Friday, 20 November 2015

मन चाहे गीत...

विविध भारतीवरील, त्या खर्जातल्या आवाजाचा एकेकाळी मी खूप मोठा चाहता होतो. त्यावेळी, माझ्या घरी सुद्धा टेपरेकॉर्डर होता. परंतु, मला मन चाहे गीतं काही ऐकायला मिळायची नाहीत. कारण, घरी नेहेमी त्याच-त्याच केसेट लावल्या जायच्या. आणि, त्याचा तर मला जाम कंटाळा यायचा. दर महिन्याला नवीन केसेट आणायला पैसे तरी कोणाकडे होते..! 
आणि त्यात, माझी आवड तर बापरे बाप..

त्या लहान वयात, मी अण्णाभाऊ साठे यांना वाचून मोकळं केलं होतं. तर मग, मी किती पुढचा असेल. याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. बांगो.. बांगो.. बांगो च्या  जमान्यात. " जब भी ये दिल उदास होता है. जाने कौन आसपास होता है. " अशी दिलखेचक दर्दी गीतं ऐकायची मला त्यावेळी सवय होती. 
तर मुद्दा असा...
कि त्याकाळी, घरोघरी फोन नव्हते. त्यामुळे, मन चाहे गीत ह्या कार्यक्रमात आपली आवडती गीतं रेडियोवर ऐकण्याकरिता लोकं आकाशवाणी मध्ये तशी फर्माईशी पत्रं पाठवायचे. मग, आपला नंबर कधी लागतोय. त्याकरिता, रोज नित्यनेमाने तो कार्यक्रम ऐकणं क्रमप्राप्त असायचं. न जाणो, एखाद दिवशी आपलं नाव रेडियोवर यायचं. आणि, ते ऐकायला आपण तिथे हजर नसायचो. नाही का...
त्यामुळे, त्याकाळी वेळातवेळ काढून. अशी फर्माईश पाठवणार्या व्यक्ती. त्या कार्यक्रमा पुरतं का होईना... ते, रेडियो समोरून हलायचेच नाहीत.. त्या बाबतीत, हि लोकं खूप चौकस असायची.

आता, प्रत्येक गोष्टीचं रुपडं बदलत चाललं आहे. त्यामुळे, विविध भारतीने सुद्धा कात टाकली आहे. आता, सर्रास फोनद्वारे आपल्या गीताची फर्माईश कळवली जाते. किंवा त्याहीपुढे जाऊन, एसएमएस द्वारे सुद्धा आपल्या आवडत्या गीताची नोंद होऊ लागली. 
हल्ली तर, मोबाईल मध्ये सुद्धा रेडियो असतो. त्यामुळे, काम करता करता सुद्धा आपण त्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो. किंवा, आपल्या आवडत्या गीताच्या फर्माईशी करिता ताटकळत बसण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता भासत नाही.

आजच्या घडीला इंटरनेटच्या माध्यमातून, आपण पाहिजे तेंव्हा आणि हवं ते गीत पाहू किंवा ऐकू शकतो. पण, शेवटी नावलौकिकाचा प्रश्न आला. कि, अशा फर्माईशी आल्याच. प्रत्येक व्यक्ती, हा नावाचा भुकेला असतो. सगळेच काही स्टार होऊ शकत नाहीत. 
त्यामुळे, आपलं नाव कोणाला माहित असो अथवा नसो. पण आपण, स्वतःच नाव जरी त्या रेडियोवर ऐकलं. तरी, आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे, स्वतःच्या नावाचं लौकिक ऐकण्यासाठी हे माध्यम फारच प्रभावी ठरत होतं आणि आहे..

और.. पुणासे, पंडित पॉटर इन्होने अपनी फर्माईश भेजी है. फिल्म का नाम है, अग्नी परीक्षा और गीत के बोल है..

ओह ओह रे मन गुण गुण गुण गुण झूम के. 
गा रे कोही गीत, 
जिसे सुनके जागे मेरा सोया सोया मित.

No comments:

Post a Comment