Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- दोन.


पहाटेची वेळ.. बोचऱ्या थंडीमध्ये, पहाटे तीन वाजता, अगदी कडक पाण्याने न्हाऊन, धुवून घेतलं. आणि, वाफाळलेलं अंग घेऊन बाथरूम च्या बाहेर पडलो. मनोभावे, परमेश्वराला नमन केलं. नवीन पोशाख अंगावर चढवला. त्यावर.. स्वेटर, हातमोजे, माकडटोपी परिधान केली. आणि, नुनुल्या बाळासारखा तयार झालो. रूमच्या बाहेर आलो. हवेमध्ये, भलताच गारवा जाणवत होता. पहलगाम-चंदनवाडी रस्त्यावर, भाड्याने ठरवलेल्या सुमोची वाट पाहत आम्ही उभे होतो. आकाश अगदी स्वच्छ आणि निरभ्र होतं. चांदण्या लुकलुक करत, डोळे मिचकावत जणू काही आम्हाला प्रवासाच्या शुभेच्छाच देत होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अमरनाथाच्या दर्शनासाठी सगळ्यांची मनं आसुसलेली होती. तितक्यात, आमची सुमो आली. आणि, आमच्या मंगलमय प्रवासाला सुरवात झाली.

वेडीवाकडी वळणं घेत, पहिल्या सैनिकी चेकपोस्ट पाशी आमची गाडी येऊन थांबली. रस्त्यावर वाहनांची एकच रांग लागली होती. बरोब्बर नवव्या क्रमांकावर आमची गाडी उभी होती. सैनिकी खाक्या सोबत असल्यामुळे, नियमांची पायमल्ली होत नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा वाहणारी 'लीडर' नदी कर्णमधुर संगीताची साथ करत होती. 
भारतीय सैन्याकडून.. सर्व यात्रेकरूंची, रीतसर तपासणी केली गेली. थंडीपासून बचाव करण्याकरिता, त्या भागातला विशिष्ट प्रकारचा जाड कापडाचा झब्बा परिधान करून सर्व मोटार सारथी एकत्र गप्पा मारत उभे होते. थंडी घालाविण्याकरिता, सिगरेटच्या धुराचे लोट हवेमध्ये सोडत गप्पा मारत ते उभे होते. पहाटेचे चार वाजत आले होते. ठीक साडेचार वाजता, सर्व यात्रेकरूंना सैनिकी बंदोबस्तात यात्रेला रवाना करण्यात येणार होतं. प्रवासाला निघायला अजून अर्धा तास अवकाश होता. माझ्या डोळ्यावर, हलकीशी पेंग येत होती. एखादा डूलका काढावा, म्हणून मी डोळे मिटले. आणि, स्वतःला निद्रादेवीच्या स्वाधीन केलं. ते, कसल्याशा आवाजाने माझी निद्रा भंग पावली.

मुसळधार पाऊस पडायला सुरवात झाली होती. आतापर्यंत दिसणारे, समोरचे बर्फाळलेले अवाढव्य डोंगर, दिसेनासे झाले होते. सगळीकडे धुरकट वातावरण तयार झालं होतं. सुमोच्या समोरील काचेवर आमच्या श्वासांच्या वाफेमुळे एक हलकीशी झालर ओढली गेली होती. त्यावर गडद झालेला पाण्याचा एक-एक थेंब हलकेच ओघळत होता. आणि सुंदर अशी नक्षी त्या काचेवर तयार होत होती.
या भागामध्ये, वातावरण कधी बदलेल याचा नेम नसतो. असं, मी ऐकून होतो. आणि, आज ते याची देहा याची डोळा अनुभवत सुद्धा होतो. मी पुन्हा एकदा पुन्हा डोळे मिटले, आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र, माझा डोळा लागत नव्हता. इतर मित्रांचे कुजुबुजू आवाज कानी पडत होते.

" पावसाचा जोर असाच राहिला. तर, बहुतेक आज यात्रा रद्द होईल..! "

मन, धास्तावलं होतं. पाऊस थांबावा म्हणून, मी मनामध्ये देवाचा धावा करीत होतो. सतत चार तास मुसळधार पाऊस पडत होता. सुमोमध्ये बसून आता चार तास उलटून गेले होते. सकाळी आठ वाजता, पावसाचा जोर थोडा कमी झाला. देवच पावला म्हणायचं. थोडीशी रिपरिप चालू असताना, अचानक पाऊस बंद झाला. पुन्हा एकदा, लहरी वातावरणाचा आम्हाला सुखद धक्का मिळाला. आकाश स्वच्छ झालं, सुर्यानारायनाचं दर्शन झालं नाही. परंतु, त्याचं अस्तित्व मात्र जाणवत होतं. सैनिकी अधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शे-दोनशे गाड्यांचा जत्था, चंदनवाडीकडे रवाना केला. वेडी वाकडी वळणं घेत, अवघ्या अर्ध्या तासामध्ये, आमची गाडी चंदनवाडी पोस्ट् पाशी जाऊन थांबली. चंदनवाडी मध्ये सर्व यात्रेकरूंची पुन्हा एकदा तपासणी केली गेली. आणि आम्ही, अमरनाथ यात्रेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.

क्रमशः 

No comments:

Post a Comment