Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- सात.

घोड्यावरून उतरल्यावर, चालताना पायांना खूप त्रास होत होता. सकाळी, पायी केलेली चढाई, चांगलीच भोवली होती. बसलं तर उठता येत नव्हतं. आणि, उठलं तर बसता येत नव्हतं. एकंदर, अशी अवस्था झाली होती. 
आम्ही पाच जनांकरिता, प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे एक तंबू भाड्याने घेतला. सहा, सात जन आरामशीर झोपतील, असा तंबू होता.
तंबूमध्ये... खाली जमिनीवर प्लास्टिक पेपर त्यावर जाडसर गादी. आणि, अंगावर घेण्यासाठी जाडसर मुलायम रजया ठेवल्या होत्या.
हवेतला गारवा, खूपच वाढला होता. ब्यागेत ठेवलेली सगळी गरम वस्त्रे, एक-एक करून पुन्हा अंगावर चढवली. तरीही गारठा काही कमी होत नव्हता. पायातील बूट काढले, एका कोपर्यात आमच्या ब्यागा ठेवल्या. आणि, आम्ही सगळे जन उब मिळवण्यासाठी रजया मध्ये शिरलो. थंडीमुळे, रजया सुद्धा खूप गारठल्या होत्या. मी तर, अगदी अंगाचं मुटकुळं करून रजई अंगावर घेऊन पडलो होतो. आमची अवस्था पाहून, तंबू मालकाने आमच्या अंगावर आणखीन एक-एक रजया टाकल्या. साधारण, अर्ध्या एक तासाने थोडी उब जाणवू लागली. नको असलेला नैसर्गिक 'एसी' आमची परीक्षा घेत होता. शरीर खूप थकलं होतं. कशाची म्हणून शुध्द राहिली नव्हती. दिवसभराचा थकवा घालवण्याकरिता, साधे हात पाय सुद्धा धुवावेसे वाटत नव्हते. इतकं थंड पाणी आणि, तो असह्य गारठा.
सकाळचं काम आत्ताच उरकून घ्यावं. या उद्देशाने, आमच्या मधील म्होरक्याने तंबू मालकाला पाठवून एका घोड्याच्या मालकाला बोलावून घेतलं. येथील लोक, सेवेकरिता सदैव तत्पर असतात. त्यांना कंटाळा असा नाहीच. तंबूमालक ताबडतोब गेला. आणि, दोन घोडे मालकांना सोबत घेऊनच आला. नाय होय करता, पंचतरणी ते पवित्र गुफा आणि तेथून पुन्हा चंदनवाडी अशा एकूण प्रवासाचे प्रत्येक घोड्यासाठी सोळाशे रुपये प्रमाणे सौदा पक्का झाला. घोडे मालकाने, सकाळी सहा वाजता येण्याचं कबुल केलं. आणि, तो हि त्याच्या राहुटीकडे निघून गेला.
माझं सगळं अंग ठणकत होतं. झोप सुद्धा लागत नव्हती. डोळे बंद, आणि कान उघडे ठेऊन पहुडलो होतो. कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती. चुकून कोणी माझ्याशी बोललाच, तर' मी त्याला, फक्त हुंकार द्यायचो, यापलीकडे काही नाही.
पंचतरणी मध्ये पोहोचल्यावर, आपल्याबरोबर असणार्या व्यक्ती चालताना मागे पुढे व्हायच्या. त्या पंचतरणी पर्यंत पोहोचल्यात कि नाही ? त्याची खातरजमा करण्यासाठी, चौकशी बूथवरील माईक वरून आपल्या मित्रांची नातेवाइकांची काही मंडळी चौकशी करायचे. आणि, त्यांच्याकारिता निरोप ठेवायचे. कि आम्ही, अमुक तमुक नंबरच्या तंबूमध्ये मुक्कामी आहोत. त्यामुळे, चुकामुक होण्याची बिलकुल शक्यता नसायची. आणि, ध्वनी वर्धकावरून निरोप मिळाल्यावर प्रत्येक व्यक्ती सुखरूप आपल्या आप्तेष्टांपर्यंत सुखरूप पोहोचत होता.
रात्र वाढली, तसा थंडीचा कडाका आणखीनच वाढला. आणि, मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. प्रत्येक, तीन श्वासानंतर, मला एक भला मोठा श्वास घ्यावा लागत होता. पंचतरणी मध्ये, सैनिकी दवाखान्याची सुद्धा व्यवस्था केली होती. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे, असा त्रास बर्याच जणांना होतो. त्यामुळे, कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था सुद्धा तिथे केलेली होती.
परंतु, रजई मधून बाहेर पडून दवाखान्या पर्यंत जाण्याईतके त्राण सुद्धा माझ्या अंगात राहिले नव्हते. मनात वाटत होतं,
आपली यात्रा, आता इथेच संपतेय कि काय ?
तहान सुद्धा खूप लागली होती. वाटायचं, कोणीतरी यावं.. आणि, पाण्याची बाटली माझ्या तोंडाला लावावी. पण, सांगणार कोणाला ? आणि, येणार तरी कोण ? थकव्यामुळे, जो तो रजई मध्ये गपगार झाला होता. रात्री आमच्यापैकी कोणीही, पाणी प्यायला उठला नाही. कि, लंगरमध्ये जेवायला सुद्धा गेला नाही.

माझ्या आयुष्यातील, मी अन्न पाण्यावाचून काढलेली ती पहिलीच रात्र असावी.

रात्रभर, मी फक्त देवाचा धावा करत होतो. हि रात्र, माझ्यासाठी काळरात्र ठरतेय कि काय ? अशी, भीती वाटत होती.
कधी एकदा, हि रात्र संपतेय. आणि, दिवस उजाडतोय असं झालं होतं. परंतु, वेळ काही जात नव्हता. विचार करता-करता, माझा' थोडावेळ का होईना डोळा लागला होता.
थोड्यावेळाने, मला पुन्हा जाग आली. असं वाटत होतं, मला झोपून बराच वेळ झाला असावा. बहुतेक.. पहाट झाली असावी, असं वाटत होतं.
कारण, सगळीकडे अगदी सामसूम झालं होतं. झोप येत नसल्यामुळे, आमच्या तंबू मधील एक मित्र उठून बसला होता. जीवाच्या आकांताने, मी त्याला म्हणालो.. किती वाजलेत रे ? तंबूत गेल्यापासूनच, माझ्या तोंडातून बाहेर पडलेलं हे पहिलच वाक्य होतं.
तो म्हणाला, साडेदहा वाजलेत...!
हाय रे माझ्या कर्मा, अजून बराच वेळ जायचा होता. तंबू मधील, लाईट विजवली होती.
हातामध्ये विजेरी घेऊन, तो मित्र लघुशंकेसाठी बाहेर पडला. जवळ-जवळ सगळे यात्रेकरू झोपी गेले होते. पूर्ण पंचतरणी मध्ये फक्त अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. लघुशंकेसाठी गेलेल्या मित्राने, त्याच्या विजेरीचा झोत जसा चालू केला. क्षणार्धात त्याच दिशेने, भारतीय जवानांनी त्यावर मोठ्या विजेचे झोत सोडले. एवढी जबरदस्त, सुरक्षा व्यवस्था. मोठाल्या विजेर्याचे झोत पाहून, तो मित्र खूप घाबरला. आणि, लघुशंका न करताच तो माघारी फिरला. आणि, रजई मध्ये शिरल्यावर त्याने मला हा वृतांत सांगितला. आता, माझ्या अंगात थोडी हुशारी आली होती. थकवा नाहीसा झाला होता. थोडं, बरं वाटत होतं. मनोमन देवाचे आभार मानले. आणि, झोपी गेलो.
अचानक, कसल्याश्या आवाजाने माझी झोप चाळवली. पुन्हा एकदा, लहरी वातावरणाचा फटका... मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. मनामध्ये, नको त्या भीत्या डोकाऊ लागल्या. ज्या ठिकाणी, नेहेमी हिमवर्षाव होत असतो. तिथे, पाऊस सुरु झाला होता. पहाटेचे साडेतीन वाजले होते. आणि.. चमत्कार घडावा तसा, आल्यापावली पाऊस निघून सुद्धा गेला होता.
माझ्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. कारण, इथल्या लहरी वातावरणाचा काल सकाळी अनुभव घेतला होता. तिथून पुढे मात्र, माझा डोळा काही लागलाच नाही, असं मला वाटत होतं. परंतु, सकाळ झाल्यावर माझ्या कानी आवाज पडला.

साहब, छे बज गये उठो अभी...!

आमच्या, नवीन घोडेवाल्याने.. आम्हाला आवाज दिला. तेंव्हा मला समजलं, कि दोन एक तास का होईना. मला, खरोखरच गाढ झोप लागली होती.

क्रमशः 

No comments:

Post a Comment