श्रम वाया घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. आणि, अशा वातावरणात इच्छा नसताना सुद्धा, तशा गोंधळात.. मी आजचा तो सिनेमा पाहिला.

तुम्हाला खरं सांगतो.. वरील व्यत्यय वगळला तर..

निखळ मनोरंजन करणारा एक अप्रतिम सिनेमा आज मला पाहायला मिळाला. सिनेमात एक फार छान विनोदी अशी मर्डर मिस्ट्री दाखवली आहे. या सिनेमाचं कथानक सांगण्यात काहीच मजा नाहीये. नाहीतर तुमचा सगळा मूड जाईल. पण सिनेमा अगदी झकास आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा एकदा नक्की पहाच.

सिनेमातील सगळं चित्रीकरण हे पुण्यात झालं आहे. त्यात.. प्रभात रोड, मगरपट्टा, खडकी, रेंजहिल्स, होळकर ब्रिज, आणि इतर बर्याच ठिकाणचा समावेश आहे.

सिनेमाचं कथानक एका अंध पियानो वादक व्यक्तीवर साकारलं गेलं आहे. पण मुळात, तो मुलगा अंध नसतो. अंध असण्याचं नाटक करत असतो.
त्याचं असं म्हणणं असतं, कि.. अंध होऊन वावरत असताना आपलं मन शंभर टक्के एकाग्र होतं. आयुष्यमान ( आकाश ) याने अंध तरुणाची भूमिका अगदी हुबेहूब साकारली आहे. तर.. तब्बू आणि राधिका यांनी आपल्या अदाकारीने सगळ्यांचा कलिजा खलास केला आहे.
पण हि अंधाची नकली भूमिका साकारत असताना. आकाशच्या जीवनात एक असा भयानक प्रसंग घडतो. आणि मग, सिनेमाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. आणि झक्कास अशी कलाटणी सुद्धा मिळते. पुढे काय घडतं, ते तुम्ही सिनेमातच पाहा.

खरं तर हा सिनेमा.. दोन हजार दहा साली आलेल्या एका फ्रेंच शोर्ट फिल्मवर आधारित आहे. पण तरीही, सर्व कलावंतांनी या शोर्ट स्टोरीला अगदी बिग स्वरूप मिळवून दिलं आहे. सर्व कलाकारांनी मिळून या सिनेमाला फारच सुंदर न्याय दिला आहे.

सिनेमाची सुरवात आणि शेवट मुळीच चुकवू नका. नाहीतर सिनेमाचा तुम्हाला म्हणावा असा आनंद लुटता येणार नाही.
श्रीराम राघवन दिग्दर्शित हा सिनेमा आहे. सिनेमामध्ये.. तब्बू, आयुष्यमान खुराना आणि राधिका आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. असे सिनेमे नेहेमी नेहेमी येत नसतात. त्यामुळे हा सिनेमा तुमची मुळीच चुकवू नका. अगदी पैसा वसूल असा हा सिनेमा आहे.




एक उत्कृष्ट, पारिवारिक, विनोदी सिनेमा..!
बधाई हो या सिनेमाचं कथानक एका वेगळ्याच विषयावर आधारित आहे. हा एक असा विषय आहे, कि जो सर्वसामन्यांना कधीही पचनी पडणार नाही.
तरुण वयात लग्न झाल्यावर आपल्या संसार वेलीवर कधी एकदा फुलं उमलतायेत असं होतं. काही व्यक्तींना लवकर अपत्य प्राप्ती होते. तर काहींचा पाळणा लांब असतो. तर दुर्दैवाने काहींना विनाआपत्य जीवन कंठावं लागतं. शेवटी हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे.
तर.. लग्न झाल्यावर, अगदी तरुणपणी मुलींना दिवस गेल्यावर.. त्यांच्यावर शुभेच्छांचा अगदी वर्षाव होतो. कारण हि बातमीच फार आनंदाची असते.
पण चुकून, उतार वयात.. म्हणजे, वयाची पन्नाशी गाठल्यावर एखाद्या महिलेला दिवस गेले. तर त्यावेळी आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकेल का.?
उत्तर अर्थातच नाही असं येईल. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ, काळ, मर्यादा या ठरल्या गेल्या आहेत. उतार वयात या गोष्टी कोणालाच शोभा देणार नाहीत. नाही म्हणता, ज्यांना अपत्यच झालं नाहीये. अशा व्यक्तीकरिता ती नक्कीच खुशखबर म्हणता येईल. पण ज्या दाम्पत्याचा तरुण मुलगा, लग्नाच्या वयाचा झाला असेल. आणि चुकून, त्या घरात असा प्रकार घडला तर.?

बधाई हो सिनेमात, नेमकं हेच कथानक दाखवलं गेलं आहे. एक मध्यमवर्गीय सुखवस्तू चौकोनी कुटुंब असतं. घरात वडीलधारी व्यक्ती म्हणून, एक आजीबाई ( दादी ) असते. कुटुंबप्रमुख ( नकुल कौशिक ) रेल्वे मध्ये टीसी म्हणून नोकरीला असतो. तर त्याची धर्मपत्नी ( प्रियंवधा ) हि घरगुती महिला दाखवली आहे. यांचा मोठा मुलगा ( जितु ) एका आयटी कंपनीत कामाला असतो, तर लहान मुलाचं ( गुल्लर ) माध्यमिक शिक्षण चालू असतं. असं एकंदरीत हे सुखवस्तू कुटुंब असतं.

आणि गमती जमतीत.. उतार वयात, प्रियंवधा यांना दिवस जातात. आता घडला प्रकार कोणाला सांगण्यासारखा नसतो. त्यामुळे ते कौशिक दांपत्य अगदी हवालदिल होतं. आणि हि बातमी जेंव्हा त्यांच्या घरात समजते. तेंव्हा त्यांचं सगळं कुटुंब शोकसागरात बुडून जातं.

हे मुल मी पाडणार नाही.. मी याला जन्म देणारच..! या विषयावर नायिका अगदी ठाम असते. तर दुसरीकडे, म्हातारपणी हे कसले चाळे म्हणून.. त्या दांपत्याला आपल्या सासूआई ( सुरेखा सिक्री ) आणि मुलांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. खरं तर हि गोष्ट म्हणावी इतकी सोपी नाहीये. हा प्रसंग ज्याच्यावर गुदरला आहे. त्यालाच त्याचं गांभीर्य समजू शकतं. अशा विषयात महिलांची तर फारच कुचंबणा होऊन जाते. एकीकडे समाजाचा रोष, आणि.. दुसरीकडे म्हातारपण. घडल्या विषयात, पुरुष मात्र अगदी नामानिराळा होऊन जातो.

हा प्रकार घडल्या नंतर.. सगळ्या समाजात हा फार मोठा चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होऊन जातो. सुरवातीला झाल्या विषयाला सासूचा खूप त्रागा असतो. पण ज्यावेळी, त्यांच्या परिवारातील काही महिला या विषयाला धरून, तिला टोचून बोलू लागतात. तेंव्हा तिच्या सासूने तिची खंबीर बाजू घेतलेली दाखवली आहे. इतकंच काय, मोठ्या मुलाची गर्लफ्रेंड ( रेनी ) आणि तिची आई ( संगीता ) सुद्धा या विषयामुळे नाराज असते. कि.. उद्या तुझं लग्न झाल्यावर, त्यांचं होणारं अपत्य तुला सांभाळावं लागेल. या भीतीने त्या मुलीची आई सुद्धा खूप चिंताग्रस्त असते. लहान मुलाच्या शाळेतील मित्र त्याला चिडवत असतात. मोठ्या मुलाचे मित्र देखील त्याला चिडवत असतात. शेजाऱ्यांसाठी तर हा अगदी करमणुकीचा विषय झालेला असतो.

पण सिनेमात थोडेसे चढ उतार आणि काही भावनिक प्रसंग घडत, शेवटी.. या सिनेमाला एक वेगळंच वळण लागतं. घरातील सगळी मंडळी या विषयाला राजी होतात. त्यांच्या हातून नकळत घडलेल्या चुकांचा त्यांना पश्चाताप होतो. आणि म्हातारपणातील हे बाळंतपण सक्सेस होऊन जातं.

हा विषय कठीण जरी वाटत असला, तरी.. सिनेमा पाहताना आपल्याला सुद्धा नकळत वाटून जातं. कि उतारवयात आपल्या सोबत असं काही घडल्यावर किती मजा येईल. पूर्वीच्या काळात असे बरेच किस्से घडले आहेत. परंतु, आजच्या काळात हे विषय कोणाच्याही पचनी पडणार नाहीत. सिनेमात काही ठिकाणी फारच भावनिक प्रसंग दाखवले गेले आहेत. तर काही ठिकाणी विनोदांनी अगदी कोटी केली आहे. काही कौटुंबिक विषय थोडे रटाळवाणे वाटतात. पण सिनेमातील कथानकासाठी ते सीन आवश्यक आहेत.

एक आगळीवेगळी कलाकृती म्हणून हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहायला हवा. अमित शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, प्रमुख भूमिकेत.. अंशुमन खुराना, नीना गुप्ता, सुरेखा सिक्री, शिबा चड्डा, राहुल तिवारी, गजराज राव आणि सान्या मलहोत्रा यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत.