Thursday, 30 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ४ )
=====================
जसजशी बस पुढे जात होती, तसतसं कुलू जवळ येऊ लागलं होतं. आणि माझं मन पुन्हा एकदा भूतकाळात जात होतं. मी खूप आठवायचा प्रयत्न करत होतो. पण माझा अपघात झालेलं ठिकाण माझ्या टापूत येत नव्हतं. कारण.. गेल्या दहा वर्षात तिथे आता बरेच बदल झाले आहेत. रस्ते भयंकर रुंद झाले आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळच चैतन्य संचारलं आहे. मी ज्या इस्पितळात प्रथमोपचार घेतले होते, ते ओयासिस नावाचं इस्पितळ सुद्धा मला दिसलं नाही. शेवटी एका ठिकाणी माझं मन अगदी सैरभैर झालं. बहुतेक हे तेच ठिकाण असावं, असं मला जाणवून गेलं. आणि नकळत माझे दोन्ही हात जोडले गेले. अपघातानंतर याच दरीतून चालत मी वर आलो होतो. आणि त्यामुळेच आज मी जीवित होतो. कटू आठवणी सरता सरत नव्हत्या..
काही अंतर पुढे गेल्यार, एका ठिकाणी.. कसला तरी टोल भरायचा होता. त्यामुळे आमची गाडी बाजूला घेण्यात आली. तितक्यात काही गुलाबी गालाच्या ललना आमच्या बसपाशी आल्या, त्यांच्या डोक्यावर एक छोटीशी टोपली होती. त्यात विविध प्रकारची फळं त्यांनी विक्रीसाठी आणली होती. त्यात.. चेरी, आलू बुखारा आणि इतर बर्याच स्थानिक फळांचा भरणा होता. तीस रुपयात प्रत्येकी एक, अशी सगळी फळं मी खरेदी केली. सगळ्या बसभर ती फळं आम्ही वाटून खाल्ली. आणि काही वेळातच, आम्ही मनाली मध्ये येऊन पोहोचलो.
सकाळचे साडेअकरा वाजले होते, मनालीत आम्हाला मिळालेला लॉज, खूपच आडवळणी आणि आतील बाजूस होता. आम्ही लॉजवर गेलो, तिथे सगळे जन आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. आता आम्हाला पुढील तयारीला लागायचं होतं. पुढील तयारी म्हणजे जेवण. आम्ही लॉजमध्ये अशा प्रकारची बुकिंग करून घेतली होती. कि तिथे गेल्यावर, त्यांच्या किचनमध्ये आम्ही आमचं जेवण बनवून घ्यायचो. आणि जिथे आम्हाला पुरेसा वेळ मिळणार नव्हता. अशा काही ठिकाणी लॉजमध्ये जेवणाची सोय करून घेतली होती.
आम्ही स्वतः जेवण बनवण्यामागे दोन कारणं होती. एकतर हॉटेलमध्ये जेवण्याचा खर्च फार वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बाहेरच्या प्रवासात, आपलं घरगुती जेवण असल्यावर आपली पोटं बिघडत नाहीत. त्यामुळे इथून जातानाच.. स्वयपाक करण्यासाठी तीन छोट्या शेगड्या, प्रत्येकी दोन किलो ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ, पत्रावळी आणि स्टीलच्या वाट्या, आणि त्यासोबत.. डाळी, तेल, साखर, मीठ, मिरची, पोहे, रवा, बेसन, शेवया. दुध पावडर अशी जय्यत तयारी करून आम्ही गेलो होतो. फक्त ज्या भागात जाऊ, तिथे.. कांदा, वांगी, बटाटा, कोथंबीर, कडीपत्ता किंवा अन्य काही भाज्या खरेदी करायच्या. आणि आपल्या कामाला लागायचं. आमच्या सोबत असणाऱ्या महिला मंडळी, खूपच सुगरणी होत्या. अगदी तासाभरात, त्या सगळा स्वयपाक करून मोकळ्या व्हायच्या.
आजच्या जेवणात.. बटाट्याची रस्सा भाजी, ज्वारीची भाकरी, जीरा राईस, लोणचं. शेंगदाणा चटणी असा जंगी बेत होता. भुकेच्या तडाख्यात सर्वांनी भाजी भाकरीवर यथेच्छ ताव मारला.
जेवणं उरकली.. आणि दोनचार तास आराम करण्यासाठी सगळे जन आपापल्या रुममध्ये निघून गेले. दुपारी चार वाजता, सगळे जन बसमध्ये येऊन बसले. आणि आम्ही, मनाली फिरायला गेलो. सर्वप्रथम.. आम्ही हिडींबा देवीच्या मंदिराला भेट दिली. हिडिंबा मंदिर, हे मनाली मधील ग्रामस्थांच्या आस्थेचा विषय होता. घनदाट वृक्षराजीमध्ये हिडिंबा देवीचं देखणं मंदिर पर्यटकांना आकर्षित करत होतं. त्याठिकाणी आम्ही मनोभावे माथा टेकला.
त्यानंतर तिथे शेजारीच असणाऱ्या घटत्कोच मंदिराला भेट दिली. घटत्कोच हा भीम आणि हिंडीबा यांचा पुत्र, हे मंदिर अगदी उघड्यावर आहे. एका मोठ्या झाडाखाली, या मंदिराची स्थापना केली आहे. प्रथेप्रमाणे तिथे चाकू, त्रिशूळ आणि याक प्राण्याचे शिंग देवाला अर्पण केलेले दिसून येत होते. हा परिसर फिरून झाल्यावर, क्लब हाऊस मध्ये आम्ही थोडी खरेदी केली. खरं तर इथे खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही. कारण सगळी खरेदी इथे फारच महाग आहे. पण स्थानिक व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, खिशाला थोडी झळ नक्की लाऊन घ्यावी. मनाली हे ठिकाण अगदी एका दिवसात फिरून होण्यासारखं आहे. पण खरं पाहायला गेलं तर, हा एक पक्का हनिमून स्पॉट आहे. त्यामुळे, इथे नवविवाहित जोड्या भरपूर प्रमाणात दिसून येतात.
क्लब हाऊस जवळच असणार्या मनु मंदिराला आम्ही भेट दिली. मनु मंदिरात जाण्यासाठी एक किलोमीटर अंतराची खडी पायपीट करावी लागते. मनुस्मृतीचे जनक असणारे, मनु ऋषी यांचं हे मंदिर आहे. उंच पहाडावर असणारं हे लाकडी मंदिर फारच आकर्षक आहे.
हे सगळं देवदर्शन उरकून घेतल्यावर, तेथील स्थानिक भाजी मंडई मध्ये भाजी खरेदी केली. तिथे मला एक नवीनच लाल रंगाचा बटाटा पाहायला मिळाला. हा सगळा कार्यक्रम आटोपल्यावर, आम्ही लॉजवर आलो. रात्रीच्या जेवणासाठी महिलांनी बटाटा घालून मसालेभात बनवला. रात्री नऊ वाजता आमची जेवणं उरकली. आणि दहा वाजता सगळं काही चिडीचूप झालं. उद्या सकाळी आम्हाला, मनाली मधील वशिष्ठ ऋषी यांचं मंदिर, श्रीराम मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड पाहून पुढे रोहतांग मार्गे जीस्पा व्हेली कडे कूच करायची होती. उद्या सकाळी आम्ही मनालीला रामराम करणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळी अवराआवार करून आम्ही वशिष्ठ ऋषी आश्रमाकडे गेलो. तिथे बाजूलाच श्रीरामाचं सुद्धा पुरातन मंदिर आहे. वशिष्ठ ऋषी हे प्रभू श्रीरामाचे गुरु होत. भक्तिभावाने त्या दोन्ही मंदिरात सगळे नतमस्तक झालो.
वशिष्ठ ऋषी आश्रमाच्या परिसरात एक गरम पाण्याचं फार मोठं कुंड आहे. तिथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळीची व्यवस्था केली आहे. या पाण्यात अंघोळ केल्याने समस्त त्वचारोग दूर होतात. असं त्याठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. मग काय, हाती आलेली हि अमुल्य संधी कोण दवडणार. काही हौशी मंडळींनी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आपली हाडं शेकून घेतली. मनाली सारख्या थंड वातावरणात गरम पाण्याची अंघोळ एक वेगळाच आनंद देऊन जाते. अंघोळ झाल्यावर, मनोभावे वशिष्ठ ऋषी आणि श्रीरामाच्या मंदिरात माथा टेकवला. जास्ती वेळ न दवडता.. त्या ठिकाणाहून आम्ही बरोबर दहा वाजता बाहेर पडलो. आणि रोहतांगच्या रस्त्याला लागलो.
क्रमशः


No comments:

Post a Comment