Wednesday, 8 November 2017

काल.. काही कामानिमित्त, मी बँकेत गेलो होतो.
माझ्यापुढे अजून पाच सहा नंबर होते, त्यामुळे मी सुद्धा त्या लाईनीत लोखंडी खुर्चीवर बसून घेतलं. आणि अचानक माझं समोर लक्ष गेलं..
ती बिचारी काही माझ्या ओळखीची नव्हती.. पण दिसायला, ती कमालीची सुंदर होती. खूप आखीव आणि रेखीव चेहेऱ्याची देणगी तिला प्राप्त झाली होती. पण तिच्या गोऱ्यापान चेहेऱ्यावर मला एकप्रकारची गूढ गंभीरता दिसून येत होती.
साधारण.. तीसच्या आसपास तिचं वय असावं, शेलाट्या बांध्याची ती कोवळी पोर, जीवाला घोर लाऊन तिच्या अंगावरचं बरचसं मास ती केंव्हाच गमावून बसली होती. हे तिला पाहताक्षणीच मला समजून आलं.
गोरा वर्ण, तारुण्यपिटिका रहीत निथळ चेहरा, क्लिपमध्ये हळुवार बांधून घेतलेला केशसंभार, चापून चोपून नेसेलेली अबोली रंगाची साडी, धीरगंभीर पण अगदी शून्यात असणारी तिची नजर.
पण तिच्या चेहेऱ्यावर मला खूपच तणाव दिसत होता. बहुतेक, ती कोणत्यातरी चिंतेने ग्रासली गेली असावी. हे तिच्या डोळ्या खाली असणारे काळे वर्तुळं मला सांगत होते.
मी विचारात बुडालो.. येवढ्या सुंदर विवाहित मुलीला नेमकं कसलं दुखः असेल..? ओळख ना पाळख, आपण तरी तिला कसं विचारणार. तितक्यात मागील लोकांनी मला आवाज दिला.
ओ भाऊ.. जागा मोकळी झाली, जरा पुढे सरका..!
मी त्या बसलेल्या लाईनीतून सरकतच पुढील खुर्चीवर गेलो. आणि काहीच क्षणात, मी वरील प्रसंग विसरून सुद्धा गेलो. माझा नंबर आला, खिडकीत जाऊन मी चेक भरला. आणि माझं बँक पुस्तक सुद्धा एंट्री करून घेतलं. माझं काम उरकलं होतं.. मी जिना उतरून खाली आलो. बाईकला किक मारली आणि घरी निघालो.
रस्त्यावर थोडी वर्दळ होती. त्यामुळे माझ्या बाईकचा वेग अगदीच जेमतेम होता.
आणि समोरच.. ती मगाशी बँकेत दिसलेली विवाहित मुलगी रस्त्यावरून पुढे जात असताना. पाठमोरी आणि ओझरती अशी मला दिसली. तिच्या मागोमाग, एक पाऊन मागे चालत. एक कृश मुलगा सुद्धा, अगदी तिला चिटकून चालत होता. तो तिच्या मागील बाजूस, हाताच्या कोपराला बोटांनी स्पर्श करून तिच्याशी काहीतरी बोलत होता. पण ती बिचारी, कर्णबधिर झाल्यासारखी अगदी निर्विकारपणे पुढे निघाली होती. ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. आपल्याच धुनकीत यंत्रवत अशी ती तशीच पुढे निघाली होती.
थोडासा पुढे होत, मी त्या दोघांच्या अगदी शेजारी आलो. आणि, त्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेलं एक निसटतं वाक्य, माझ्या कानाला शिवून गेलं.
फक्त, पन्नास दे ना..!
बहुतेक ती मुलगी, बँकेतून पैसे काढून आली असावी. पण त्या मुलीचं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. ती बिचारी न ऐकल्या सारखं करत पुढेच निघाली होती. आणि.. आता, पुढेच निघून जायचं आहे म्हणून. एकवार मागे वळून मी त्या मुलाकडे पाहिलं.
अरे बापरे.. तो माझ्या अगदी जवळच्या ओळखीतला मुलगा होता. चांगल्या खात्यापित्या घरचा, लाडात वाढलेला मुलगा. पण दारूच्या व्यसनाने त्याला पुरता पोखरून टाकला होता. दारू पिऊन त्याचा सुजलेला चेहेरा एका क्षणात मला सगळं काही सांगून गेला. आणि नकळत माझं मन, भूतकाळात गेलं.
एकेकाळी हाच मुलगा, दिवाळीत लाखो रुपयाचे फटाके वाजवायचा. खूप शौकीन, त्याचं लग्न सुद्धा अगदी धुमधडाक्यात झालं होतं. नकळतपणे, त्याच्या लग्नाची वरात सुद्धा माझ्या नजरेसमोरून तरळून गेली. आणि दहा वर्षांपूर्वीचा त्या गोबऱ्या आणि सुंदर नवऱ्या मुलीचा चेहेरा सुद्धा माझ्या स्मरणात आला. त्या लग्नाच्या वरातीती, या उभयतांना पाहून पुढे चालून मला आजचा हा वाईट प्रसंग पाहायला मिळेल, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. खरच, दारूचं अती व्यसन फारच वाईट.
काय पाहून एखाद्या मुलाला आपल्या पोटची मुलगी दिली जाते..? हा प्रश्न जर कोणाला विचारला गेला, तर याचं उत्तर काहीच नाही असं यायला हवंय..!
पण त्यावेळी, तिच्या घरच्यांनी त्यांचा वर्तमान पाहिलेला असतो. घरातील डामडौल पाहिलेला असतो. त्या मुलाचं उंची राहणीमान पाहिलेलं असतं. आणि समोर दिसणाऱ्या या एकाच आणि तितक्याच फसव्या विषयावर, आपल्या पोटचा गोळा त्यांच्या स्वाधीन केलेला असतो.
खरच राव.. मुलींचं नशीब फारच वाईट. नवरा चांगला मिळाला नाही. कि बिचारीला जन्मभर कुढत राहावं लागतं. लोकाचं लेकरू आपण घरात घेऊन येतो. त्यावेळी, तिला अगदी सुखात आणि आनंदात ठेवायची सर्व जबाबदारी आपली असते. ती फक्त आपल्याला पाहून, आपल्यावर एक अंधविश्वास ठेऊन, माहेरातील सर्वस्व सोडून सासरी निघून आलेली असते. का म्हणून तिला आपण, या हालापेष्टा भोगायला लावायच्या..?
तिने आपल्याशी लग्नं केलं, यात तिची काही चूक असते का..?
स्वतःच्या बायकोला असे दिवस वाईट दाखवणाऱ्याला, कोणीच आणि कधीच माफ करू शकणार नाही. अशी वागणूक देऊन, काही लोकं बायको नावाच्या स्त्रीचं जीवन अगदी नर्क करून टाकतात.
सगळी व्यसनं हि आपल्याठीच बनवली गेली आहेत. पण तुम्ही तिच्या इतकंही आहारी जाऊ नका. कि आपल्यावर विसंबून असणारं, एक परक्याचं गरीब लेकरू आपलं सर्वस्व गमावून बसेल. त्यामुळे, अशा घटना पाहिल्यावर कधीकधी तर मला असं सुद्धा वाटतं. कि,
मुलींसाठी, लग्न म्हणजे एक प्रकारचा " जुगारच " आहे..!

Monday, 6 November 2017

पूर्वी.. मी ज्या ठिकाणी, भाड्याच्या फ्ल्याटमध्ये राहायचो.
तिथे.. आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला होतं. त्या घरात, एक मुलगी तिच्या चुलत्याकडे आश्रित म्हणून राहायला होती. बिचारीच्या डोक्यावरून लहानपणीच तिच्या आईचं छत्र हरपलं होतं. मुलीला सावत्र आई नको, म्हणून.. तिच्या वडिलांनी पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे, हि मुलगी तिच्या चुलत्याच्या घरातच लहानाची मोठी झाली.
त्या घरात मी तिला जेंव्हा कधी पाहिलं, तेंव्हा ती बिचारी काहीतरी कामातच असायची. सतत काहीना काही घरकाम करतच असायची. दिसायला सुंदर, आणि हसमुख चेहेर्याची ती मुलगी मला फार आवडायची. बिन आईची पोर.. त्यामुळे, माझी बायको सुद्धा तिला फार जीव लावायची.
एके दिवशी.. माझ्या बायकोने मला सांगितलं, कि राणीचं लग्न ठरलं आहे.
कोण जाने का, पण त्यावेळी मला सुद्धा फार आनंद झाला. मनात वाटत होतं, तिला एखादं चांगलं स्थळ मिळावं. मुलगी चांगल्या खात्यापित्या घरात गेली, तर तिच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. यथावकाश तिचं लग्न झालं, आम्ही उभयता त्या लग्नाला जाऊ शकलो नाही. कारण ते लग्न महाराष्ट्राच्या बाहेर होतं. त्यामुळे, आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही तिला इथेच आहेर केला. आणि, आम्ही आमच्या सामाजिक कर्तव्यातून मुक्त झालो.
त्यानंतर.. मध्यंतरी दोनचार वर्ष आमचा आणि तिचा काहीच संपर्क नव्हता.
पण हल्लीच, ती माझ्या बायकोला एका दवाखान्यात भेटली होती. तिचा नवरा खूप आजारी होता. हिमाचलप्रदेश वरून, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हल्लीच ते कुटुंब पुण्यात आलं होतं.
तिच्या नवरोबाने.. अवघ्या चार वर्षातच, दोन मुलांचं ओझं तिच्या गळ्यामध्ये अडकवलं होतं.
एका खाजगी कंपनीत, तिचा नवरा वेल्डर म्हणून कामाला आहे. तिच्या नवऱ्याला, महिन्याला अवघा सात हजार रुपये पगार आहे. आणि त्यात, त्यांच्या घराचं भाडं चार हजार रुपये.
खायचं काय आणि ठेवायचं काय..? हा फार मोठा प्रश्न, त्यांच्यासमोर.. आ वासून बसला आहे.
काही लोकांचं आयुष्य फारच खडतर असतं हो. इतकं खडतर, कि आपन त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि त्यात, हि मुलगी तर सुरवातीपासूनच खूप खडतर जीवन जगत आहे.
काल संध्याकाळी, अचानक ती मुलगी आमच्या घरी आली.
एक मुल तिच्या काखेवर, आणि एक हातामध्ये. फारच दमून भागून ती आली होती. तिच्या चेहेऱ्यावर फारच तणाव दिसत होता. एकतर ती मुलगी खूप लाजरी, मी घरात आहे हे पाहून. ती आमच्या घरातच यायला तयार नाही. घराबाहेर उभी असलेली राणी, डोळ्यात आसवं आणत, माझ्या बायकोला म्हणाली..
आंटी.. मेरा बच्चा बहोत बिमार है, दवाखाने जाणा है. प्लीज मुझे साठ रुपये दिजीये..!
खरच.. जो माणूस मनापासून याचना करत खरं बोलत असतो. तो आपल्याला, त्याला हवी तितकी आणि नेमकीच रक्कम मागत असतो. त्याउपर, जास्तीचा एक रुपया सुद्धा तो आपल्याला मागत नसतो. जमल्यास कधी पडताळून पाहा. खरं तर, त्याची नड त्याला समजलेलीच नसते. कारण, कितीही केलं तरी, शेवटी तो याचक असतो ना..
माझी बायको घरात आली, आणि तिने वरील विषय मला सांगितला.
मी म्हणालो.. एक काम कर, तिला शंभर रुपये दे..!
बायकोने.. लगेच तिला शंभर रुपये नेऊन दिले. आणि, आल्या पावली तिच्या मुलांना घेऊन ती निघून गेली.
आणि अचानक, माझं मन भूतकाळात गेलं.
माझा मुलगा साधारण वर्षभराचा असताना, नेमका महिना अखेरीला तो आजारी पडायचा. त्यावेळी मी भलताच कफल्लक माणूस. मला धडाचं काम नव्हतं. कुठेही रोजंदारीवर काम करायचो. मुलगा आजारी पडला, कि सकाळी कामाला जाताना बायको मला हे सगळं सांगायची. मग कामावरून घरी आल्यावर, मी घरातून बाहेर पडायचो. आणि कोणाकडून तरी, हात उसने पैसे घेऊन यायचो. हा नियम, अगदी दर महिन्याला ठरलेला असायचा.
मी, जुन्या विचारात बुडालेलो होतो. आणि पटकन माझ्या काहीतरी ध्यानात आलं.
आणि, मी बायकोला म्हणालो..
अगं.. डॉक्टरची फीच फक्त साठ रुपये होईल. उरलेल्या चाळीस रुपयात, लिहून दिलेली सगळी औषधं तिला घेता येणार नाहीत. तू एक काम कर, पटकन खाली जा. आणि, तिला अजून हे शंभर रुपये देऊन ये. आणि तिला हे सुद्धा सांग, कि हे पैसे आम्हाला परत देऊ नकोस..!
माझी बायको धावतपळत पटकन खाली गेली, पण तोवर उशीर झाला होता. तोपर्यंत राणी खूप दूर निघून गेली होती. बायको पुन्हा वर आली, आणि म्हणाली, येवढ्या घाईघाईने का पाठवलं हो मला..?
तर म्हणालो..
अगं.. आपला सोनू, लहानपणी आजारी असताना. दर महिन्याला मी सुद्धा असाच कोणाकडेतरी हात पसरायला जायचो. त्यावेळी, पैशासाठी मला कोणीच आणि कधीही नकार दिला नव्हता.
तर मग, आज माझी वेळ आहे ना.
" उपकाराच्या ओझ्यातून मला थोडं तरी उतराई होऊदेत..! "
त्यावेळी माझी बायको मला म्हणाली.. पण आजवर मला तुम्ही हे कधी बोलला नव्हता..!
म्हणालो.. सगळंच सांगायचं नसतं गं, काही गोष्टी मनात साठवलेल्याच चांगल्या असतात. योग्य वेळी त्या गोष्टी आपल्याला माणुसकी शिकवतात, आणि समाजाचा हिस्सा सुद्धा बनवतात.
त्यावेळी.. एका क्षणात, आम्हा दोघांचे डोळे पाणावले होते.
करत राहायचं, आणि.. देत राहायचं. तो सगळं काही पाहत असतो. परतफेड म्हणून तो आपल्याला अजून दुपटीने देतो. आता म्हणताल, ते कशासाठी..?
तर.. हे सत्कार्य, आपल्या हाताने सदैव घडत राहावं म्हणून..!

Thursday, 2 November 2017

पुण्यातील ट्राफिक पोलीस, हा एक.. फार मोठा संशोधनाचा विषय आहे. कधी कधी त्यांचं मला फार कौतुक वाटतं. तर कधी त्यांचा राग सुद्धा येतो. आम्हा सरकारी ड्रायव्हर लोकांचा आणि त्यांचा नेहेमी छत्तीसचा आकडा असतो. मी सरकारी गाडीवर काम करत असताना. नियम तोडल्याने आजवर तीन ते चार वेळा मी दंड भरला आहे.
एकदा एका सिग्नलला, मी नियमाने झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबलो होतो. तर त्या सिग्नलवर असणारा पोलीस माझ्याकडे आला आणि म्हणाला. गाडी जरा पुढे घे, पाठीमागे फार मोठं जाम झालं आहे. मी म्हणालो.. नाही बाबा, तुमच्या सोयीसाठी मी काही नियम मोडणार नाही. एकतर आता समोर केमेरे सुद्धा लावले आहेत. विनाकारण मला त्रास व्हायचा.
तर म्हणाला, का...? मी म्हणालो, अहो तुमची लोकं आमची सरकारी गाडी असून सुद्धा. आमच्याकडून थोडी जरी चूक झाली कि आम्हाला दंड करतात. नको तशी दमदाटी आणि अरे तुरे करतात. मग आम्ही तरी, तुम्हाला का म्हणून सहकार्य करावं..?
तर म्हणाला.. लई शहाणा आहेस, गाडी पुढं घे..!
मी मात्र माझ्या भूमिकेवर बिलकुल ठाम होतो. त्या पोलिसाकडे न पाहताच. मी समोर सिग्नल सुटण्याची वाट पाहू लागलो. मी तिरक्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होतो. तो मनातल्या मनात मला शिव्या देत असावा. तितक्यात हिरवा दिवा लागला, आणि मी सुसाट वेगाने तेथून निघून गेलो. हि लोकं आम्हाला सुद्धा सोडत नाहीत. म्हणून मी त्याला असा त्रास दिला. नाहीतर माझा असा हेकेखोर स्वभाव नाही. आता खाली दिलेलं आणखीन एक भन्नाट उदाहरण पाहा.
मागे नोट बंदीच्या काळात, एकदा मी पोलीस दिसत नाहीये असं पाहून. नको तिथे यु टर्न घेतला. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागून येऊन पोलीस महाशयांनी मला गाडी बाजूला घ्यायला लावली. मी सुद्धा खूप वैतागलेलो आणि घाईत सुद्धा होतो. गाडी बाजूला घेऊन, मी गाडीच्या खाली उतरलो. आणि म्हणालो..
नमस्कार साहेब..!
त्या पोलिसाने मला प्रश्न विचारला..
इथे यु टर्न अलाउड नाहीये.. तुला माहित नाही का..कि पुण्यात नवीन आला आहेस..?
माझं त्या पोलिसाला पहिलं उत्तर होतं. साहेब, मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय. प्लीज तुम्ही मला आरे कारे करू नका. किमान समोरच्या व्यक्तीचं वय बघून तरी बोला..!
नंतर म्हणाला.. गाडी कोणाची आहे..? ( तो विनाकारण वाकड्यात शिरत होता. )
मी म्हणालो, गाडीवर मालकाचं नाव आणि पत्ता लिहिला आहे..!
तो... गाडीवरील नाव वाचत, पुणे महानगरपालिका. बघू, लायसन बघू..?
मी खिशातलं लायसन काढून त्यांना दाखवलं.
लायसन पाहून झाल्यावर तो पोलीस म्हणाला.. दोनशे रुपये दंड भरा..!
तुम्हाला खरोखर सांगतो.. नोट बंदी असल्याने, त्यादिवशी माझ्या खिशात बिलकुल पैसे नव्हते. मी माझ्याकडे असणारं डेबिट कार्ड त्याच्यासमोर धरलं आणि म्हणालो. पैसे नाहीयेत माझ्याकडे, या कार्डमधून तुम्हाला जमेल तसे पैसे कापून घ्या. ( त्यावेळी पोलिसांकडे, पैसे कापून घेण्यासाठी डेबिट मशीन आल्या नव्हत्या. )
यावर तो पोलीस माझ्यावर चिडला नाही, पण म्हणाला.. सरकारी गाडी चालवतो. तुझ्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत. तर, निदान माफी तरी माग. मी सांगून सुद्धा त्याचं आरेकारे चालूच होतं.
मी म्हणालो.. नाही, माझ्याकडून चूक झाली आहे. आणि ती मला मान्य आहे. पण मी तुम्हाला त्यासाठी माफी वगैरे मागणार नाहीये. तुम्हाला पैसे कापून घेता येत नसतील. तर माझ्यावर खटला दाखल करा. मी कोर्टात जाऊन पैसे भरून येईल.
आता बाकी त्या पोलिसाचा पारा खूप चढला होता, आणि शेवटी रागारागात तो मला म्हणाला.
लई शहाणा दिसतोयेस, निघ आता हितून..!
तो मला पुन्हा अरेतुरे बोलला होता, पण यावेळी मी त्याला माफ केलं होतं. कारण मला सुद्धा घरी जायची घाई झाली होती. माझा राग मी मोकळा करून बसलो होतो. आणि पैशापरी माझे पैसे सुद्धा वाचले होते. त्यामुळे, नसता शहाणपणा न करता. मी, माझ्या गाडीला स्टार्टर मारला. आणि तडक आमच्या कोठीमध्ये निघून गेलो.
गरिबी फार वाईट हो.. त्यावेळी, रोजीरोटीच्या कामासाठी टाटाची कान्वायची गाडी मिळाली नाही. कि मी, बाहेर कोणत्याही आणि कोणाच्याही गाडीवर दोनशे पन्नास रुपये रोजाने बदली कामगार म्हणून कामाला जायचो. आणि ते सुद्धा, मिळेल तितके दिवस जायचो, घराबाहेर राहायचो. ते सुद्धा कोणतीही कुरबुर न करता. खरं तर, त्यावेळी मला झक मारत कामाला जायला लागायचं. कारण, त्यावेळी, दोन जीवांची जबाबदारी माझ्यावर पडली होती. एकतर माझं नवीनच लग्न झालं होतं, आणि वर्षभरातच आमच्या घरात पाळणा हलला होता.
पण.. त्या गोड गोष्टीचं कोणतच कौतुक करत न बसता, मोटार सारथी होत, मला या गावातून त्या गावात भटकंती कारवीच लागायची. क्या करे, पापी पेट का जो सवाल था..!
एकदा मला, एका मित्राची टाटाची नवीन सुमो घेऊन गोव्याला जाण्याची संधी मिळाली.
मनात ठरवलं.. कामाच्या निमित्ताने फिरणं सुद्धा होईल, आणि त्याच निमित्ताने आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुद्धा सुटेल. या निमित्ताने, या क्षेत्रात नवखा असून सुद्धा कोणतीही भीड न ठेवता मी गोव्याला गेलोच.
माझ्यासोबत गोवा फिरायला आलेले प्रवासी सुद्धा अगदी नवखे होते. ते सुद्धा प्रथमच गोव्याला निघाले होते. सावंतवाडी सोडली, महाराष्ट्र संपला आणि मी गोव्यात जाऊन पोहोचलो. अगदी नवखा असल्याने, गोव्यातील रस्ते किंवा तिथले नियम अथवा सिग्नल काही मला माहिती नव्हते. मी रस्ता दिसेल तशी माझी गाडी हाकत पुढे निघालो होतो. माझ्या सोबत असणाऱ्या लोकांना मी गाईड घ्या म्हणून सांगितलं. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. खूपच चेंगट लोकं होते साले..!
आणि, नेमकं एका गर्दीच्या ठिकाणी मला गोव्यातील पोलिसाने अडवलं. सुरवातीला, तो पोलीस माझ्याशी इंग्रजीत बोलला. मी त्याला, मराठी किंवा हिंदीत सांगा असं म्हणालो. तेंव्हा तो पोलीस मला म्हणाला,
कुठे जायचं आहे तुला..?
मी म्हणालो.. मला कळंगुट बीचवर जायचं आहे..!
त्यावर त्या पोलिसाने, इथून नो एन्ट्री आहे असं सांगितलं. आणि सोबतच, त्याठिकाणी जायचा रस्ता कसा आहे. ते सुद्धा व्यवस्थितपणे मला समजावून सांगितलं.
सुरवातीला ज्यावेळी त्या पोलिसाने मला थांबवलं. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, कि आता हा पोलीस आपली सगळी चौकशी करणार. गाडीचे कागदपत्रे बघणार, माझं लायसन तपासणार. आणि हे सगळं करून झाल्यावर एक तर दंड तरी फाडणार. नाहीतर " खावडी " तरी करणार. पण मी जो काही विचार केला होता, त्यापैकी काहीएक घडलं नव्हतं. त्यावेळी तो पोलीस माझ्याशी एवढा सौजन्याने का वागला, कि सांगता सोय नाही.
" पोलीस सुद्धा देव माणूस असतो. "
हे मला.. चक्क वारुणीच्या ( दारूच्या ) गावात गेल्यावर समजावं, हे सुद्धा माझ्यासाठी एक फार मोठं कुतूहल होतं. पण हे सगळं का घडलं असावं..? ते मला त्यावेळी समजलं नाही.
पण काही वर्षानंतर, मला या गोष्टीचा उलघडा झाला.
कि.. गोव्यातील पोलीस, टुरिस्ट लोकांना किंवा त्यांच्या ड्रायव्हर लोकांना जास्तीचा किंवा कोणताही त्रास देत नाहीत. कारण, त्या राज्याची सगळी अर्थव्यवस्था हि टुरिस्ट लोकांवर अवलंबून असते. ते काहीही असो, पण गोव्यात बाकी पोलीस लोकांकडून, त्यावेळी.. किंवा त्यानंतरच्या काळात सुद्धा मला कधीही आणि कसलाही त्रास झाला नाही.
त्यानंतर.. मी एकदा केरळला गेलो असता. तिथे सुद्धा, चुकून माझ्याकडून एक सिग्नल जंप झाला. त्यावेळी.. तिथे हजर असणाऱ्या त्या पोलिसाने, अगदी सौजन्याने मला गाडी बाजूला घ्यायला लावली. माझ्या गाडीचे सगळे कागदपत्रे आणि माझं लायसन तपासलं. माझी चूक अगदी छोटी होती, त्यामुळे मला वाटलं. हा माझ्याकडून पाच पन्नास रुपये घेऊन मला सोडून देईल.
पण तिथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे.. बोली भाषेचा प्रश्न. त्या पोलिसाला खूपच तोडकी मोडकी हिंदी भाषा येत होती. तो मला म्हणाला,
हंड्रेड रुपीस फाईन.. लेकीन छोड देता. फिर नही,
( शंभर रुपये दंड झाला आहे. पण आज मी तुला सोडून देतोय. पुन्हा अशी चूक करू नकोस. )
आणि म्हणाला.. जा, त्या दुकानातून दोन पाण्याच्या बाटल्या घेऊन ये.
लाच घ्यायची नाही. म्हणून, दंड न करता माझ्याकडून त्याने फक्त पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या. कारण, कोणाला मोफत सोडून सुद्धा फायदा नाही. काहीतरी शिक्षा किंवा खर्च झालाच पाहिजे. म्हणजे, दुसऱ्या वेळी तो मनुष्य अशी चूक करणार नाही.
त्यावेळी बाकी, इतर मित्रांकडून सुद्धा केरळच्या बाबतीत मला थोड्याफार प्रमाणात असंच काहीसं ऐकायला मिळालं होतं. कि केरळमधील पोलीस, लाच म्हणून शक्यतो पैसे घेत नाहीत. फारफारतर पाच दहा पाण्याच्या बाटल्या मागवतील, पण पैसे नाहीच. हि साधारण नव्व्याण्णव सालातील घटना आहे. आता तिथे काय चालू असेल, ते मला सुद्धा सांगता येणार नाही.
आणखीन एक गोष्ट.. साऊथ मधील जंगली भागात, पोलिसी त्रास कमी आणि गुंड लोकांचा त्रास फार होता. त्यावेळी, अडमार्गी जंगल भागात, काही गुंड प्रवृत्तीची लोकं एक विशिष्ट थांबा बनवून. येणा जाणाऱ्या गाड्यांकडून टेक्स वसूल करायचे. त्या टेक्सला त्या भागात. " गुंडा टेक्स " असं संबोधलं जायचं. हे सगळं नेमकं कोणाच्या कृपा आशीर्वादाने चालायचं ते माहित नाही. पण अगदी राजरोसपणे चालायचं. एकदा तर, चक्क त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लाऊन सोबतच शिवसेनेचा बोर्ड सुद्धा लावला होता. शेवटी काय आहे, महाराष्ट्रातील माणूस हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आणि त्यांची संघटना पाहून. तो गुंडा टेक्स देऊन पुढे निघून जायचे. बघा ना, आमच्या साहेबांचा वचक किती मोठा होता. आणि त्यांच्या नावाने, लोक कुठेकुठे पोटं भरत होते..!
मी स्वतः, जातीने ड्रायव्हर असल्याने. नाही म्हणता, पोटासाठी माझी भारतात बरीच भटकंती झाली आहे. भारतातील ज्या राज्यात माझं जाणं झालं. त्या राज्यातील पोलिसांच्या अंगी असणार्या काही खुबी. तर, काही जुजबी माहित्या मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय.
ज्या, माझ्यासोबत घडल्या आहेत.
पूर्वी.. पोटाची खळगी भरण्यासाठी, ड्रायव्हर म्हणून मी टेल्को ( टाटा ) कंपनीच्या नवीन गाड्या भारतातील इतर राज्यात पोहोचवायचं काम करायचो. या कामासाठी, मी त्या काळात.
सर्वाधिक फेऱ्या ज्या भागात केल्या, तो भाग म्हणजे नागपूर.
आणि त्या खालोखाल.. गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली, चंडीगड, हरियाना. या भागात, जास्ती नाही, पण एखाद दुसरी वेळ तरी माझं नक्कीच जाणं झालं आहे.
एकदा.. टाटा ४०७ हा ट्रक घेऊन मी चंदीगडला निघालो होतो. तब्बल सहा दिवसात सगळा टप्पा पार करून, अगदी शेवटच्या टप्प्यात. मी चंडीगडच्या आसपास पोहोचलो होतो.
त्यावेळी, त्या भागात रोडच्या नूतनीकरणाची कामं चालू होती. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी
" USE DIVERTION " लिहिलेले बोर्ड लावलेले दिसत होते.
आता.. हे " युज डायवरशन " म्हणजे काय..? तेच मला माहिती नव्हतं. हा शब्द मी पूर्वी कधीही वाचला किंवा ऐकला नव्हता. बाकी मित्रांचा तर प्रश्नच येत नव्हता.
आणि निव्वळ या इंग्रजीच्या अज्ञानापोटी, नियमाचं उल्लंघन करून आम्ही सर्व ड्रायव्हर नको त्या रोडने पुढे गेलो. साधारण एकोणीसशे सत्त्यान्न्वचा काळ. रात्री आठ साडेआठची वेळ, त्यावेळी पंजाब भागात, खूपच नक्षली कारवाया होत असायच्या. त्यामुळे, वाटेत जागोजागी पोलीस फाटा तैनात असायचा. आम्ही पाचसहा मित्र, त्या चुकीच्या रोडने आमच्या गाड्या दामटत तसेच पुढे निघालो. आणि पुढे गेल्यावर, नेमकी आमच्यापुढे पोलिसांची एक जीप उभी होती. ती जीप पाहून, नाही म्हणता आम्ही खूप घाबरलो होतो. कारण, या कान्वायच्या गाड्यांना दमदाटी करून कोणीही अडवत असतं. त्यातून काही अनधिकृत वाहतूक तरी होत नाहीये ना, याची पडताळणी केली जाते. वेळ प्रसंगी गाडीत पेसेंजर असेल तर दमदाटी करून आमच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जायचे. शेवटी, त्या पोलिसांना पाहून आमचा म्होरक्या घाबरून तसाच पुढे निघून गेला.
पोलीस शिट्टी वाजवत होते. पण आम्ही सगळ्यांनी एकामागून एक गाड्या पुढे दामटल्या. आणि काय सांगायचं, ते पोलीस जीप घेऊन आमचा पाठलाग करू लागले.
अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी आम्हाला आडवलं. रागाने..नको तसल्या घाणेरड्या शिव्या देत, आम्हा सर्वांना त्यांनी गाड्यांच्या खाली उतरवलं. विजेरीच्या सहाय्याने सगळ्या गाड्या चेक केल्या. कारण, त्या भागात अमली पदार्थांची फार मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. आणि हे तस्कर लोकं, नेमके आमच्या सारख्या गरजवंत कान्वायच्या गाड्यांचा सहारा घ्यायचे. आणि आम्ही सुद्धा, दोन पैसे मिळतील या आशेने गाडीमध्ये प्रवासी बसवायचो.
पण त्यादिवशी, सुदैवाने आमच्या कोणाच्याच गाडीमध्ये प्रवाशी नव्हते. आम्हाला आमच्या गाड्या जमा करायच्या ठिकाणी जायची घाई झाली होती. त्यामुळे, आम्ही रात्रीचा प्रवास करत होतो. बाकी दुसरं कोणतच कारण नव्हतं. शेवटी.. त्या फौजदाराने, आम्हा सर्व ड्रायव्हरांना एका लाईनीत उभं केलं.
आणि आमचा म्होरक्या असणाऱ्या एका मित्राच्या एक जोरदार कानफटात लगावली.
आणि म्हणाला.. बोल.. क्यो भाग राहा था, तू नक्सली है क्या..?
नक्सली हा शब्द ऐकून मी तर जागेवरच गार झालो. कारण, काही कारण नसताना. यांनी जर आपल्यावर तो चार्ज लावला तर काय घ्या..?
या विचाराने मी पुरता घाबरून गेलो होतो. तितक्यात, दुसऱ्या एका जुन्या जाणत्या ड्रायव्हरने त्या साहेबांना सगळं समजावून सांगितलं. आम्ही ड्रायव्हर लोकं आहोत. पुण्यावरून या नवीन गाड्या घेऊन चंडीगडला सोडायला आलो आहोत. गरीब माणसं आहोत. पोटासाठी करतोय, आम्ही नक्सली वगैरे नाहीये.
त्यावर, तो फौजदार म्हणाला.. फिर रॉंग साईडसे क्यु आया, डायवरशन का बोर्ड तुने पढा नही क्या..?
त्यावर तो ड्रायव्हर मित्र म्हणाला.. नही सहाब, अंग्रेजी समजता नही है ना. इसलिये गलती हो गयी. एक बार माफ कर दो, अगली बार गलती नही होगी.
शेवटी ती पोलिसी नजरच.. त्या फौजदाराने, पुन्हा एकदा आम्हा सर्वांना वरून खालून पाहून घेतलं. त्याच्या मनाची खात्री झाली. कि हि लोकं खरोखर ड्रायव्हर आहेत. त्यावेळी,
इन सबकी परची बनावो, असा त्याच्या सोबत असणार्या पोलिसाला आदेश सोडत, तो फौजदार, जीपमध्ये जाऊन बसला.
आता हा पोलीस किती रुपयाची पावती करतोय, याकडे आमचं लक्ष लागलं होतं. कारण त्यावेळी, आमच्या खिशात काही जास्ती पैसे नसायचे. दिवसभर केलेला धंदा मिळून, प्रत्येकाच्या खिशात मोजून अगदी शे दोनशे रुपये असणार. नाही म्हणता, त्यावेळी हि रक्कम सुद्धा फार मोठी होती. पाच पन्नास रुपयात, अगदी भरपेट जेवण होऊन जायचं.
आमच्या खिशात पैसा का नसायचा. तर, त्या सगळ्या गाड्या एका इनचार्जच्या अखत्यारीत असायच्या. तो फक्त आमच्या गाडीमध्ये रोजच्या रोज डीझेल भरायचा. आणि, त्या गाड्या योग्य ठिकाणी पोहोच झाल्यावरच. आमचा पगार आम्हाला दिला जायचा. असा, त्यावेळी तेथील नियम होता.
आमच्या एकूण पाच गाड्या होत्या. तो पोलीस म्हणाला.. चलो,सब लोग सौ सौ रुपये निकालो. नाही म्हणायची बिशाद नव्हती. आम्ही सर्वांनी गपगुमान खिशातून शंभर शंभर रुपये काढले. आणि पाचशे रुपये त्या पोलिसाच्या हातामध्ये टेकवले. पावती मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. ते सगळे पैसे त्या पोलिसाने खिशात कोंबले. आणि जीपला यु टर्न मारून ते पुन्हा त्यांच्या स्पॉटवर निघून गेले.
घडलेल्या या प्रकारामुळे मी पुरता घाबरून गेलो होतो. कारण, महाराष्ट्र सोडून गाडी चालवत बाहेर जाण्याची हे माझी पहिलीच वेळ होती. शेवटी, आमच्या म्होरक्याला मी म्हणालो. तुला मुक्कामाचं ठिकाण माहित असेल तरच पुढे चल बाबा, नाहीतर आपण इथेच कुठेतरी मुक्काम करू. आणि सकाळ झाल्यावर पुढे कूच करू.
त्यावर तो मित्र म्हणाला.. हे काय समोरच आलय ते ठिकाण..!
आणि, खुश होऊन समोर दिसणाऱ्या त्या मोकळ्या मैदानात आम्ही चौफेर उधळलो. रात्रीच्या अंधारात आम्हाला काही समजून आलं नाही. पण त्या मैदानात सगळा चिखल झाला होता.
सर्वात पुढे गेलेल्या दोन गाड्या चिखलात फसल्या. त्यामुळे, आम्ही मागचे लोकं लगेच सावध झालो. मग काय.. रात्रभर आम्ही सगळे आहे तिथेच एका जागेवर थांबून, आपापल्या गाडीत उपाशीपोटी झोपी गेलो. सकाळ झाल्यावर व्यवस्थित कोरडा रस्ता पाहून, सायकलचे काही जुने टायर विकत आणून. त्याची चैन बनवून, त्या दोन्ही गाड्या आम्ही चिखलातून बाहेर ओढून काढल्या. आणि समोरच दिसत असणाऱ्या, आरोशात ( R.S.O. ) मध्ये गाड्या जमा केल्या.