Saturday, 26 August 2017

फेसबुकवर.. आजवर, बरीच प्रेमप्रकरणं झाली असतील.
त्यातील सगळीच प्रेमप्रकरणं शेवटाला गेली असतील, कि नाही. ते मला सांगता येणार नाही. परंतु, या माध्यमात आल्यापासून. आजवर, फेसबुकवर प्रेमसंबंध जुळून आलेल्या दोन प्रेमी युगुलांच्या लग्नाला मी स्वतः हजर राहिलो आहे. आणि येत्या काही महिन्यात, अजून एक असाच योग जुळून येणार आहे. वरील दोन्हीही मित्र मैत्रिणींनी सगळी शहानिशा करून आपल्या मर्जीप्रमाणे जोडीदार निवडून लग्न केली. आणि, आज ते अगदी सुखासमाधानाणे आपापला संसार मार्गी लावत आहेत.
आज, हा मुद्दा आठवायचं कारण म्हणजे..
हल्लीच माझा एक मित्र माझ्याकडे तक्रार घेऊन आला होता. कि, त्याच्या मुलीने सुद्धा फेसबुकवर एका मुलाशी आपलं सुत जुळवलं होतं. आणि, प्रेमाच्या आणाभाका घेत ते सुद्धा विवाह बंधनात अडकू इच्छित होते. तर, या प्रेम प्रकरणाचा पूर्वेतिहास असा होता.
माझ्या मित्राची मुलगी, वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला आहे. आणि हे सगळं काही याच वर्षात जुळून आलं होतं. खूपच सुंदर दिसणारी हि मुलगी, अंगापिंडाने सुद्धा अगदी ठीकठाक अशी आहे. फेसबुकवरील नित्य वावरामुळे, ती नकळत एका मुलाच्या प्रेमात पडली होती.
फेसबुक वरील, त्या मुलाचा बायोडाटा सुद्धा अगदी सुंदर होता. पुणे विद्यापीठातून इंजिनिअरची पदवी घेऊन तो मुलगा बाहेर पडला होता. आणि कोणत्यातरी आयटी कंपनीत मोठ्या पगारावर तो कामाला सुद्धा होता. ती मुलगी, या मुलाचा चेहेरा आणि त्याचा बायोडाटा पाहून अगदी मोहित झाली होती. सुरवातीला मेसेंजरवर बोलाचाली चालू होत्या. त्यांतर, एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांचं संभाषण सुरु झालं. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या.
आणि शेवटी.. प्रेमाच्या आणाभाका घेत, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता.. याला संयोग म्हणता येईल, किंवा नशिबाचा भाग.
पण त्या मुलीने, एक फार मोठा शहाणा निर्णय घेतला. आणि, हि सगळी खबरबात आपल्या आईवडिलांना सांगितली. मुलीचे हे धाडसी बोल ऐकून तिचे आईवडील अगदी अवाक झाले होते. दोनचार दिवसांनी, आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेतलं. आणि त्या मुलाची प्रोफाईल पाहिली. आणि ती प्रोफाईल पाहून, मुलीच्या वडिलांना फार मोठा धक्का बसला.
कारण.. त्या फोटोतील मुलाचा चेहरा, चक्क त्यांच्या एका ओळखीतल्या मित्राच्या मुलाशी मिळता जुळता होता. माझ्या मित्राने, त्याच्या मुलीकडून त्या मुलाचा नंबर घेतला. आणि त्याला फोन लाऊन, सगळ्या गोष्टीची एकदा शहानिशा करून घेतली. मित्राचा अंदाज खरा ठरला होता. तो मुलगा, त्याच्या मित्राचाच होता.
आणि.. या प्रकरणात, सर्वात मोठी वाईट गोष्ट हि होती.
कि.. तो मुलगा चक्क दहावी नापास होता. आणि, त्यांच्या घरातील दुधाचा व्यवसाय सांभाळत. दिवसभर तो म्हशींच्या मागे फिरत असतो. शेवटी कोणतंही काम हे छोटं किंवा हलकं नसतं. पण प्रोफाईलवर खोटी माहिती ठेवून फसवणूक करणं, हा सुद्धा एक दखलपात्र गुन्हाच आहे कि.
मित्राने आणि वहिनींनी.. त्यांच्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याची मुलगी अगदी एक दुजे के लिये झाली आहे. त्या मुलाच्या प्रेमापाई, ती चक्क म्हशींचं शेन काढायला सुद्धा एका पायावर तयार झाली आहे.
माझा मित्र मात्र, फार मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे.
एकीकडे, त्याला त्याची नाजूक मुलगी दिसतेय. तर दुसरीकडे निबार म्हशींचा भलामोठा गोठा दिसत आहे.
आता, पुढे काय होईल ते परमेश्वरच जाणो.
त्यामुळे.. इथे असणाऱ्या सर्व मुलामुलींना, माझी एक कळकळीची विनंती आहे. प्रोफाईलवर खोट्या माहित्या ठेऊ नका. शक्यतो कोणाचीही फसवणूक करू नका.
सगळी शहानिशा करा, आणि मगच एकमेकाच्या प्रेमात पडा. नाहीतर, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नको त्या गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागेल.

No comments:

Post a Comment