Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- चार.

अमरनाथ यात्रेला निघताना, माझ्या घरच्यांचा आणि मित्र मंडळीचा सुद्धा मला फार विरोध होता. वातावरण खराब आहे. पुढच्यावर्षी जा..! असं, त्याचं म्हणनं होतं. प्रवासाला घरून निघताना, माझी आई तर चक्क माझ्या गळ्यात पडून रडलीच होती.. 
माझ्या मनामध्ये, खूप कालवाकालव होत होती. परंतु, काहीही होऊदेत' पण, यात्रेला जायचच. असा मनाशी मी ठाम निर्धार केला होता. त्यापाठीमागे सुद्धा, दोन कारणं होती. पहिलं म्हणजे, जिवंतपणी स्वर्ग पाहण्याची मनामध्ये अभिलाषा होती. आणि, दुसरी म्हणजे, अतिरेक्यांच्या धमक्यांना घाबरून, देवधर्म सोडून घरात बसनं मला इष्ट वाटत नव्हतं. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये उन, वारा, पाऊस यांचा मारा झेलत, भारतीय सैन्याने आपल्या वाटेकडे डोळे लावलेले असतात. त्याचं एकच म्हणनं असतं.

" तुम्ही यात्रेला या, तुम्हाला सुखरूप यात्रा घडवण्याची जबाबदारी आमची आहे."


आणि, आपण यात्रेला न जाणं म्हणजे; त्यांच्या, सुरक्षा यंत्रणेवर अविश्वास दाखवल्या सारखं मला वाटत होतं. बस, या दोन गोष्टीमुळेच, मला अमरनाथ यात्रेला जाणं भाग पडलं.

पाण्याचे दोन घोट घशाखाली उतरवले. थोडावेळ विश्रांती करून पुन्हा प्रवासाला सुरवात केली. प्रत्येकाच्या चालण्याची क्षमता हि एकसारखी नसते. त्यामुळे, आम्हा पायी जाणार्या सर्व मित्रांची फाटाफूट झाली होती. आणि आता, माझा एकला चला रे... असा, प्रवास चालू होता. काही वयोवृद्ध किंवा 'वजनी' स्त्री पुरुषांना घोड्यावरील प्रवास सुद्धा जमत न्हवता. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या डोल्यांची तिथे व्यवस्था करण्यात आली होती. चार सहा व्यक्ती मिळून, त्या डोलीची वाहतूक करत असत.
डोलीत बसल्यामुळे, मनुष्य पूर्णपणे परावलंबी होतो. त्या प्रवासात, त्याचा त्या डोलीत गप्प बसून राहण्याशिवाय कोणताच सहभाग नसतो. वाहतूक करणाऱ्या त्या चार सहा लोकांवरच त्याचं 'भवितव्य' अवलंबून असतं. डोलीवर बसलेल्या बर्याच महिलांना, मी धाय मोलून रडताना पाहिलं. झुलत जाणारी डोली आणि खोल दऱ्या पाहून त्यांच अक्षरशः वेड पळत होतं. त्या मोठ्याने ओरडत म्हणायच्या,

" भैय्या.. जरा धीरे चलो, मुझे बहोत डर लग रहा है. लगता है मै मर जाऊंगी "

त्यावर, ते डोली चालक, फक्त एकच वाक्य म्हणायचे." बहेनजी.. फिकर मत करणा, हम आराम से पोहोच जायेंगे." त्यांच्या, बोलण्यात आणि चालण्यात तेवढी ताकत सुद्धा होती. कमालीचे कणखर लोकं. त्या महिलांचे, वाक्य ऐकून मी पायी जात असून सुद्धा दचकायचो. आणि, त्या डोली पासून थोडं अंतर ठेऊनच चालायचो.
आता मात्र, माझ्या पायातील बळ सुद्धा संपत चाललं होतं. चढउतार करून पिंडर्ऱ्या जाम झाल्या होत्या. दुपारचे साडेबारा वाजले होते. आता, प्रवासातील दुसर्या मोठ्या चढाईला प्रारंभ झाला होता. त्या टापुचं नाव "शेषनाग"

चंदनवाडी ते शेषनाग, हे एकूण तेरा किलोमीटरच अंतर. समुद्रसपाटीपासून सुमारे १२५०० फुट उंच असं हे ठिकाण. याच ठिकाणी, शेषनाग तलाव आहे. आणि, याच ठिकाणी लीडर नदी सुद्धा उगम पावते. शेषनागची खडतर चढाई करून दुपारी दोन वाजायच्या आत तेथील सैनिकी पोस्ट् ओलांडायची, असा नियम आहे. अन्यथा शेषनाग येथे असणार्या तंबूमध्येच मुक्काम करावा लागतो. शेवटी, त्या अवाढव्य पर्वत रांगांसमोर मी सुद्धा हात टेकले. आणि दूर उभ्या असलेल्या, एका घोडेवाल्याला हाताने इशारा करून बोलावून घेतलं. आणि, घोड्यावर बसून पुढील प्रवासाला सुरवात केली.

क्रमशः

No comments:

Post a Comment