Tuesday, 4 August 2015

वेळ

सकाळची वेळ, 
उडप्याच्या हॉटेलमध्ये विविध पकवान बनत होते. लोकांच्या गर्दीने हॉटेल अगदी वाहून चाललं होतं. नाश्ता करताना, लोकांच्या हाताची आणि तोंडाची घाई अगदी बघण्यासारखी होती. 
टिंग, टिंग...
कौंटर वरची घंटी वाजली, तसा वेटरने आवाज दिला.. 

सात नंबरपे.. एक वडा सांबर, एक इडली और एक मसाला डोसा...! 

बिलाची पावती लांबसर खिळ्यामध्ये खुपसली गेली.  हॉटेल मालकाची, बिल घेण्याची लगबग चालू होती. शंभराची नोट गल्ल्यामध्ये सरकवली गेली.
मोठ्ठ्या आणि जाडसर तव्यावर बनणाऱ्या डोस्याचा सुवास चौफेर दरवळत होता. त्यावर सोडलेली तुपाची धार, क्या बात.. हे का कमी, म्हणून सांबाराचा मधुर सुवास त्यात कमालीची भर घालत होता. आचारी त्याचं काम अगदी मन लाऊन करत होता. 
ह्या सुमधुर वाफाळलेल्या गंधाने, लोकांची भूक चाळवली गेली नाही. तर, त्याला नवलच म्हणावं लागेल. क्षुधाशांती साठी, प्रत्येक व्यक्तीची पाऊलं नकळत त्या उपहारगृहाकडे वळत होती. 

हॉटेलच्या बाहेर तो सुद्धा उभा होता. अस्ताव्यस्त केसं आणि चेहेर्यावरील वाढलेले दाढीचे खुंट त्याच्या गरिबीत कमालीची भर घालत होते. त्याच्या कपड्यावर, विविध रंगाचे डाग होते. बहुतेक रंगारी असावा. विविध पदार्थांच्या सुगंधाने त्याची भूक सुद्धा चाळवली गेली होती.
आशाळभूत नजरेने, हॉटेलकडे पाहात...
पुन्हा एकवार, त्याने आपला रिकामा खिसा चाचपला. 

आणि, हताश मनाने.. 
दूरवर पसरणाऱ्या पायवाटेकडे तो मार्गस्थ झाला..

No comments:

Post a Comment