Friday, 30 October 2015

आमच्याकडे, कष्टाची कामं करणारी...
म्हणजे, रोडवर खड्डे खांदणारी. काही, ठेकेदारीत कामं करणारी कामगार मंडळी आहेत. ते सकाळी जेंव्हा कामावर येत असतात. तेंव्हा, त्यांच्या सायकलच्या नळीला जेवणाचा 'चार थाळी' डबा दोरीने घट्ट बांधून आणलेला असतो. 
असे, आमच्याकडे दोन चार कामगार आहेत. घरून कामावर येईपर्यंत, ते आपल्या जेवणाच्या डब्याचं लोकांना यथेच्छ दर्शन घडवत असतात. त्यात त्यांना, कोणताच कमीपणा वाटत नाही. कारण, फक्त त्यांनाच माहित आहे. कि, हे जे काही चाललं आहे. 
ते फक्त, ह्या  'पोटासाठी' चाललं आहे. 
आणि, त्यासाठी कसली 'लाज' आली आहे. त्यांचे, भरलेले जेवणाने डबे पाहून, 

कधी-कधी माझी मला स्वतःचीच लाज वाटते. 

माझ्याकडे, जेवण गरम ठेवणारा मिल्टनचा तीन थाळी डबा आहे. त्याला, सोबत घेऊन जाण्यासाठी एक पंधराशे रुपयाची ब्याग आहे. 
आणि, त्या डब्यात जेवण असतं काय..?
तर, दोन चपात्या एखादी सुक्की पालेभाजी. आणि, घरात शिल्लक असेल तर एखादा गोड पदार्थ. 

भाजी सांडून, ती किमती ब्याग खराब होऊ नये. म्हणून, माझी बायको डब्याला पात्तळ भाजी देत नसते. जवळ-जवळ, सगळ्यांच्या घरी हीच कथा असावी. त्यामुळे, जेवताना भाजीला चपाती अगदी टोचून-टोचून खावी लागते. हरपून-वरपून जेवण काही होतच नाही हो..

तर.. या मंडळीचा सकाळी कामावर आल्यावर पहिला उद्योग असतो. तो म्हणजे, भरपेट न्याहारी..
कोठीतल्या फरशीवर, वर्तमान पत्राची पथारी मांडून. हि चार पाच जणं, सकाळी दहा वाजताच आपापले डबे उघडतात. 
तेंव्हा समोरच...
लाल भडक तर्रीबाज पात्तळ भाज्यांचं दर्शन मला घडतं. सोबत, चपाती किंवा भाकरीचा भला मोठा ढीग. पांढरा शुभ्र भात. मिरचीचा ठेचा, लोणचं, विविध चटण्या, लाल भडक कांदा, मुळ्याचा एखादा तुकडा..
हे सगळे जिन्नस पाहून, खरोखरच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. पण, ती लाळ मला आतल्या आताच गिळावी लागते. मग हे सर्व जन, त्या भोजनावर असे काय तुटून पडतात. 
कि, बास रे बास..
धापकण.. एका बुक्कीत लालेलाल कांदा फोडला जातो. सगळ्या भाज्यांची देवाणघेवाण होते. आणि, भाजीमध्ये चपाती किंवा भाकरी कुस्करून यांचा भोजनाचा कार्यक्रम सुरु होतो. 
मस्तपैकी, मजा मस्करी करत यांचं जेवण सुरु असतं. 
यांचं जेवण जेंव्हा संपतं... 
तेंव्हा... " तृप्तीचा ढेकर काय असतो. " तो, ऐकायला मिळतो. 

कधी-कधी वाटतं. यांना सांगावं, आज मी तुमच्या घरी जेवायला येतोय. मस्त पैकी, माझ्यासाठी चुलीवरील भाजी, भाकरी, भात बनवून ठेवा म्हणून. 
खरोखरच, यांच्या बायका खूप सुगरण असणार आहेत हो. कारण, त्या आपल्या पतीला खर्या अर्थाने जाणत असतात. कि ह्याला, दिवसभर उन्हात खड्डे खांदून त्याचा घाम गाळायचा आहे. त्या पद्धतीत, त्याला भरपेट आणि पोषक आहार सुद्धा मिळायला हवाय. त्याकरिता, 

त्या 'लक्ष्म्या' पहाटे कधी उठून स्वयपाकाला लागत असतील. 
ते, त्यांनाच ठावुक..
  
खरच.. ह्या लोकांची हातावरची पोटं असतात. 
पण ते, 

" खर्या अर्थाने, पोटासाठी जगत असतात."

नाहीतर... आपलं तर, रोजचंच आहे... 
फक्त, 

" पोळी आणि भाजी..! "

No comments:

Post a Comment