Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- नऊ.

"अमरनाथाच्या" या पवित्र भूमीवरून, माझा पाय काही निघत नव्हता. परंतु, जाणं तर भागच होतं. पावसाची रिपरिप चालूच होती. तंबूमध्ये पोहोचलो, अंगावर रेनकोट चढवला, पाठीवर ब्याग लादली. आणि, घोड्यांच्या मुक्काम स्थळी पोहोचलो. पुन्हा एकदा, घोड्यावर बसून प्रवासाला सुरवात केली. 
हे निसर्ग सौंदर्य, उभ्या आयुष्यात पुन्हा कधी पाहायला मिळेल कि नाही ? ते, माहित नव्हतं. म्हणून, पुन्हा-पुन्हा त्या निसर्ग सौंदर्याला डोळ्यामध्ये, मनामध्ये आणि क्यामेर्या मध्ये बंधिस्त करत, पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
बरच अंतर कापल्यावर आम्ही 'पंचतरणी' पाशी येऊन पोहोचलो. घोडे मालकांमध्ये, काहीतरी कुजबुज चालू होती. परंतु ते काश्मिरी भाषेत बोलत असल्यामुळे, ते काय बोलत आहेत. ते आम्हाला समजत नव्हतं. आणि, त्यांचा काहीतरी निर्णय झाला. जुन्या घोडे वाल्यानमार्फत, आम्हाला, नवीन घोडे आणि घोडे मालक ठरवून देण्यात आले होते. आता, नवीन घोडे आणि त्यांच्या मालकांबरोबर नव्याने आमचा प्रवास सुरु झाला होता.
तत्पूर्वी, अमरनाथाची कथा तुम्हाला सांगावीशी वाटतेय.
देवांचा देव तोची हा महादेव, म्हणजे शिवशंकर, या भगवान शंकराची तीर्थस्थळे हि बहुदा दुर्गम अशा ठिकाणीच आहेत. कैलास मानसरोवर अन त्या पाठोपाठ श्री अमरनाथ हि दोन्ही तीर्थस्थळे एवढ्या दुर्गम स्थानी आहेत. कि, शिवभक्तांना त्यांच्या पावन दर्शनासाठी खरोखर खडतर' आणि, कठोर अशी साधणारी यात्राच करावी लागते.
अमरनाथ यात्रा, हि जेवढी कष्टप्रद आहे तेवढीच ती स्वर्ग लोकाचा आनंद देणारी सुद्धा आहे. या जन्मी, एकदा तरी काशी यात्रेचं पुण्य घ्यावं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. हि, प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. असं म्हणतात, कि एक हजार काशी यात्रेचं पुण्य आपल्याला, एका अमरनाथ यात्रेमध्ये मिळतं. एवढी हि, परम पुण्यादाई यात्रा आहे.
अशी आख्यायिका आहे कि, भगवान शंकरांनी पार्वती मातेला अमरकथा सांगण्याचे अशावासन दिले होते. हि कथा, त्यांना एकांतात सांगता यावी म्हणून ते हिमालयात गेले. प्रथम त्यांनी, त्यांच्या सोबत असलेल्या नंदीचा ( बैलाचा ) त्याग केला. बैलगांव, याचा अपभ्रंश होऊन ते स्थान पहलगाव झालं. महादेवाने यात्रेला तेथून सुरवात केली. ( सुरवात करणे, म्हणजे हिंदीमधील 'पहल' करणा, सुरवात करणे. ) म्हणून पहलगाम.
पुढे गेल्यावर, त्यांनी कपाळीचे चंदन सोडले, ती चंदनवाडी. येथे नदी किनारी, माता पार्वतीशी रतीक्रीडा करत असताना. माता पार्वतीच्या डोळ्यातील काजळ भगवान शंकरांच्या चेहेर्याला लागलं. तेथील नदीमध्ये, भगवान शंकर आपला चेहेरा धुवत असताना. त्यांच्या, चेहेर्यावरील काजळानं या नदीचं पाणी निळेशार, नीलवर्णी झालं. ते आजतागायत, आहे तसच आहे. तीच हि नीलगंगा म्हणून प्रसिध्द पावली. या नीलगंगेत, स्नान केलं असता ब्रम्हहत्या, आणि गोहत्येच्या पातका पासून मुक्ती प्राप्त होते. पुढे भगवंतांनी, आपल्या गळ्यातील शेषनागाचा त्याग केला. ज्या ठिकाणी, भगवंतांनी आपल्या शेषनागाला सोडलं. ते ठिकाण, शेषनाग म्हणून प्रख्यात झालं. आणखी पुढे गेल्यावर, शंकरांनी आपल्या जटेतील गंगेस येथे उतरण्यास सांगितले. परंतु, गंगा काही ऐकेना. मग, भगवंतांनी रागाने आपल्या जटा सोडून त्या धर्तीवर आपटल्या. तेंव्हा हि गंगा पाच धारांमध्ये प्रवाहित झाली. त्या ठिकाणाला, पंचतरणी म्हणून ओळखलं जातं. तेथून पुढे गेल्यावर, एका निर्जन गुहेत भगवान शंकरांनी पार्वती मातेस अमर कथा सांगण्यास सुरवात केली. परंतु, अमर कथा ऐकता-ऐकता माता पार्वती निद्राधीन झाल्या. त्यावेळेस तेथे असलेल्या दोन कबुतरांनी हि अमर कथा ऐकली. आणि ते अमर झाले.
आज देखिल या गुफेमध्ये भक्तांना या कबुतरांच दर्शन होतं. आणि याच गुफेतील बर्फमय शिवलिंगाच्या पावन दर्शनाने भाविकांचा सर्व थकवा दूर होताच, त्यास अमरत्वाचा अलौकिक आनंद प्राप्त होतो.
प्रवास चालूच होता. आम्ही, पोषपत्री लंगर पर्यंत पोहोचलो होतो. वातावरण अगदी स्वच्छ होतं. पावसाची रिपरिप थांबली होती. अंगावरील रेनकोट आणि गरम वस्त्र काढून ब्याग मध्ये ठेवली. सकाळ पासून पोटामध्ये काहीच अन्न नव्हतं. पोटामध्ये आग पडली होती. लंगर मधील, गोड धोड पदार्थाचा थोडा आस्वाद घेतला. आणि, आम्ही पुढे मार्गक्रमण करायला सुरवात केली.
नवीन घोडे वाल्याला, पंचतरणी मध्ये काय प्रकार घडला होता ? तो विचारला. त्यावर समजलं, कि' दुसर्या दिवशी रमजानच्या पवित्र महिन्याला सुरवात होणार होती. आणि, आमच्या सोबत येणाऱ्या घोडे मालकांना रोजा ( उपवास ) ठेवण्यासाठी त्यांच्या घरी जायचं होतं. परंतु, परतीचे प्रवासी मिळत नव्हते. म्हणून, तेथे वास्तव्यास असणार्या घोडे मालकांकडून आमच्या सवार्या घेऊन परतीच्या प्रवासाला ते निघाले होते. कुतूहल म्हणून, मी त्यांना विचारलं. कि, तुम्हाला या प्रवासाचे किती पैसे मिळाले ? तर, तो घोडेमालक म्हणाला, फक्त पाचशे रुपये मिळाले. एवढ्या कमी पैश्यात तुम्ही यायला कसे तयार झालात ? असं विचारलं असता. तो मला म्हणाला,

कल दिनमे आपको' उन्होने शेषनाग से लिया था ना..! इसलिये, वापसिके कम पैसे हमे दिये गये.

मी त्यांना, जे खरं आहे ते सांगितलं. कि त्यांनी आम्हाला, सकाळी पंचतरणी मधून घेतलं आणि पुन्हा तिथेच सोडलं. आणि, तुमचेच भाऊबंद तुमची कशी फसवणूक आणि पिळवणूक करत आहेत. ते सुद्धा, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. हे सर्व समजून आता काहीच उपयोग नव्हता. कारण, ह्या घोडे मालकांनी जुन्या घोडे मालकांना प्रत्येकी अकराशे रुपये आमच्या समोर मोजून दिले होते. आणि, यांच्या वाट्याला फक्त उरलेले पाचशे रुपयेच येणार होते. रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या पोरा बाळात जाण्याकरिता' आणि त्या, कवडीमोल 'पाचशे' रुपड्या करिता तीस किलोमीटरची पायपीट, त्यांना करावी लागत होती.
वाटेमध्ये पुन्हा एकदा शेषनाग तलाव लागला. त्याचं निळशार पाणी, मनाला मोहिनी घालत होतं. प्रसन्न चित्ताने त्या तलावाला मी हात जोडले. आणि, पुन्हा-पुन्हा मागे वळून पहात राहिलो. या स्वर्गीय ठिकाणी, आपण पुन्हा कधी येऊ कि नाही ? या गोष्टीची सल, मनाला टोचत होती.
पिस्सू टॉपची खतरनाक चढाई तर पहिली होती. आता, उतार अनुभवायचा होता. घोडेमालकाने, एक हाथ माझ्या खांद्याला लावला. आणि, एका हाताने घोड्याला सांभाळत पूर्ण पिस्सू टॉप उतरला.
खाली येताच, नैसर्गिक देणगी लाभलेल्या गोर्या, गुलाबी, गोबऱ्या गालाच्या काश्मिरी ललना नजरेस पडल्या. चंदनवाडी जवळ येऊ लागलं होतं. आणि, पुन्हा एकदा स्वर्गातून पृथ्वीवर पोहोचल्याची जाणीव झाली.
चंदनवाडी मध्ये पोहोचल्यावर त्या घोडेवाल्यांच्या हातामध्ये प्रत्येकी सोळाशे रुपये आम्ही ठेवले. बक्षीस म्हणून, प्रत्येक मित्राने प्रत्येकी शंभर रुपये त्यांच्या हातवार टेकवले. मी माझ्या घोडेमालकाशी गळाभेट केली. येथपर्यंत सुखरूप पोहोचवल्या बद्धल त्याचे आभार मानले. त्याला, रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. आणि, तिथे जवळच उभ्या असलेल्या सुमो मध्ये बसून आम्ही पहलगाम च्या दिशेने निघालो.
भूकेको अन्न प्यासेको को पाणी जय हो बाबा बर्फानी.

समाप्त .....

No comments:

Post a Comment