Friday, 31 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ५ )
=====================
आजच्या प्रवासात आम्हाला मनाली ते जीस्पा हा एकशे पन्नास किलोमीटर अंतराचा टप्पा पार करायचा होता. खरं तर हा प्रवास सकाळी अगदी लवकर करावा लागतो. कारण या भागात ट्राफिक जामची भयंकर मोठी समस्या आहे. अरुंद रस्त्यात कधी एखादा अपघात होईल आणि ट्राफिक जाम होईल ते काही सांगता येत नसतं. ताशी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वेगाने या मार्गावर प्रवास होत असतो. आजचं एकुणात आठ नऊ तासांचं रनिंग होतं, त्यामुळे आमच्या ड्रायव्हर मंडळींनी वशिष्ठ ऋषी मंदिर न दाखवताच पुढे जाण्याचा चंग बांधला होता. पण मी त्यांना दोन गोष्टी समजावून सांगितल्या, आम्ही काही या भागात पुन्हा फिरायला येऊ शकणार नाही. त्यामुळे मूर्खपणा करू नका. सगळी ठिकाणं आम्हाला न चुकता दाखवा. तेंव्हा कुठे त्यांची आक्कल ठिकाणावर आली..
मनाली मार्गे आम्ही रोहतांग कडे कूच केली, फारच भयानक असा हा एकेरी रस्ता होता. गाडी थोडी अलीकडे आली, कि दरीतून खाली पडतेय कि काय असं व्हायचं. जीव अगदी घाबरून जायचा. या घाटात आम्ही साधारण वीसेक किलोमीटर अंतर कापलं असावं. आणि एका ठिकाणी आम्हाला छोटा ट्राफिक जाम लागला. आम्हाला वाटलं छोटा मोठा जाम असेल, होईल रस्ता क्लियर. पण कसलं काय.. खाली उतरून पाहतो तर, संपूर्ण घाटामध्ये मुंग्यांची रांग पसरावी, अशा गाड्या उभ्या होत्या. अगदी दूरवर मोठाले ट्रक सुद्धा खूप लहान लहान दिसत होते. आता बाकी पुढचा प्रवास कठीण जाणार होता. कारण, चौकशीअंती समजलं कि.. वरच्या बाजूला, डीझेल घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला होता. रोहतांगच्या अवाढव्य पर्वत रांगामध्ये मला एका ठिकाणी बोगद्याचं काम चालू असताना दिसलं. या बोगद्याचं काम दोन हजार दहा साली सुरु झालं आहे. एकूण नऊ किलोमीटर अंतराचा हा टनल असणार आहे. हे काम सुद्धा, आपली भारतीय सेना ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) मार्गी लावत आहे. हा बोगदा सुरु झाल्यावर, प्रवाशांचा फार मोठा वळसा वाचला जाईल. आणि लेहला जाण्यासाठीचं बरच अंतर कमी होईल. साधारण दोन हजार एकोणीस पर्यंत हा बोगदा प्रवासासाठी खुला केला जाईल.
या ट्राफिक जाममध्ये, आमचे दोन तास वाया गेले. दोन तासानंतर आम्ही पुन्हा एकदा घाट चढायला सुरवात केली. घाट चढत असताना, वरील बाजूने एक सरकारी बस येताना दिसली. जवळ आल्यावर पाहतो तर, ती पन्नास सीटर एसटी होती. आणि ती लेह वरून दिल्लीला निघाली होती. ती बस पाहून मी अक्षरशः तोंडात बोट घातलं. कारण.. त्या भागात, छोट्या गाडीने प्रवास करताना सुद्धा काळजाचा ठोका चुकत असतो. तर मग येवढ्या मोठ्या बसने कोण प्रवास करेल.? पण ती बस प्रवाशांनी अगदी खचाखच भरलेली होती. त्यात सगळे स्थानिक प्रवासी दिसून येत होते. ती बस लेहपासून निघाल्यावर किती मुक्काम करत आली होती. ते तिचं तिलाच माहिती. मी अगदी मनापासून त्या प्रवाशांना आणि ड्रायव्हरला अभिवादन केलं. खरच हो.. येवढ्या मोठ्या घाटातून एसटीने प्रवास करणं जोक नाहीये.
फारच कठीण असा हा रस्ता होता. इथे सुद्धा जागोजागी रस्त्याची कामं चालू असल्याने, आमची गाडी सुद्धा अगदी सावकाशपणे निघाली होती. हि सुद्धा माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू होती. दुपारी तीनच्या सुमारास आम्ही रोहतांगला पोहोचलो. तिथे हॉटेलमध्ये सर्वांनी थोडाफार नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय हो, इथे फक्त मेगी हा विषयच नाश्ता म्हणून योग्य आणि गरमागरम मिळत होता.
आज सकाळपासून आम्ही फक्त पन्नास किलोमीटर अंतर पार केलं होतं. अजून आम्हाला शंभर किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता. यावेळी.. रोहतांग पासला औषधाला सुद्धा बर्फ शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे आमचा थोडा वेळ वाचला, नाहीतर बर्फात खेळायला आमचा एखादा तास तरी नक्कीच खर्ची पडला असता. रोहतांग पासला.. एका ठिकाण पेरा ग्लायडिंग सेंटर होतं. काही हौशी मंडळी, इथे.. पंख होती तो उड आती रे.. या गीतातील बोलाप्रमाणे हवेत झेपावून दर्या खोऱ्यात उडण्याचा आनंद घेत होते. दुरूनच हा नजरा पाहत, मी मेगीचे गरम घास मुखात घेत होतो.
रोहतांग पास केल्यावर.. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिखल मिश्रित बर्फ साचलेला होता. तिथे काही पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटत होते. त्यांनंतर एक मोठा उतार उतरल्यावर, भयंकर असा खडकाळ रस्ता सुरु झाला. मुख्य डांबरी रस्ता वाहून गेल्याने, आणि अगदी मातीचा रस्ता असल्याने, भयंकर धूळ उडत होती. त्यात काही ठिकाणी चिखल मातीचा सडा पडला होता. मिलिटरीच्या ( BRO ) गाड्यांची सतत आवकजावक चालू होती. बुलेट वरून सफर करणारी मंडळी, एक दुसऱ्याला प्रोत्साहन देत पुढे कूच करत होते. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कि.. लेह साठी मनाली मार्गे प्रवास करणाऱ्या गाड्या अगदी न च्या बरोबर होत्या. अगदी लेह पर्यंत पोहोचलो तोवर, मला जेमतेम सात ते आठ इनोव्हा आणि दोन तीन टेम्पो ट्रेव्हलर आढळल्या असतील.
रोहतांग ते जीस्पा हा रस्ता तसा मला फार सोपा वाटला. या भागात जास्तीचा घाटमाथा नव्हता. आजूबाजूला पाहायला फक्त अक्राळविक्राळ डोंगर होते. आणि डोंगरच्या टोकाला, बर्फाची टोपी घातलेले हिमशिखरे होती. बरच अंतर कापून झालं होतं, आता आम्ही लाहौल नावाच्या एक खेड्यात प्रवेश केला होता.
तांदीपूल नावाच्या गावात आमची गाडी चहापान आणि डीझेल भरण्यासाठी थांबली. आणि सोबतच.. तिथे असणाऱ्या एका दुकानात, आमच्या ड्रायव्हरने गाडीच्या स्टेपनीचा पंक्चर सुद्धा काढून घेतला. कारण दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात, जीस्पा ते लेह हा तीनशे वीस किलोमीटरचा प्रवास आम्हाला करायचा होता. आणि या प्रवासात कुठेही पेट्रोलपंप किंवा इतर काही दुकानं नव्हती. तर.. त्या तांदिपूल गावामध्ये रस्त्याच्या कडेला एक नदी वाहत होती. थोडं पुढे जाऊन पाहिलं. तर तिथे दोन नद्यांचा संगम दिसत होता. दोन्ही नद्या अगदी गढूळ होत्या, आणि त्यांचा खळाळता वेगवान प्रवाह सुद्धा खूपच भयानक दिसत होता.
रात्रीचे आठ वाजले होते. पण पश्चिमेकडे झुकणारा सूर्य आसमंतात अजूनही डोकावत होता. एक कुतूहल म्हणून मी तेथील एका व्यक्तीला या कोणत्या नद्या आहेत असं विचारलं. तर तो व्यक्ती म्हणाला..
हा, चंद्र आणि भागा नदीचा संगम आहे..!
हे ऐकताच माझ्या नजरेसमोर आपल्या पंढरपुरातील चंद्रभागा दिसली. आणि हिच नदी आपल्याकडे आली असेल का.? हा भाबडा प्रश्न माझ्या मनात आला. पण ते काही शक्य नव्हतं. कारण आपल्या नदीचा उगम हा आपल्या भागातील आहे. मग हे नेमकं काय कनेक्शन असावं.? या विचाराने मी गोंधळून गेलो. त्या चंद्रभागेच्या संगमावर मी नतमस्तक झालो. मनोभावे त्या संगमाला नमस्कार केला. आणि पुढील प्रवासाला निघालो.!
क्रमशः

Thursday, 30 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ४ )
=====================
जसजशी बस पुढे जात होती, तसतसं कुलू जवळ येऊ लागलं होतं. आणि माझं मन पुन्हा एकदा भूतकाळात जात होतं. मी खूप आठवायचा प्रयत्न करत होतो. पण माझा अपघात झालेलं ठिकाण माझ्या टापूत येत नव्हतं. कारण.. गेल्या दहा वर्षात तिथे आता बरेच बदल झाले आहेत. रस्ते भयंकर रुंद झाले आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळच चैतन्य संचारलं आहे. मी ज्या इस्पितळात प्रथमोपचार घेतले होते, ते ओयासिस नावाचं इस्पितळ सुद्धा मला दिसलं नाही. शेवटी एका ठिकाणी माझं मन अगदी सैरभैर झालं. बहुतेक हे तेच ठिकाण असावं, असं मला जाणवून गेलं. आणि नकळत माझे दोन्ही हात जोडले गेले. अपघातानंतर याच दरीतून चालत मी वर आलो होतो. आणि त्यामुळेच आज मी जीवित होतो. कटू आठवणी सरता सरत नव्हत्या..
काही अंतर पुढे गेल्यार, एका ठिकाणी.. कसला तरी टोल भरायचा होता. त्यामुळे आमची गाडी बाजूला घेण्यात आली. तितक्यात काही गुलाबी गालाच्या ललना आमच्या बसपाशी आल्या, त्यांच्या डोक्यावर एक छोटीशी टोपली होती. त्यात विविध प्रकारची फळं त्यांनी विक्रीसाठी आणली होती. त्यात.. चेरी, आलू बुखारा आणि इतर बर्याच स्थानिक फळांचा भरणा होता. तीस रुपयात प्रत्येकी एक, अशी सगळी फळं मी खरेदी केली. सगळ्या बसभर ती फळं आम्ही वाटून खाल्ली. आणि काही वेळातच, आम्ही मनाली मध्ये येऊन पोहोचलो.
सकाळचे साडेअकरा वाजले होते, मनालीत आम्हाला मिळालेला लॉज, खूपच आडवळणी आणि आतील बाजूस होता. आम्ही लॉजवर गेलो, तिथे सगळे जन आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. आता आम्हाला पुढील तयारीला लागायचं होतं. पुढील तयारी म्हणजे जेवण. आम्ही लॉजमध्ये अशा प्रकारची बुकिंग करून घेतली होती. कि तिथे गेल्यावर, त्यांच्या किचनमध्ये आम्ही आमचं जेवण बनवून घ्यायचो. आणि जिथे आम्हाला पुरेसा वेळ मिळणार नव्हता. अशा काही ठिकाणी लॉजमध्ये जेवणाची सोय करून घेतली होती.
आम्ही स्वतः जेवण बनवण्यामागे दोन कारणं होती. एकतर हॉटेलमध्ये जेवण्याचा खर्च फार वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बाहेरच्या प्रवासात, आपलं घरगुती जेवण असल्यावर आपली पोटं बिघडत नाहीत. त्यामुळे इथून जातानाच.. स्वयपाक करण्यासाठी तीन छोट्या शेगड्या, प्रत्येकी दोन किलो ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ, पत्रावळी आणि स्टीलच्या वाट्या, आणि त्यासोबत.. डाळी, तेल, साखर, मीठ, मिरची, पोहे, रवा, बेसन, शेवया. दुध पावडर अशी जय्यत तयारी करून आम्ही गेलो होतो. फक्त ज्या भागात जाऊ, तिथे.. कांदा, वांगी, बटाटा, कोथंबीर, कडीपत्ता किंवा अन्य काही भाज्या खरेदी करायच्या. आणि आपल्या कामाला लागायचं. आमच्या सोबत असणाऱ्या महिला मंडळी, खूपच सुगरणी होत्या. अगदी तासाभरात, त्या सगळा स्वयपाक करून मोकळ्या व्हायच्या.
आजच्या जेवणात.. बटाट्याची रस्सा भाजी, ज्वारीची भाकरी, जीरा राईस, लोणचं. शेंगदाणा चटणी असा जंगी बेत होता. भुकेच्या तडाख्यात सर्वांनी भाजी भाकरीवर यथेच्छ ताव मारला.
जेवणं उरकली.. आणि दोनचार तास आराम करण्यासाठी सगळे जन आपापल्या रुममध्ये निघून गेले. दुपारी चार वाजता, सगळे जन बसमध्ये येऊन बसले. आणि आम्ही, मनाली फिरायला गेलो. सर्वप्रथम.. आम्ही हिडींबा देवीच्या मंदिराला भेट दिली. हिडिंबा मंदिर, हे मनाली मधील ग्रामस्थांच्या आस्थेचा विषय होता. घनदाट वृक्षराजीमध्ये हिडिंबा देवीचं देखणं मंदिर पर्यटकांना आकर्षित करत होतं. त्याठिकाणी आम्ही मनोभावे माथा टेकला.
त्यानंतर तिथे शेजारीच असणाऱ्या घटत्कोच मंदिराला भेट दिली. घटत्कोच हा भीम आणि हिंडीबा यांचा पुत्र, हे मंदिर अगदी उघड्यावर आहे. एका मोठ्या झाडाखाली, या मंदिराची स्थापना केली आहे. प्रथेप्रमाणे तिथे चाकू, त्रिशूळ आणि याक प्राण्याचे शिंग देवाला अर्पण केलेले दिसून येत होते. हा परिसर फिरून झाल्यावर, क्लब हाऊस मध्ये आम्ही थोडी खरेदी केली. खरं तर इथे खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही. कारण सगळी खरेदी इथे फारच महाग आहे. पण स्थानिक व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, खिशाला थोडी झळ नक्की लाऊन घ्यावी. मनाली हे ठिकाण अगदी एका दिवसात फिरून होण्यासारखं आहे. पण खरं पाहायला गेलं तर, हा एक पक्का हनिमून स्पॉट आहे. त्यामुळे, इथे नवविवाहित जोड्या भरपूर प्रमाणात दिसून येतात.
क्लब हाऊस जवळच असणार्या मनु मंदिराला आम्ही भेट दिली. मनु मंदिरात जाण्यासाठी एक किलोमीटर अंतराची खडी पायपीट करावी लागते. मनुस्मृतीचे जनक असणारे, मनु ऋषी यांचं हे मंदिर आहे. उंच पहाडावर असणारं हे लाकडी मंदिर फारच आकर्षक आहे.
हे सगळं देवदर्शन उरकून घेतल्यावर, तेथील स्थानिक भाजी मंडई मध्ये भाजी खरेदी केली. तिथे मला एक नवीनच लाल रंगाचा बटाटा पाहायला मिळाला. हा सगळा कार्यक्रम आटोपल्यावर, आम्ही लॉजवर आलो. रात्रीच्या जेवणासाठी महिलांनी बटाटा घालून मसालेभात बनवला. रात्री नऊ वाजता आमची जेवणं उरकली. आणि दहा वाजता सगळं काही चिडीचूप झालं. उद्या सकाळी आम्हाला, मनाली मधील वशिष्ठ ऋषी यांचं मंदिर, श्रीराम मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड पाहून पुढे रोहतांग मार्गे जीस्पा व्हेली कडे कूच करायची होती. उद्या सकाळी आम्ही मनालीला रामराम करणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळी अवराआवार करून आम्ही वशिष्ठ ऋषी आश्रमाकडे गेलो. तिथे बाजूलाच श्रीरामाचं सुद्धा पुरातन मंदिर आहे. वशिष्ठ ऋषी हे प्रभू श्रीरामाचे गुरु होत. भक्तिभावाने त्या दोन्ही मंदिरात सगळे नतमस्तक झालो.
वशिष्ठ ऋषी आश्रमाच्या परिसरात एक गरम पाण्याचं फार मोठं कुंड आहे. तिथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळीची व्यवस्था केली आहे. या पाण्यात अंघोळ केल्याने समस्त त्वचारोग दूर होतात. असं त्याठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. मग काय, हाती आलेली हि अमुल्य संधी कोण दवडणार. काही हौशी मंडळींनी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आपली हाडं शेकून घेतली. मनाली सारख्या थंड वातावरणात गरम पाण्याची अंघोळ एक वेगळाच आनंद देऊन जाते. अंघोळ झाल्यावर, मनोभावे वशिष्ठ ऋषी आणि श्रीरामाच्या मंदिरात माथा टेकवला. जास्ती वेळ न दवडता.. त्या ठिकाणाहून आम्ही बरोबर दहा वाजता बाहेर पडलो. आणि रोहतांगच्या रस्त्याला लागलो.
क्रमशः


Wednesday, 29 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ३ )
=====================
जेवणं उरकली.. रात्रीचे अकरा वाजले होते. आमच्या पुढील प्रवासाला सुरवात होणार होती. मला प्रवास करण्याचा खूप कंटाळा आला होता. कारण माझं एक तत्व आहे, रात्र हि झोपण्या करिता आहे, प्रवास करण्यासाठी नाही. पण काय करता, नाईलाज.. प्रवास हा करावाच लागणार होता. सगळीकडे किर्रर्र अंधार दाटून आला होता. जिकडे पहावं तिकडे धुक्याचे लोट दिसत होते. धाब्याच्या मागील बाजूस, मोर ओरड्ल्याचे म्याव-म्याव असे आवाज ऐकू येत होते.
एक-एक करून आमच्या बस मधील सगळे प्रवासी बसमध्ये बसले. मी सुद्धा माझ्या बायकोच्या शेजारील सीटवर जाऊन बसलो. बसमध्ये खूपच आल्हाददायक वातवरण निर्माण झालं होतं.
आमच्यातील एक हौशी व्यक्ती, ड्रायव्हरच्या शेजारील क्लीनर सीटवर जाऊन बसला. प्रवासाला सुरवात झाली. गुरबचन ड्रायव्हर खूप रंगात आला होता. सुरवातीचा रस्ता अगदी मस्त आणि चौपदरी होता. गाडी हायवेला लागली, गार वारा अंगाला झोंबू लागला. तसा ड्रायव्हर शेजारी बसलेला व्यक्ती उबदार वातावरण निर्माण करून डुलक्या द्यायला लागला. तसा तो ड्रायव्हर त्याच्यावर खेकसला, आणि म्हणाला.. इधर सोनेका नही है..! त्यापेक्षा तुम्ही मागे जाऊन बसा..! तो बिचारा गपगुमान मागे येऊन बसला. आता मात्र पुढील सीटवर बसायला कोणीच तयार नव्हता.
आता.. झक मारत मला त्या सीटवर जाऊन बसावं लागणार होतं. कारण, इथून पुढे सगळा घाट माथ्याचा रस्ता होता. आणि चुकून, ड्रायव्हरने डुलकी मारली तर काय करायचं.? शेवटी तो सुद्धा माणूस आहे. म्हणून त्या सीटवर मी बसलो, आणि उगाच काहीतरी बोलायचं म्हणून, कोणताही विषय काढून ड्रायव्हरला जागता ठेवला.
काही वेळातच.. गाडीतील सगळी मंडळी घोरायला लागली. मला सुद्धा खूप झोप आली होती. पण माझ्या डोळ्याला डोळा लागणार नव्हता. कारण.. दहा वर्षापूर्वी याच घाटामध्ये माझ्या बसला फार मोठा अपघात झाला होता. त्यात माझे चार कर्मचारी मित्र जागेवर गतप्राण झाले होते. माझं नशीब बलवत्तर म्हणून, मी त्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो. त्यामुळे मला सतर्क राहणं फार जरुरी होतं.
चंडीगड ते मनाली किंवा दिल्ली ते मनाली.. हा सगळा प्रवास बहुतेक रात्रीच करत असतात. असं मला तिथे समजून आलं. कारण.. इतक्या रात्री सुद्धा रोडवर भयंकर ट्राफिक होतं. त्यात लग्झरी बसचा भरपूर भरणा होता. आलिशान मर्सिडीज लग्झऱ्या हळुवार हेलकावे खात घाटातून मार्गक्रमण करत होत्या. दमले भागलेले मालवाहतूक करणारे काही ट्रक, रस्त्यावर जागोजागी जिथे चांगली जागा मिळेल तिथे विसावले होते. सगळा आसमंत झोपी गेला होता. पण, आमचा प्रवास काही थांबणार नव्हता. ठरलेल्या आराखड्या प्रमाणे आम्हाला एक-एक टप्पा पार करावा लागणार होता.
दहा वर्षापूवी कुलू मनाली मार्गावरील मी जो रस्ता पाहिला होता, त्यात आणि आजच्या रस्त्यात मला भयंकर तफावत आढळून आली. आताचा रस्ता फारच मस्त केला आहे. काही अवघड ठिकाणी, जिथे काहीच करता येऊ शकणार नाही. तिथे फारच धोकादायक वळणं आहेत. पण नाही म्हणता, पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये. त्यामुळे माझ्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला होता. पुन्हा एकदा मी मागे वळून पाहिलं, सगळे प्रवासी गाढ झोपी गेले होते. आणि, रात्रभर मला एकट्याला जागावं लागणार होतं.
पहाटे दोन वाजता.. आमच्या ड्रायव्हरला थोडा आळस आल्याने, एका ढाब्यावर चहा पिण्यासाठी आमची गाडी थांबली. गाडीतील काही लोकं लघुशंका करून आले, तोवर चहा पिऊन ड्रायव्हर पुन्हा एकदा ताजातवाना झाला होता. हलकेच त्याने खिशातील विडी बंडल बाहेर काढला. त्यातील एक विडी शिलगावली, आणि तो धुराचे लोट हवेत सोडू लागला. आसमंतात धुक्याचे थर दाटून आले होते. बसवर धुक्याचे थेंब अलगद ओघळत होते. सगळे प्रवासी पुन्हा एकदा आपापल्या सीटवर जाऊन बसले, अंगात उब निर्माण व्हावी म्हणून, प्रत्येकाने.. स्वेटर कानटोप्या परिधान केल्या होत्या. काहींनी तर, आपल्या अंगाभोवती ब्लेंकेट गुंडाळून घेतली होती. एकंदरीत सगळं काही अगदी ठीकठाक आणि उबदार होतं. आणि, आमच्या गाडीने पुन्हा एकदा स्टार्टर मारला..
उत्तरेतील तो भाग म्हणजे.. सरळ रस्ता असा नाहीच, सगळा घाटच घाट. सगळा रस्ता भरधाव वेगाने वाहत होता. एखादी गाडी, मधेच कर्णकर्कश हॉर्न वाजवून वातावरणातील शांतता भंग करीत होती. तर कुठे.. ब्रेक मारल्याच्या कचकचीत आवाज काळजाचा ठोका वाढवून जात होता. मोठमोठ्या हायफाय लग्झरी बसेस, आमच्या मिनीबसला अगदी यु ओव्हरटेक करून पुढे जात होत्या. एवढ्या अरुंद घाटातून एकदम सफाईदारपणे ती ड्रायव्हर मंडळी गाड्या हाकत होते. मला त्यांचं खूपच कौतुक वाटत होतं.
शेवटी-शेवटी माझ्या डोळ्यावर सुद्धा फार ताण येऊ लागला. शेवटी, मी माझ्या मेहुण्याला पुढे बोलवून घेतलं. त्याची बऱ्यापैकी झोप झाली होती. आणि.. शेवटी पहाटे पाच वाजता, माझ्या डोळ्याला सुद्धा आराम मिळाला. अगदी काही क्षणात मी झोपेच्या अधीन झालो.
काहीवेळाने अचानक मला जाग आली. एका ठिकाणी आमची गाडी थांबली होती. सकाळचे सात वाजले होते. दोन तासात माझी हवी तेवढी झोप झाली होती. चहा पिऊन ड्रायव्हर विडी पीत बसला होता. पण त्याच्या डोळ्यावर, मला झोप अशी काही दिसत नव्हती. जागरणाचा कमालीचा स्टॅमिना आहे त्या लोकांचा. तीसेक किलोमीटर अंतरावर कुलू गाव होतं. गाडीतील सर्व व्यक्तींनी मुखमार्जन करून चहापान उरकला. आणि पुन्हा एकदा आम्ही कुलू मनालीच्या दिशेने कूच केलं.
क्रमशः

मोबाईल गेला.. दुखः करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. रेल्वे थांबवण्यासाठी चेन ओढायची आठवण सुद्धा झाली नाही. डोकं काम करेना झालं होतं. रेल्वेगाडी सुद्धा खूप दूर निघून गेली होती. चोरट्याने अगदी हेरून काम केलं होतं.
त्यामुळे तुम्हा सर्वांना माझं एक सांगणं आहे.
रेल्वेत प्रवास करताना.. चार्जिंग करण्यासाठी मोबाईल त्या डेस्कटॉपवर कधीही ठेऊ नका. खिडकीपाशी तिथेच खाली पायापाशी एखादी बॅग वगैरे ठेऊन त्यावर मोबाईल ठेवा. जेणेकरून तो कोणाच्या नजरेस पडणार नाही. आणखीन एक गोष्ट, दूरच्या प्रवासातल्या गाड्या, काही मोजक्या स्टेशनवर थांबत नाहीत. पण काही संभाव्य स्टेशनवर त्या थोड्या हळू होतात. आणि मग त्या वेळात, काही रोजचे प्रवासी त्यातून खाली उतरत असतात. हे सवयीमुळे काहींना शक्य झालेलं असतं. पण नेमकं याच वेळी, आपण प्रवाशांनी सावध असणं फार जरुरी असतं. अशावेळी.. चोर लोकं खूप सतर्क असतात. नेमकी हि संधी साधत, ते आपली बॅग वगैरे घेऊन रेल्वेतून पोबारा करू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरत नाही.
संध्याकाळी सात वाजता.. आमची गाडी चंडीगड रेल्वेस्थानकावर पोहोचली. आम्ही सगळं सामान गाडीच्या खाली उतरवून घेतलं. या सफरीत आम्ही एकूण सव्वीस लोकं होतो. सिरीयल टिकत न मिळाल्याने सगळे वेगवेगळ्या बोगीत बसले असल्याने. सर्वप्रथम आम्ही सगळे रेल्वे स्थानकावर एकत्र जमा झालो. आणि स्थानकाच्या बाहेरील बाजूस गेलो. जिथे आमच्या मिनी बसेस ( टेम्पो ट्रॅव्हलर ) पुढील प्रवासासाठी आमची वाट पाहत उभ्या होत्या.
पुढील प्रवासासाठी आमचं जे काही पॅकेज ठरलं होतं. त्याचं देण्याघेण्याचं काम माझे मेहुणे करणार होते. त्यामुळे मी, पोलीस चौकीत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी गेलो. तिथे असणाऱ्या पोलीसाला सगळी हकीकत सांगितली. तर तो पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला आढेवेढे घ्यायला लागला. म्हणाला.. मोबाईल सापडल्यावर तुम्हाला दिल्लीत यावं लागेल. तीन चार चकरा माराव्या लागतील. तुम्हाला हे जमणार आहे का.? एक तर मोबाईल गेल्यामुळे मी त्रस्त झालो होतो. त्यात पोलिसाची हि नवीनच बकबक. मी सरळ त्या पोलिसाला म्हणालो.. मला मोबाईल वगैरे परत नको आहे. फक्त त्या चोराने माझ्या मोबाईलचा काही दुरुपयोग करू नये. ही काळजी घेण्यासाठी मी तक्रार नोंदवत आहे. तेंव्हा त्या पोलिसाला सुद्धा बरं वाटलं. आणि त्याने माझ्याकडून असं लिहून घेतलं. कि.. दिल्ली स्टेशन गेल्यावर, मी माझा मोबाईल गाडीमध्ये शोधत होतो. पण तो काही मला मिळाला नाही. माझा मोबाईल रेल्वेमध्ये गहाळ झाला आहे. संपला विषय, मोबाईल चोराला लखलाभ झाला होता. आणि मला सतरा हजाराला घोडा लागला होता.
तक्रार देऊन बाहेर आलो, मिनी बसवर आमचं सामान लादायचं काम चालू होतं. एकूण तेरा-तेरा लोकं आम्ही दोन बसमध्ये विभागलो गेलो. मिनीबस दिसायला अगदी खटाखट होत्या. पण पुढे प्रवास करताना त्या नेमक्या कशा आहेत. ते समजून येणार होतं. आमचं पॅकेज बुकिंग करणाऱ्या व्यक्तीने आमच्याकडून ठरलेली सगळी रक्कम घेतली होती. पुढील सगळा प्रवास हा फक्त भरवसा या विषयावर होणार होता. तसं प्रवासात सहसा कोणी फसवत नसतं. तरी सुद्धा जर तर हे विषय आपला सतत पिच्छा पुरवत असतातच.
गणपती बाप्पा मोरया.. आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली होती. रात्रीचे नऊ वाजले होते. चंडीगड ते मनाली,, हा तीनशे किलोमीटरचा सगळा प्रवास आम्हाला एका रात्रीत करायचा होता. मी स्वतः ड्रायव्हर आहे, तरी सुद्धा मी रात्री प्रवास करणं टाळत असतो. पण आता काही पर्याय नव्हता. देवावर हवाला ठेऊन आम्ही प्रवासाला सुरवात केली.
थोड्यावेळाने माझी बायको म्हणाली.. सीटच्या बाजूचा पत्रा खूप तापला आहे. आणि आतमध्ये धूर सुद्धा येत होता. मी स्वतः चेक करून पाहिलं, तर हाताला अगदी चटका बसत होता. गाडीने आपले प्रताप दाखवायला सुरवात केली होती. या व्यवसायिक मंडळींना फक्त पैसा हवा असतो. बाकी..गाडीच्या डागडुजीसाठी यांना बिलकुल वेळ नसतो. हि गोष्ट मी ताबडतोब त्या ड्रायव्हरच्या निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला.. पुढे एका ढाब्यावर आपण जेवायला थांबणार आहोत. तिथे पाहूयात, काही गडबड असेल तर मी लगेच काम करून घेतो.
गाडी जेंव्हा थांबली, तेंव्हा पाहिलं तर, गाडीचा सायलेंसर.. बस बॉडीच्या पत्र्याच्या आतील बाजूस आला होता. आणि त्यामुळे, इंजिनमधून बाहेर पडणार गरम धूर गाडीच्या पत्र्यावर आतील बाजूस आडत होता. त्यामुळे गाडीचा पत्रा गरम होत होता. आणि गाडीमध्ये धूर सुद्धा येत होता. हे आमच्या वेळीच ध्यानात आलं म्हणून बरं. नाहीतर, पुढे काहीही घडू शकलं असतं. कदाचित आमच्या बसने पेट सुद्धा घेतला असता. पण आमचं नशीब बलवत्तर म्हणून हे सगळं काही वेळीच समजून आलं. काही वेळात, हा प्रोब्लेम सॉल झाला. आणि निश्चिंत मनाने ढाब्यावरील जेवणाचा आम्ही आनंद लुटला.
क्रमशः

Monday, 27 August 2018



भटकंती करायला आवडत नाही, असा मनुष्य शोधून देखील सापडणार नाही.
पण, भटकंती करण्यासाठी.. एकतर आवड असावी लागते. आवड असली तरी सवड असावी लागते, सवड असली तर निवड असावी लागते, आणि निवड असेल तर.. खिशात मुबलक पैसा सुद्धा असायला पाहिजे. तेंव्हा कुठे हि सगळी गणितं जुळून येतात..
खरं तर.. या लेह लदाख ट्रीपला जाण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. पण इच्छा झालीय म्हणाल्यावर काहीतरी जुगाड करावा लागतोच. म्हणून या ट्रीपसाठी मी चक्क कर्ज काढून गेलो.
आता काही व्यक्ती, माझ्या या विधानावर आश्चर्य व्यक्त करतील. कदाचित मनामध्ये म्हणतील सुद्धा, हा निव्वळ वेडेपणा आहे. कर्ज करून कोणी फिरायला जात असतं का.?
पण असा विचार करणाऱ्या व्यक्तींना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
आपण, घर घेण्यासाठी कर्ज काढतो. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो. इतकच काय, घरातील कोणी व्यक्ती आजारी पडलं, तर त्याच्या उपचारासाठी सुद्धा कर्ज काढतो. मग स्वतःचा जीव रमवण्यासाठी आपण कर्ज काढू शकत नाही का.?
जीवनाचा काय भरवसा आहे हो. आज आहे, तर उद्या नाही. कर्ज काय आजचं उद्या फिटून जाईल. पण वेळ निघून गेल्यावर, हात पाय चालायचे बंद झाल्यावर, हाती आलेला बक्कळ पैसा कोणत्या कामाचा असणार आहे.?
त्यावेळी इच्छा असून सुद्धा आपण फिरायला जाऊ शकत नाही. आणि सरतेशेवटी, आपण जमा केलेला सगळा पैसा चोरांच्या हवाली करावा लागतो. पोरं म्हणजे दुसरे चोरच हो. सगळेच सारखे नसले तरी, काही अंशी आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळत असतातच. त्यामुळे, मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता. कर्ज करून फिरायला गेलो. आणि मी जे काही पाहून आलो, त्याने नक्कीच ताजातवाना आणि, अतिरिक्त उर्जा सुद्धा सोबत घेऊन आलो.
कुलू-मानली, रोहतांग पास, जीस्पा व्हॅली, लेह-लडाख, खारदुंगला टॉप, नुब्रा व्हॅली, च्यांगला पास, पेंगोंग लेक, अमरनाथ आणि वैष्णोदेवी..
माझ्या प्रवासाचा एकंदरीत असा रूट होता. एकाच धडकेत मी उत्तरेतील बराच पट्टा पालता घालून येणार होतो. त्याभागात पुन्हा कधी जाणं होईल कि नाही ते माहित नव्हतं. त्यामुळे, ट्रीपला जाण्या अगोदर गरीब गरिबीत पंधरा हजाराचा नवा कोरा रेडमी मोबाईल खरेदी केला. त्यात चौसष्ट जीबीची स्पेस आणि चार जीबी रॅम असल्याने, मला मनसोक्त फोटो काढता येणार होते. आणि हव्या तेवढ्या चित्रफिती तयार करता येणार होत्या. साधारण पंधरा दिवस अगोदर माझ्या सगळ्या खरेद्या चालू होत्या. उबदार कपड्या पासून ते अगदी सुख्या मेव्याची सुद्धा तजवीज करून ठेवली होती. आवश्यक असणारी औषधं घेतली, ट्रीपला आमच्यासोबत एक नर्स सुद्धा होत्या, त्यामुळे त्यांनी सुद्धा बरीच औषधं सोबत घेतली होती. काळजी करण्याचं काहीएक कारण नव्हतं. त्या भागात फक्त बी.एस.एन.एल. ला रेंज असल्याने, ते सिमकार्ड सुद्धा घेऊन ठेवलं. कशाची म्हणून उणीव ठेवली नव्हती.
आणि शेवटी तो दिवस उजाडला.. यशवंतपूर एक्सप्रेसने पुण्याहून आम्ही चंडीगडच्या दिशेने रवाना झालो. लेह लडाखच्या ट्रीपला कोणी जावं.? याबाबतचे काही निकष ठरलेले आहेत. पण तरीसुद्धा, आमच्या चमूमध्ये, वय वर्ष सतरा ते सत्तर वर्षांचे एक ग्रहस्थ सुद्धा होते. रेल्वेच्या प्रवासातील पहिला दिवस अगदी आनंदात गेला.
दुसरा दिवस उजाडला, आता काय दिवसभर चरत बसण्यातच वेळ जाणार होता.
दुपारी तीन वाजता आम्ही दिल्ली स्थानक सोडलं. तेंव्हा आमची नुकतीच जेवणं उरकली होती. थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून मी स्लीपर कोचवर कलंडलो. झोपेत.. खिशात असणाऱ्या मोबाईलचा अडसर नको. म्हणून तो मोबाईल मी चार्जिंग पॉइंटच्या डेस्कवर ठेवला. माझा नुकताच डोळा लागायला लागला होता. आणि कोणीतरी जोरदार किंचाळल्याचा आवाज झाला. तसा मी दचकून जागा झालो. मला वाटलं, आमच्यापैकी कोणी गाडीतून खाली पडलं कि काय.? पण नाही.. तिथे एक वेगळाच प्रकार घडला होता.
दरवाजात उभं राहून खिडकीत हात घालून चालत्या गाडीतून एका चोराने अगदी चपळाईने माझा नवा कोरा मोबाईल लांबवला होता. त्या डेस्कवर एकूण चार मोबाईल होते, पण त्या चोराने अगदी हेरून माझा नवा कोरा मोबाईल चोरला होता.
हे सगळं काही अगदी एका क्षणात घडलं होतं. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच, तो चोर मोबाईल घेऊन चालत्या रेल्वेतून उडी मारून पसार सुद्धा झाला होता. झालं.. मोबाईल चोरीला गेला, आणि इथेच माझ्या ट्रीपचं खोबरं झालं असं मला वाटून गेलं. घडला विषय मी लगेच सोडून दिला. कारण.. माझी बायको जिथे खिडकीपाशी बसली होती. तिथेच तिने तिची पर्स सुद्धा ठेवली होती. आणि त्यात रोख चाळीस हजार रुपये होते. चुकून त्या चोराने ती पर्स नेली असती तर..?
हातातलं नेलं होतं, नशिबातलं थोडीच घेऊन जाणार आहे. असा विचार केला, पण मोबाईल नसल्याने आता बराच मोठा खोळंबा होणार होता. फोटो आणि चित्रफितीचा विषय संपला होता. आणि तेवढ्याच रकमेचा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी माझ्याकडे मुबलक पैसा सुद्धा नव्हता. त्यामुळे, जुन्या मोबाईलवर जमेल तितकं शुटींग आणि फोटो टिपूयात असा विचार केला. आणि, पुढील मार्गाला लागलो.
क्रमशः

Monday, 20 August 2018




आनंद सागर हे अतिशय सुंदर असं फिरण्याचं ठिकाण आहे. पण हल्ली येथील सर्व यंत्रणा कायद्याने बंद पाडण्यात आल्या आहेत. काही विघ्न संतोषी लोकांनी, हे महान कार्य याठिकाणी सुरळीतपणे पार पाडलं आहे. तेच हो.. आपल्या मराठी माणसाची खेकडा प्रवृत्ती.
तिथे असणारी रेल्वेगाडी किंवा इतर खेळणी बंद आहेत, फक्त ध्यान केंद्र चालू आहे. व एका कृत्रिम सरोवराच्या किनार्याने बगिचात फिरता येतं. एक धार्मिक ठिकाण, आणि सोबतच भटकंतीसाठी हे ठिकाण फारच सुंदर आणि कमी खर्चिक आहे.
या आनंद विहारात.. सर्व खेळ आणि रेल्वेगाडी बंद का आहे.? अशी विचारणा मी तेथील एका कर्मचाऱ्याला विचारलं. तर तो म्हणाला.. दुरुस्तीची कामं चालू आहेत.!
त्यावर.. बगीचा फिरून झाल्यावर, आम्ही ध्यान मंदिरात गेलो. तिथे काहीवेळ ध्यानधारणा केली. आणि अभिप्राय वहीत मी माझा अभिप्राय नोंदवला. कि नादुरुस्त खेळणी लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. जेणेकरून पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
त्यावर पुन्हा एकदा, अगदी जागेवरच माझ्या शंकेचं निरसन करण्यात आलं. कि सरकारच्या काही अटीमुळे सगळी खेळणी बंद करण्यात आली आहेत. आणि भविष्यात हि खेळणी सुरु होतीलच म्हणून सांगता येत नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं, कि तुमच्या कर्मचारी लोकांना पर्यटकांना खरी माहिती सांगत चला असे आदेश द्या. त्यामुळे, विविध शंकांना मनामध्ये वाव उरणार नाही. या मानव निर्मित गार्डनमध्ये असणाऱ्या खारुताई खूपच मानसाळल्या आहेत. अगदी आपल्या जवळ येऊन बसतात. आपण देऊ ते खातात. मी तर अगदी त्यांच्या शेजारी बसून त्यांची चित्रफित बनवली आहे. सरोवरात विविध परदेशी पक्षी पाहायला मिळतात.
इथे असणाऱ्या भोजनालयात.. जेवणाची थाळी फक्त पस्तीस रुपयाला होती. खरं तर शेगाव देवस्थानाच्या अखत्यारीत सर्व ठिकाणी एकच जेवण जात असतं. अकोट रोडला, त्यांचा जेवण बनवण्यासाठीचा फार मोठा किचन आहे. देवस्थानात आणि गेस्ट हाऊसला सगळीकडे पन्नास रुपयात अमर्याद थाळी आहे. आणि तिथे जेवण वाढायला वाढपी ( सेवेकरी ) सुद्धा आहेत. फक्त याच ठिकाणी, जेवण घेतल्यावर वाढपी येत नाहीत. आपल्याला जाऊन जेवण घेऊन यावं लागतं. त्यामुळे जेवताना मधेच उठून गेल्यावर, जेवायची लिंक तुटते.
हे असं का केलं आहे..? ते बाकी मला समजलं नाही. जेवणाचे आहे तितके पन्नास रुपयेच घ्या. सेवेकरी ठेवा, बगिचात फिरून दमलेल्या लोकांना पोटभर जेऊद्यात. हि एवढी एकच त्रुटी वगळली, तर बाकी सगळं काही आलबेल आहे.
शेगांव संस्थान चे " Managment-Guru "
" अशाच मेनेजमेंट गुरूची प्रत्येक संस्थेत नितांत गरज आहे.! "
माणसामधला देवमाणूस, कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ.
शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी, त्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला ते सगळे श्रध्देने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडविले. संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयापर्यंत आणली, त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.
शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखा काही विषय सांगून समजत नाही. ते प्रत्यक्ष पाहावे लागतात ऐकण्याचा आनंद वेगळाच. शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नाही. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे जेष्ठ नेते भाऊंना माणतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकुन नमस्कार करतात, ते म्हणजे आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित, हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त ते नेहमीच शेगावी येतात. भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले, की त्यांनी भाऊंना सांगितले. या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा. विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी, कोण येवढे पैसे देईल.?
देणाऱ्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल..? लिखापढी नाही, जामीन नाही , कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो. विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. की, किती पैसे लागतील याचा हिशोब केला. किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले. आणि अस ठरवलं, की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे . आणि फक्त ७० कोटी घेतले त्यांची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.
भाऊ म्हणाले मी कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शरद पवार म्हणाले मी शिफारस करतो भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या. त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं , सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे , भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहेत. अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला, आणि तुम्ही काय करीत आहात..? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी , चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे , आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही, आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही. आणि तशी वस्तूने पण होत नाही.
माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो ते सुत्र आम्ही पाळले. विक्रम पंडितांनी जेंव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले जेवढे लागतील तेवढे घेऊ ७० कोटी घेतले, त्यांनी पण जाहिरात केली नाही, आणि आम्हीही जाहिरात केली नाही हा भक्तीचा व्यवहार आहे. लोक मला सांगत आहे भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा लोक आनंदाने देतील , मी सांगितले नाही, अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही. आम्ही ती फी फक्त २५ रुपये ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहेत. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो रुग्णालये आहेत , औषधे आहेत १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवतो.
भक्त निवास कशी बांधली आहेत बघा. बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते, ते फक्त इथेच यायचे. देऊळातही जात नाही म्हणायचे, आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो. काम श्रध्देने करा, प्रामाणिकपणे करा, आमच्या शेगांव नगरपालिकेकडे पाणी योजनेला पैसे नव्हते. शेगांव शहरात कमालीची अडचण स्वच्छ पाणी मिळेना, पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळायचे, नगर परिषदेचे अधिकारी पाटणकर माझ्याकडे आले. म्हणाले, की पाणी योजना करायला केंद्र सरकार ४२ कोटी रुपये देत आहेत. पण, नगर परिषदेचा वाटा ७/८ कोटी रुपये द्यायलाही पालिकेकडे पैसा नाही. काय करायचे..? मी म्हटले, चिंता करू नका.
संस्थानच्या सर्व विश्वस्थांना सांगून, त्यांच्या मान्यतेने नगर परिषदेला हवे असलेले ७ कोटी ७७ लाख रुपये आम्ही देऊन टाकले. महाराजांच्या आदेशानेच हे केले, आज शेगांवला जे पाणी मिळत आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आया-बहिणीचे कष्ट वाचले आहेत. त्यांच्या समाधानात आम्ही आमचे समाधान मानतो, तुम्ही त्याला नाव द्या सामाजिक बांधीलकी आम्ही म्हणतो आमचे कर्तव्य.
लेखक अज्ञात..
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

Friday, 17 August 2018





पुण्यावरून शेगावला दर्शनासाठी जायला जास्ती वेळ खर्ची पडत नाही. शनिवारी रात्री, साडेअकराच्या महाराष्ट्र एक्सप्रेसने शेगावला निघायचं. रविवारी सकाळी साडेदहा वाजता तुम्ही शेगावी पोहोचता. भक्त निवासात एखादी रूम घेऊन, अंघोळ उरकली. कि मंदिरात जाऊन तासाभरात दर्शन आटोपून जातं. आनंद सागराला अगदी धावती भेट देऊन आलात तरी जमून जातं. संध्याकाळी आठ वाजता, शेगाव वरून आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवासाला सुरवात करायची. सकाळी सात वाजता तुम्ही पुण्यात पोहोचताय. अशी एकही सुट्टी खर्च न करता, रात्रभर प्रवासात झोप घेऊन, तुम्ही या ठिकाणी दोन रात्री आणि एक दिवसात जाऊन येऊ शकता.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता, आम्ही शेगावी पोहोचलो. शेगाव रेल्वेस्थानकावरून बाहेर पडल्या बरोबर, देवस्थानाच्या बसेस यात्रेकरूंना भक्त निवासापर्यंत नेण्यासाठी उभ्या होत्या. आणि हि सेवा चक्क विनामुल्य होती. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सर्व गोष्टी येथे केल्या गेल्या आहेत. तीच भव्यता, तीच स्वच्छता, आणि तेच देखणेपण.
मंदिराजवळ असणाऱ्या भक्त निवासात जागा उपलब्ध नसल्याने, तेथून तीनेक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंद विसावा नामक भक्त निवासात संस्थेच्या बस मधून आम्हाला तिथवर नेण्यात आलं. इथे आम्हाला एक रूम नऊशे रुपयाला मिळाली. आणि आम्ही सुद्धा ती मुद्दाम घेतली. शे दोनशे रुपयात आम्हाला रूम नक्कीच मिळाली असती. पण या ना त्या निमित्ताने, जादा रकमेची रूम घेऊन त्या देवस्थानाला आर्थिक मदत सुद्धा करता आली.
आनंद विसावा इथे असणाऱ्या रूम खूपच स्वच्छ नीटनेटक्या आणि सर्व सोयींनी परिपूर्ण होत्या. एका रुममध्ये सहा लोकं आरामशीर झोपू शकतील अशी त्याठिकाणी व्यवस्था करण्यात होती. अंघोळीला गरम पाण्याची सोय, आणि एक मोठा कुलर सुद्धा त्याठिकाणी उपलब्ध होता.
याठिकाणी, सर्व परिसरात फार मोठ्या प्रमाणात फुल झाडं लावण्यात आली आहेत. त्यामुळे, तिथे विविध रंगीबेरंगी फुलपाखरांचा सतत वावर असतो. सेवेकरी मंडळी, कचरा म्हणून रस्त्यावर झाडाचं एक पान दिसू देत नाहीत. इतकी कमालीची स्वच्छता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
आनंद विसावा, आनंद विहार आणि मंदिरा नजीक असणाऱ्या भक्तनिवासात एकूण सोळा ते सतराशे रूम्स उपलब्ध आहेत. याशिवाय.. जास्तीची गर्दी झाल्यास, मोठ्या हॉलमध्ये प्रती व्यक्तीला पन्नास रुपये याप्रमाणे एक बेड दिला जातो. हे देवस्थान, त्यांना जितपत सोय करता येतेय. तितपत करण्याचा प्रयास करत आहेत. धन्य आहेत येथील ट्रस्टी.
या देवस्थानात मिळणारं जेवण ( महाप्रसाद ) खूपच चविष्ट असा आहे. फक्त पन्नास रुपयात पोटभर आणि अमर्याद महाप्रसाद मिळतो. नाश्ता आणि चहा कॉफी सुद्धा उत्कृष्ट आहे. सात ते पंधरा रुपयापर्यंत उपलब्ध आहे.
इथे प्रत्येक ठिकाणी, जागोजागी.. अभिप्राय लिहिण्यासाठी वह्या ठेवल्या आहेत. आणि विशेष म्हणजे, अभिप्राय लिहिताना तेथील कर्मचारी आपला अभिप्राय वाचत असतात. आणि तो अभिप्राय सूचनात्मक वाटल्यास, लगेच आपल्या वरिष्ठांना त्याची माहिती कळवतात. आणि जागेवरच आपलं शंका समाधान करतात. मी आजवर कित्तेक ठिकाणी अभिप्राय लिहिले असतील, पण आजवर माझ्या अभिप्रायाची दखल घेणारं हे एकमेव संस्थान माझ्या पाहण्यात आलं.
मंदिराची वैशिष्टे खालीलप्रमाणे.
रेल्वेस्टेशन बाहेर रिक्षा तळ आहे. तिथे मंदिरात किंवा भक्त निवासात जाण्यासाठी एका व्यक्ती साठी दहा रुपये घेतले जातात. तसेच रिक्षा तळाजवळ उजव्या बाजूला संस्थेची मोफत बस सेवा, दर पंधरा ते तीस मिनिटांनी उपलब्ध आहे. प्रवाशांनी पूर्ण भरल्याशिवाय बस जागेवरून हालत नाही. याची यात्रेकरूंनी नोंद घ्यावी.
भक्त निवास या ठिकाणी पोहोचल्यावर भक्त निवास क्रमांक पाच या ठिकाणी जाऊन रूम बुक करून घ्याव्यात. याठिकाणी रूम उपलब्ध न झाल्यास, तेथून जवळच असणाऱ्या.. आनंद विहार किंवा आनंद विसावा भक्त निवासामध्ये रूम बुक कराव्या. याठिकाणी पाचशे ते नऊशे रुपयात मस्त रूम उपलब्ध आहेत.
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fyoutu.be%2F8MixeqSmmWY&h=AT1Mf3ObcBJgv9ciiZyh_9Kp9W3SEyBbyvOhKb-xbM4z64Tg7wGXdwy1BGoVqqpqOXVCRFLU3O-p8C09rOMFsI-147nAgp-MUetvZMB9Fcj3SPnirPNi32rSHB7pI9OpwzL6Vtk8t8daOqImh7kkycTOtOkXgpcrLmgG1ATQsztWQC-8y-kVtztjq9V2pnwuNDrJTAN01DOIBa6Oj9XJwd7xlCdKYw6igwG9WYxX43-S4OSE2EEclmjhKSFO_IRhuHjC77w2ct3T7OJUWgn0_u9Og_OX8K73GNb48XFmXWeREqK7mdp_3c6DdJXruWfrwakzNfz5lxbR5DTm2ElzrpxcMq5iC1z3V1BFxic

Thursday, 16 August 2018

परवाच मी शेगावला जाऊन आलो. तसं तर, विदर्भ आणि माझं फार जुनं नातं आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी, तब्बल सात वर्ष या भागात मी अविरत वाऱ्या केल्या आहेत. पण त्या सात वर्षाच्या काळात, श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मी तिथे फक्त एकदाच गेलो होतो. त्याला सुद्धा आता, तब्बल एकवीस वर्षांचा कालावधी लोटला आहे.
त्याकाळी.. तिथे फक्त समाधी मंदिर होतं, म्हणावी अशी भव्यता नव्हती. थोडं अंधुकसं आठवतंय, कि.. मंदिराच्या बाजूलाच एका प्रसादालयात प्रसाद म्हणून, एक भलीमोठी चपाती आणि त्यावर भाजी दिली जायची. आणि हा प्रसाद फक्त एकदाच आणि विनामूल्य मिळायचा.
त्यानंतर.. परवा मला पुन्हा एकदा गजाजन महाराजांचं बोलावनं झालं. आणि खरोखर हे देवस्थान आणि त्याचा झालेला कायापालट पाहून मी अगदी मोहित होऊन गेलो.
गजानन महाराज संस्थानात.. फक्त तीन ते चार हजार कर्मचारी मानधनावर काम करत आहेत. अशी माहिती मला त्याठिकाणी मिळाली. आणि त्यांना मिळणारं मानधन सुद्धा अगदी अत्यल्प..म्हणजे, मासिक पाच ते नऊ हजार रुपयांच्या घरात आहेत. याव्यतिरिक्त त्या कर्मचाऱ्यांना राहायला घरं, मुलांचं शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा मोफत देऊ केल्या आहेत. बस्स.. फक्त येवढ्या तुटपुंज्या मिळकतीवर ते भक्तगण तिथे सेवा करत आहेत. इथे सेवा देणाऱ्या कोणत्याच कर्मचाऱ्याला व्यसन नाहीये. चुकून एखादा व्यसनी सेवेकरी आढळलाच, तर त्याला सेवेतून पायउतार केला जातो. हि तेथील शिस्त आहे.
यावर आणखीन एक कोटी मला त्याठिकाणी पाहायला मिळाली. तो विषय म्हणजे..
" सेवेकरी " सेवेकरी हा असा विषय आहे. कि, इथे सेवा देणारे भक्तगण आपल्या सेवेचा काहीच मोबदला घेत नाहीत. सर्व सेवा अगदी विनामूल्य दिल्या आणि केल्या जातात. आणि जे विनामुल्य सेवा करत असतात, त्यांना काम करा म्हणून सांगावं लागत नाही. ते उत्स्फूर्तपणे आपली भूमिका बजावत असतात.
पेड वर्करच्या मागे लागून काम करून घ्यावं लागतं. पण इथे फक्त सेवा हा विषय असल्याने, सगळे भक्तगण आणि सेवेकरी आपली सेवा चोख बजावत असतात. थोड्या चौकशीअंती मला हे समजून आलं. कि त्या संस्थानाचे विश्वस्थ श्री. शिवशंकर पाटील नामक गृहस्थ आहेत. त्यांच्या सुपीक मेंदूतून हि सेवेकरी कल्पना उदयास आली.
आज त्याठिकाणी लाखो भाविक येत असतात, त्यांना सेवा पुरवण्यासाठी किमान दहा एक हजार कामगार तरी नक्कीच लागले असते.
मग देवस्थानात सेवक भरती करा, ते करताना वशिलेबाजी आली, घुसखोरी आली. या सगळ्या विषयांना फाटे देत. पाटील साहेबांनी खूपच कमालीची सेवा त्याठिकाणी घडवून आणली आहे.
" ज्याठिकाणी अर्थकारण आलं, त्याठिकाणी.. समाजकारण कदापी होऊ शकत नाही..!! "
काल माझी हि पोस्ट वाचून, बऱ्याच व्यक्तींच्या मनात एक शंका उत्पन्न झाली असेल. कि आज हे असं लिहिण्यामागे काही खास कारण असावं का.? तर काही व्यक्तींनी विनाकारण हि पोस्ट आपल्याला उद्देशून लिहिली आहे. असा सुद्धा समज करून घेतला असेल.
पण या विषयांतर्गत मला काहीतरी वेगळंच सांगायचं आणि मांडायचं होतं, ते हेच.
जो व्यक्ती खरं समाजकारण आणि समाजसेवा करत असतो, तिथे आर्थिक विषयाला बिलकुल थारा नसतो.
इथे सेवा देणारे सेवेकरी.. महिन्यातून फक्त पाच दिवस सेवा देत असतात. विदर्भात गावोगावी असे हजारो सेवाभावी गट स्थापन झाले आहेत. आणि ते सर्व गट, या देवस्थानात अगदी विनामुल्य सेवा देत आहेत. या सेवेमध्ये.. झाडूकाम, साफसफाई, बगिचांमध्ये देखभाल, वीजतंत्री, चर्मकारी, भोजनालयात वाढपी अशी कित्तेक कामं अगदी सेवाभावाने होत असतात. इथे सेवा देणारे सेवेकरी इतके विनम्र आहेत, कि.. सेवा देताना ते कोणाकडूनही बिदागी स्वीकारत नाहीत. फक्त त्यांच्या मुखात एक नाव असतं " माऊली " बस.. बाकी त्यांना दुसरं काहीच नको असतं. नाहीतर.. पुणे भागात, आता नवीनच " ग्रुप " उदयास येऊ लागले आहेत. आणि राजकीय वरदहस्तामुळे, गुन्हेगार वाढीस चालना मिळू लागली आहे. त्यामानाने.. ग्रामीण भागातील हा सेवेकरी उपक्रम नक्कीच अंगीकारावा असा आहे.
शिर्डीचे साईबाबा हे संस्थान फारच श्रीमंत असं देवस्थान मानलं जातं. त्याच्या खालोखाल, श्री स्वामी समर्थांचे सुद्धा बरेच भक्तगण आहेत. माझ्या माहितीप्रमाणे.. वरील दोन्ही देवस्थानांचं आर्थिक उत्पन्न जितकं असणार आहे. तितकं शेगावच्या देवस्थानाला आर्थिक उत्पन्न नसणार आहे. पण असं असताना सुद्धा, हे देवस्थान.. वरील दोन्ही देवस्थानच्या तुलनेने मला फारच उजवं वाटलं. कारण.. इथे असणारे ट्रस्टी हे अगदी धेय्य्वेडी लोकं असणार आहेत. त्यांच्या अंगी, काहीतरी नवीन करून दाखवण्याची भयंकर तळमळ असणार आहे. आणि हि तळमळ जेंव्हा आपल्या अंगी बाणली जाते. त्यावेळी असं काहीतरी भव्यदिव्य पाहायला मिळतं.
पैसाच सर्व काही नसतो, त्याकरिता आपल्या अंगी प्रामाणिक जिद्द असावी लागते. हे या ठिकाणी मला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि आवर्जून सांगावसं सुद्धा वाटलं.
श्री गजाजन महाराजांचं मंदिर खूप देखणं आहे. विशिष्ट कलाकुसरीच्या सहाय्याने खूपच सुंदर असं मंदिर उभारण्यात आलं आहे. मंदिरातील शिस्त अगदी वाखाणण्याजोगी आहे, कुठेही गोंधळ गडबड पाहायला मिळत नाहीत. कोणताही सेवेकरी मंदिरात भक्तांकडून दान दक्षिणा मागत नाही. कोणाशीही उद्धटपणाने बोलत नाहीत.
आम्ही गेलो त्यादिवशी.. मंदिरात म्हणावी अशी गर्दी नसल्याने. अगदी दहा मिनिटात आमचं दर्शन झालं. आणि ते दर्शन सुद्धा खूपच निवांत झालं. श्रींच्या समाधीसमोर आम्हाला बराच वेळ व्यतीत करता आला. बालाजी, शिर्डी, अक्कलकोट इथे नित्यनेमाने जाणाऱ्या भक्तगणांनी शेगावी सुद्धा आवर्जून जावं. आणि या देवास्थानाची भव्यता एकवार नक्की पाहून यावी.
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

https://youtu.be/CeHjCnUbWao

Thursday, 2 August 2018

पुण्यावरून नेलेल्या नवीन सुमो गाड्या, दुपारी बारा वाजता नागपुरातील सदर येथील जयका मोटर्स मध्ये जमा केल्या. कि तिथेच अंघोळी उरकून, नागपूरच्या उखाड्याला रामराम करत आम्ही बर्डीला ( सीताबर्डी ) निघून जायचो. तिथे असणाऱ्या, सिंधी व्यक्तीच्या एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये काहीतरी पोटपूजा करायची. आणि.. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी, लग्झरी गाड्यांच्या ऑफिसपाशी घुटमळत राहायचो. नागपुरात सगळे सिझन अगदी कडक असतात. पाऊस मी म्हणून धोधो पडत असतो. थंडी सुद्धा खूपच बोचरी असते. आणि उन्हाळा तर अगदी तुम्ही विचारू नये, आणि मी सांगू नये. इतका जीवघेणा असतो.
वीस वर्षांपूर्वी.. नागपूर ते पुणे प्रायव्हेट लग्झरी बसने प्रवासासाठी वेगवेगळ्या प्रवासी कंपनीचे चारशे ते आठशे रुपये असे वेगवगळे दर ठरलेले असायचे. त्यावेळी आमचं अगदी हातावरील पोट, त्यामुळे.. लग्झरी मध्ये प्रोपर तिकीट बुकिंग करून आम्ही कधीच येत नसायचो.. .
एखाद्या बसची किती बुकिंग झाली आहे ते पाहायचो, त्यात सीट्स रिकाम्या असतील. तर त्या गाडीच्या ड्रायव्हरला सांगून आम्ही आमची सेटिंग करून घ्यायचो. सीट शिल्लक नसेल, तर ड्रायव्हर केबिन जिंदाबाद.
बर्डीवरून बस निघाली, कि तिचा पहिला थांबा रवीनगरला असायचा. मग आम्ही, तेथील ऑफिस पासून शे दोनशे मीटर लांब पुढे जाऊन थांबायचो. रवीनगर पासून बस निघाली, कि त्या भागात थोडासा चढ होता. चढावर गाडी आली कि आम्ही जिथे थांबलो असु, त्या भागात मोठ्याने हॉर्न वाजवत तो ड्रायव्हर गाडीचा वेग किंचित कमी करत गाडी अगदी हळुवार रस्त्याच्या कडेला घ्यायचा. थांबलेल्या बसमध्ये अगदी विजेच्या चपळाईने आम्ही शिरकाव करायचो. हि लगबग, आम्हाला अगदी दोन पाच सेकंदात उरकावी लागायची. ती ड्रायव्हर मंडळी सुद्धा आमच्याच जातकुळीतले असल्याने. आम्हाला, फक्त दोनशे रुपयात ते पुण्याला आणून सोडायचे. या वरकमाई मध्ये, त्यांचा सुद्धा वरखर्च भागून जायचा..!
दुपारी चार वाजता नागपुरातून निघालेली गाडी, साधारण सात वाजेपर्यंत अमरावती मध्ये पोहोचायची. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही गाडगेबाबा नगर बायपासला गाडीच्या खाली उतरून पुन्हा धावत पळत त्या लग्झरीच्या ऑफिसच्या पुढे जाऊन थांबायचो. कारण त्या ऑफिसचे लोक बसमध्ये येऊन सगळी बुकिंग चेक करायचे. आणि सगळं काही आलबेल असलं, कि ती गाडी तेथून पुढे रवाना व्हायची. या सगळ्या धामधुमीत अर्धा पाऊन निघून जायचा. आणि साधारण आठ वाजता, अमरावती सिटी पास केल्यावर हॉटेल मोहिनी मध्ये ती गाडी जेवणासाठी थांबायची.
हायवेवर असणाऱ्या हॉटेलमध्ये नेहेमी थांबणाऱ्या गाड्यांच्या ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांना अगदी हवं ते जेवण मोफत दिलं जायचं. अशा वेळी, ती ड्रायव्हर मंडळी आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला न्यायची. त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च वाचायचा. कधी कधी ती ड्रायव्हर लोकं प्रेमाखातर आम्हाला म्हणायचे.
" दारू, गिरु पियेंगा क्या बावा. "
त्यावेळी.. एकतर आम्ही याचक असायचो. आम्ही कितीही नाही म्हणलं तरी, आमचा चेहरा पाहून त्यांना समजायचं. हा गडी दारू पिण्यास इच्छुक आहे.
आता.. हॉटेलमध्ये सगळे प्रवासी बाहेर जेवायला बसलेले असायचे. आणि चुकून कोणाची नजर गेली, कि ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दारू नेली जात आहे. तर फार मोठी गोची होऊन बसेल. म्हणून हि लोकं त्या वेटरला अगोदरच सांगून ठेवायचे. कोणालाही नकळतपणे माल घेऊन ये.
एकदा असाच आखाड महिना चालू होता, आणि आम्ही तीन मित्र ड्रायव्हर सेटिंग मध्ये लग्झरी बसमधून नागपूर-पुणे असा प्रवास करत होतो. अमरावती मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये गाडी थांबली. आता या ड्रायव्हर मंडळींना गाडी चालवायची आहे, म्हणजे त्यांना काही दारू पिऊन जमणार नाही. पण काही लोकांना एक आवड असते बघा. दुसऱ्याला पिताना पाहून, ते स्वतः समाधानी होत असतात. त्यावेळी सुद्धा नेमका असाच प्रकार घडला. त्या ड्रायव्हर मित्राने, आखाड पार्टी म्हणून, खास आमच्यासाठी तीन बियर मागवल्या. तसा त्यांनी वेटरला आदेश सोडला.
तीन बियर.. एक खाली जग में डालके ला, किसीको पता नही चलना चाहिये..!
तो वेटर सुद्धा ते सांगतील तसच ऐकायचा. कारण, नाही ऐकलं तर हि लोकं उद्यापासून जेवणाचं ठिकाण बदलतील. कारण एका वेळेला चाळीस पन्नास लोकांचं जेवण व्हायचं. आणि पर्यायाने त्या हॉटेल व्यावसायिकाचा धंदा सुद्धा खूप जोरात व्हायचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सहजशक्य व्हायच्या. मग आम्ही ड्रायव्हर मित्र मिळून दोन-दोन ग्लास बियर मारायचो.
ती नागपुरातील ड्रायव्हर मंडळी, खास आमच्या करिता एवढी उठाठेव करायची. त्यादिवशी त्यांनी खास आमच्यासाठी चिकन हंड्या आणि मोहिनीची स्पेशल बिर्याणी मागवली होती..
त्यावेळी माझी फारच गरिबी होती. अगदी हातावरचं पोट म्हणा ना. पण माझी तोंडाची श्रीमंती फार मोठी होती. माझ्या तोंडाच्या श्रीमंतीने, मी लगेच कोणालाही आपलंसं करून घ्यायचो.
नंतर जेवणं करून आम्ही पुढील प्रवासाला लागायचो. त्याकाळी, पैसे कमवण्यासाठी स्ट्रगल करत असताना. लग्झरी बसमधील बराचसा प्रवास मी बसच्या केबिनमध्ये बसून केला आहे. फारच झालं तर, दोन्ही सीटच्या मध्ये असणाऱ्या चालत जायच्या जागेत झोपून आराम करत पुण्याला आलो आहे. तोच काय माझ्यासाठी एक नंबर बेड असायचा.
पण.. त्या सात वर्षाच्या काळात, त्या विविध ट्रेव्हल कंपनीच्या ड्रायव्हर मित्रांकडून प्रवासादरम्यान कधीही अपघात घडला नाही. आणि आमच्याकडून सुद्धा, कोणत्याही प्रवाशाला काही त्रास होईल अशी वागणूक घडली नाही.