Friday, 28 August 2015

रक्षाबंधन..

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाऊ राया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया.
बहिण भावाचं नातं,
खरोखर, हे अगदी वेडं नातं आहे. जगातल्या, इतर सर्व नात्यांपेक्षा हे नातं श्रेष्ठ असावं असं मला वाटतंय. भाऊ कसाही असुध्यात, बहिणीचा जीव त्याच्यासाठी तीळ-तीळ तुटत असतो. भावा-भावांची भांडणं होतात. हे आपण नेहेमीच ऐकत आणि पाहत आलो आहोत.
पण, बहिण भावाची सुद्धा भांडणं असू शकतात...? नाही... असं, खचितच पाहण्यात येतं.
तसं पाहिलं तर, हि दोन्ही रक्ताची नाती असतात. पण, बहिणीचं नातं काही निराळच असतं.
इथे सुद्धा, बऱ्याच महिला माझ्या ताई आहेत. पण, माझ्या सक्ख्या बहिणी इतकी जिवलग गुंतागुंत माझी कुठेही नाहीये. अशी नाती, निर्माण व्हायला हवीत...
बहिण भावाला ओवाळते, भाऊ तिला ओवाळणी टाकतो. तसं पाहायला गेलं तर, ओवाळणी करिता कोणतीच बहिण भावाला ओवाळत नसते.
आपण हयात आहोत तोपर्यंत, तिला हवं नको ते पाहणं. तिच्या सुखा दुख्हात सहभागी होणं. आणि, जमेल त्याप्रकारे तिची मदत करणं. हे एका भावाचं आद्य कर्तव्य आहे. आणि, प्रत्येक व्यक्तीने ह्याचं पालन करणं महत्वाचं आहे. हीच तिला, खऱ्या अर्थाने ओवाळणी असते.
मी, बहिण भावाचं पवित्र नातं मानतो. त्याला, मान सुद्धा देतो. मानलेली नाती सुद्धा मानतो.
" पण राखीच्या बंधनात अडकनं, मी सोडून दिलं आहे. "
त्याला, कारण हि तसच घडलं...
नाती माननं वेगळं. आणि, त्याला मूर्त स्वरूप देणं वेगळं. सुरवातीला, माझ्या बहिणी व्यतिरिक्त मी कोणाचीच राखी बांधून घेत नव्हतो. नंतर, आग्रहाखातर मानलेल्या बहिणींच्या दोन चार राख्या सुद्धा वाढल्या. पण आजही, माझ्या सक्ख्या बहिणीने राखी बांधल्याशिवाय मी दुसर्या कोणाच्याच राख्या बांधून घेत नाही. पहिला मान, फक्त तिचाच असतो. आणि, का असू नये...
मग त्या बंधनाला, त्या दिवशी कितीही वेळ होवो.
राखी बांधण्याची ज्याची त्याची पद्धत असते. माझी बहिण राखी बांधताना घट्ट अशा दोन गाठी मारते. जेणेकरून, ती राखी दोन एक महिने तरी माझ्या हातात राहतेच.
मग ती, केंव्हा जीर्ण होऊन निघेन तेंव्हाच.
सप्टेंबर २००८ साली... मनाली येथे माझा भीषण अपघात झाला होता. दैवकृपेने, मी त्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो. दोन दिवसांनी, जेंव्हा मला कुलुहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आलं. तेंव्हा, मला पाहायला बरीच लोकं येत होती. पण जेंव्हा, माझी बहिण मला पाहायला आली.
तेंव्हा.... मला पाहून, तिने जो मोठ्याने हंबरडा फोडला होता.
तो आवाज, आजही माझ्या कानामध्ये घर करून बसला आहे. माझ्या बायकोने सुद्धा, मला पाहून इतका आक्रोश केला नव्हता. संपूर्ण दवाखाना, आम्हा दोघांकडे पाहत होता. 
हे सगळं का होतं..? आणि, कसं होतं..? ते फक्त, त्या 'दोन' हृदयांनाच माहीत असतं..
तिचे डोळे पुसण्यासाठी, मी माझा हात पुढे सरसावला. तेव्हा नकळत, माझं सुद्धा माझ्या हाताकडे लक्ष गेलं. तो राखीचा दोरा, अजूनही माझ्या हातामध्ये तसाच होता.
काय सांगावं.. त्या राखीच्या बंधनातली सुद्धा ती ताकत असावी. जो मी इतक्या भयंकर मोठ्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो.
आणि त्याच वेळी, अपघातानंतर दोन चार महिन्यांनी का होईना. माझ्या मानलेल्या बहिणीपैकी एकही बहिण माझी साधी विचारपूस सुद्धा करायला येऊ नये. हि, फार मोठी खेदाची गोष्ट होती.
इथे माझ्या बर्याच ताई आहेत. त्यांनी, माझं हे लिखाण मनाला लाऊन घेऊ नये.
परंतु, हि वस्तुस्तिथी आहे. ह्यात, अतिशयोक्ती अशी काहीच नाहीये..
नाती निर्माण करणं.. आणि, त्याला शेवटपर्यंत निभावनं. हे, फार कठीण काम आहे.
फक्त, वर्षातून एकदा राखी बांधणं. किंवा ओवाळणी टाकणं. म्हणजे, बहिण भावाचं नातं नसतं. ह्यापेक्षाही घट्ट अशी आपली नाती व्हावीत.
जी त्या, राखीच्या बंधनाच्या सुद्धा दोन पावलं पुढे असावीत. त्यामध्ये, भावनिक गुंतागुंत असावी. एकमेकाचा आदर सत्कार असावा. एकमेकाची सुखं दुखः वाटून घेण्याची ताकत असावी.
असं मला इथे सांगावसं वाटतंय.
आणि आपण, सगळे मिळून, त्यास नक्कीच पात्र ठरू.
हीच, ह्या लेखामागची बहिण भावाच्या खऱ्या नात्याची कायम स्वरूपी गुंफण व्हावी. 

हीच, ईश्वर चरणी प्रार्थना....

No comments:

Post a Comment