Saturday, 26 August 2017

मी.. सतरा अठरा वर्षाचा असताना..
आमच्या चौकातील सार्वजनिक गणपतीची वर्गणी गोळा करत फिरत होतो. तेंव्हा एका मित्राने, मला तंबाखू खायला शिकवली. त्यावेळी नव्याने व्यसन सुरु केलं असल्याने. तंबाखू खाल्ल्यावर ती किती वेळाने थुंकून द्यायची..? याचं पुरेसं ज्ञान नसल्याने. मी कितीही वेळ ती तंबाखू दाडेखाली धरून ठेवायचो. पण.. हे तंबाखूचं व्यसन मला काही जडलं नाही.
त्यावेळी.. तंबाखू खाणारे एका मित्राचे वडील मला म्हणाले होते. सतत तंबाखू खाऊन, नंतर-नंतर आपल्या तोंडाचा खूप गु घाण वास येतो. हे वाक्य ऐकल्यावर, मला तंबाखू या विषयाची भयंकर शिसारी आली. आणि त्यानंतर, तंबाखू म्हणून मी कधीही तोंडात धरली नाही.
त्याच सुमारास, एका मित्राच्या कटलरी दुकानात वेळ घालवत बसलो होतो. तर त्याने, पिवळ्या रंगाचा सुगंधी पान पराग गुठका मला खाऊ घातला. मी पिवळा का म्हणतोय, कारण त्यावेळी निळा आणि पिवळा असा दोन स्वादात पान पराग मिळायचा. निळा म्हणजे तंबाखू विरहित आणि पिवळा म्हणजे तंबाखू सहित.
पान परागच्या मनमोहक सुगंधामुळे मी त्याकडे लागलीच खेचला गेलो. त्यानंतर, पान परागला स्पर्धा देण्यासाठी माणिकचंद नामक गुटखा बाजारात आला. त्याकाळी भारतभरात अजून सुद्धा बरेच नामांकित गुठ्के अस्तित्वात होते. पण ते, पुण्यनगरी पर्यंत पोहोचत नव्हते.
माणिकचंद नंतर.. फिट, मुलचंद, स्टार, गोवा आणि सर मावा नामक गुठ्के सुद्धा बाजारात आले. आणि बराच पैसा कमवून निघून गेले. पण मी बाकी अगदी ब्रांडेड, म्हणजे माणिकचंद गुठ्काच खायचो.
नव्वद सालात.. माणिकचंद गुठ्क्याची एक पुडी काहीतरी चार पाच रुपायला मिळायची. नाही म्हणता, दिवसाला मी या पाच सहा पुड्या सहज खाऊन जायचो. जवानीचा जोश होता. त्यामुळे हि व्यसनं बिनबोभाट पचून जायचे. पण एकदा काय झालं..
त्यावेळी.. माझं सुद्धा एक कटलरी दुकान होतं. दुकानात बसून मी सुद्धा पक्का मारवाडी झालो होतो. आणि मारवाडी लोकांसारखं, तोंडात दिवसभर गुठ्का कोंबत होतो.
एके दिवशी.. दुपारच्या वेळी, मला छातीत जळजळ होऊ लागली. बहुतेक पित्ताचा त्रास सुरु झाला होता. ओकाऱ्या काढल्याशिवाय मला काही चैन पडणार नव्हता. तोंडात बोटं न घालता, अगदी भडभडून ओकाऱ्या झाल्या. पोटातला सगळा मल बाहेर पडला होता. पण मनाची समाधान होत नव्हती. सुरवातीला, पिवळ्या ओकाऱ्या झाल्या. त्यानंतर, आतड्यांना चिटकून बसलेले गुठ्क्याचे लाललाल बडके बाहेर पडू लागले. आणि नंतर जास्तीचा ताण दिल्यावर.. ओकारी सोबत.. माझ्या तोंडातून रक्त पडू लागलं..!
विषय खल्लास.. त्यानंतर मी खूप घाबरलो, आणि तडक डॉक्टरकडे गेलो. आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर, त्यांनी मला सगळं विचारलं. तू काय करतोस, काय नाही..
मी सुद्धा त्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. रोजच्याला पाच सहा पुड्या गुठ्का खात असतो. त्यावर ते मला म्हणाले.. मी तुझ्यावर उपचार करतो. तुला काही होणार नाही याची ग्वाही सुद्धा देतो. पण तुला माझं एक ऐकावं लागेल. इथून पुढे तू कधीही गुठ्का खाणार नाहीस असं मला वचन दे. कारण, तोंडातून रक्त पडणे म्हणजे एकप्रकारे ती कॅन्सर ची सुरवात, किंवा मृत्यला आवाहनाच म्हणा ना. शेवटी, मी डॉक्टरांना तसं वचन दिलं.
त्यानंतर मला त्यांनी समजावून सांगितलं. हे बघ कसं आहे, गुठ्का खाताना तू त्याला जरी बाहेर थुंकत असशील. तरी सुद्धा, नकळत त्याचे काही कन आपल्या शरीरात जातात. आणि ते कण आपल्या आतड्यांना चिटकून बसतात. आणि जेंव्हा आपण जास्तीच्या ओकाऱ्या काढू लागतो. त्यावेळी आपल्या आतड्याच्या बाहेरील बाजूस अतिरिक्त ताण येतो. आणि, आतड्यांना चिकटलेला तो नकोसा थर ओकारी सोबत बाहेर येतो. आतडी अगदी नाजूक असल्याने, ओकारी करताना ताण येऊन त्या ठिकाणी खपली निघते आणि तिथे एक छोटीशी जखम होते. आणि त्याचं पर्यवसान रक्त पाडण्यात होतं. हे सगळं ऐकून, माझ्या मनातील भीती कमी झाली.
त्यानंतर, मी गुठ्का या विषयाला सुद्धा कायमचा रामराम ठोकला. ते आजवर, मी त्या गुठ्क्याला माझ्या मुखात स्थान दिलं नाही.
त्यानंतर.. कॉलेजमध्ये असताना, थोडी शायनिंग मारावी म्हणून. काही मित्रांच्या संगतीने मी सिगारेट सुद्धा प्यायला शिकलो. कॉलेज मधील मुलींना पाहून, धुराचे लोट हवेत सोडताना तेंव्हा फार मजा वाटायची. मला हि सगळी व्यसनं लागण्याची कारणं म्हणजे. नको त्या वयात मिळालेली व्यसनी मित्रांची संगत.
काही व्यक्ती व्यसनांच्या लगेच आहारी जातात. पण ते कसं काय.? हे आजवर मला समजलं नाहीये. नव्वद सालापासून, धरसोड करत. आजवर मी हे सिगारेट पिण्याचं व्यसन पाळलं होतं. रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर मला सिगारेटची हमखास तल्लफ यायची. पण त्यात सुद्धा माझे काही नियम होते. मला स्वतःला दिवसा सिगारेट पिणं आवडत नव्हतं. किंवा, त्या धुराचा वास सुद्धा मला सहन होत नव्हता. शेवटी, यावर्षी श्रावण महिन्याच्या एक आठवडा अगोदर. कधीतरी पीत असलेली हि सिगारेट सुद्धा मी कायमची सोडून दिली.
खूप लोकं म्हणत असतात, व्यसन एकाएकी सुटत नाही. पण त्यांना मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. आपण आईच्या पोटातून व्यसन शिकून आलेलो नसतो. नको त्या गोष्टी शिकवायला आपल्याला कोणीतरी गुरु भेटत असतो. तर मग, व्यसन सोडायला मन नामक आंतरिक गुरु आपल्या कामी येऊ शकत नाही का..?
वेळ काही सांगून येत नसते. एखादा त्रास झाल्यावर आपण व्यसनं सोडण्याची भाषा बोलू लागतो. पण मी म्हणतो, ती वेळ येण्याची वाट कशाला पाहा. शरीर निरोगी असण्यासारखी जगातील कोणतीच मोठी श्रीमंती नाही.
तुम्ही सुद्धा मनापासून ठरवा, आणि व्यसनमुक्त व्हा. कोणतीही गोष्ट अगदी सहजशक्य आहे. आज मी अगदी मनमोकळे पणाने सांगू शकतो. कि, कोणत्याच तंबाखूजन्य पदार्थांचं मला व्यसन नाहीये. आणि भविष्यात सुद्धा, या व्यसनांना मी कधीही थारा देणार नाहीये.

No comments:

Post a Comment