Friday, 9 October 2015

पाच सहा वर्षांपूर्वी, आम्ही तिरुपती बालाजीला निघालो होतो...
पुण्यातील खडकी स्टेशन मध्ये, आम्ही रेल्वेमध्ये प्रवेशित झालो. आम्ही रेल्वेमध्ये चढतो न चढतो तोच, मला शंका आली.
कि, कोणीतरी आमच्या पाळतीवर आहे. आणि, माझी शंका खरी ठरली. अचानक, एक पाच सहा लोकं आमच्यासमोर आले. आणि, त्यांनी आम्हाला रेल्वे तिकीटाची मागणी केली.
ते सगळे जन, स्पेशल स्कोडचे सिविल ड्रेस मधील रेल्वे पोलीस होते.
आमचं आरक्षण, खडकी पासूनच होतं. त्यामुळे, आम्ही सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता. त्यांना तिकिटं दाखवली. सगळं काही ठीकठाक होतं...
पण,
आमच्यातील काही मुलांच्या मुखामध्ये माणिकचंद, गोवा नामक गुठ्क्याची गुळणी होती...
योगायोगाने...त्यावेळी सुद्धा, महाराष्ट्रात गुठ्का बंदी होती...!
झालं...
त्या पोलिसांना, एवढं एकच कारण पुरेसं होतं. त्यांनी, सगळ्या मुलांच्या ब्यागा तपासायला सुरवात केली. भरपूर 'माल' त्यांच्या हाती लागला होता. सगळा माल त्यांनी जप्त केला.
त्यातील एक जन म्हणाला.. यांच्याकडे तर पूर्ण पान टपरीच आहे राव..!
ए... घ्या रे ह्यांना पोलीस चौकीवर...!
त्यांच्या ह्या वाक्यासरशी, आमचे धाबे दणाणले. मीच त्यांना म्हणालो,
जाऊद्या साहेब, देवाला चाललोय. एक वेळ माफ करा...!
पण, त्यांनी सहानुभूती दाखवली नाही...!
आमची तारांबळ पाहून, त्यातील एक पोलीस म्हणाला..
ठीक आहे.. किती जनं आहात तुम्ही..?
आकरा जन आहोत..!
ठीक आहे... तुम्हाला, एक लाख दहा हजारची पावती करावी लागेल.
काय बोलायचं राव...
मी म्हणालो.. अहो साहेब, फक्त चार लोकं गुठ्का खाणारे आहेत. मग, आम्हा सगळ्यांना का वेठीस धरताय..?
तर म्हणाला.. हे बघा, तुम्ही दंड वगैरे काही भरू नका. आणि आमच्याशी वाद हि घालू नका. सरळ पोलीस चौकीत चला. तिथे काय निर्णय होईल ते पाहू. आणि, नंतर तुम्ही प्रवासाला निघा..
मी म्हणालो, अहो साहेब, पुणे स्टेशनवर जेमतेम अर्धा तास गाडी थांबते. ह्या वादामध्ये, आमची गाडी निघून जाईल.
पण, त्यांना ह्या गोष्टीचं काहीच सोयरसुतक नव्हतं.
काय करावं.. भला मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. ह्या गुठ्क्याच्या नादामुळे आमची काही सुटका होणार नव्हती.
शेवटी, तो पोलीस म्हणाला... बरं ठीक आहे, पन्नास हजाराची पावती करा..!
मी म्हणालो.. अहो साहेब, आम्ही प्रत्येकी दोन चार हजार घेऊन प्रवासाला निघालोय. एवढी मोठी रक्कम आमच्याकडे कशी असेल हो..?
तेवढ्यात.. आमच्यातील एक घाबरलेला मित्र मधेच पचकला...
बरं ठीक आहे... अकरा हजाराची पावती करा.
आम्ही, एकूण अकरा जनं होतो. प्रत्येकी हजाराचा दंड बसणार होता.
पण, मी मधेच माझ्या मित्राला दरडावला... गप बस राव तू, विनाकारण काहीही बोलत असतोस..
शेवटी, त्या पोलिसाच्या काय मनात आलं काय माहिती..
म्हणाला.. चल अकराशे रुपये दे..!
आम्ही झटकन, अकराशे रुपये त्यांच्या हातात टेकवले.
त्याने सुद्धा, पटकन हजाराची पावती बनवली. आणि, चक्क शंभर रुपये मला परत केले.
आणि, हसत हसत तेथून निघून गेला.
हे प्रकरण, जवळ-जवळ पंधरा वीस मिनिटं चालू होतं. त्या पोलिसांच्या ग्रुपमधील एका व्यक्तीला, आमच्यातील एक जन ओळखत होता.
पण, त्याला नेमकं कुठे पाहिलंय. ते त्याला आठवत नव्हतं. तरी तो मित्र त्याला म्हणालाच..
साहेब.. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हो. पण मला नेमकं आठवेना झालंय.
परंतु.. तो पोलीस हि, त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तेथून निघून गेला.
त्यानंतर... पाच सहा महिन्यांनी, तोच पोलीस आम्हाला एका लग्नात दिसला. माझ्या मित्राने त्याला ताबडतोब ओळखलं. आणि, त्याला रेल्वेतील प्रसंग कथन केला..
त्यावर तो म्हणाला... नाही राव, अशा आयत्यावेळी आम्हाला ओळख दाखवता येत नाही.
त्यामुळे, इतर मित्र नाराज होतात. दंड फाटले जात नाहीत..!
त्याचा मुद्दाही रास्त होता.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे...
सालाबाद प्रमाणे, आज संध्याकाळी आम्ही अकरा जन पुन्हा एकदा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालो आहोत. आणि, आता सुद्धा गुठ्का बंदी आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा असा प्रसंग घडू नये. याची मनोमन प्रार्थना करतो.
आणि, तीर्थयात्रेला निघतो...!

No comments:

Post a Comment