दहावी झाल्यावर, किवा त्या अगोदर सुद्धा...
प्रत्येक मुलाला तालमीत किंवा जिम मध्ये जाण्याचा नाद लागतोच. तसा, तो मला सुद्धा लागला. आमच्या गावातील, एका तालमीत मी नियमित व्यायामाला जायचो.
अल्पावधीतच.. जोर बैठका मारण्यात, मी पक्का सराईत झालो. लैच मस्त घुमायचो.
तुम्हाला खोटं वाटेल. पण त्यावेळी, एका दमात मी तब्बल 'पाचशे' जोर मारायचो.
आयच्यान.. खोटं सांगत नाही बरं का..!
व्यायाम करायला, मी कुठेच कमी पडत नव्हतो. पण, येवढ्या मोठ्या व्यायामाला तेवढा मोठा खुराक सुद्धा मिळाला पाहिजे ना. म्हणून, आमच्या वस्तादाने मला सांगितलं.
तू.. एवढ्या जोर बैठका मारत जाऊ नकोस. व्यायाम जिरवायला, शरीराला तेवढा खुराक सुद्धा द्यावा लागतो. नाहीतर, विनाकारण तुला 'कडकी' भरायची.
त्या दिवसापासून, मी तालमीला कायमचा रामराम ठोकला. नको ती दुखणी कशाला नाही का. एकदा शरीरात कडकी भरल्यावर, उभ्या आयुष्यात 'सोनं' जरी खाल्लं तरी तब्बेत होणारा नसते.
हे मी, चांगलं जाणून होतो.
नंतरच्या काळात, मी स्टेडियम वर जायचो. शरीरात धग असावी. म्हणून.. धावणे, पोहोणे काही मैदानी खेळ असे छोटेमोठे व्यायामाचे प्रकार करायचो. पण, मनात एक खंत कायम असायची.
कि, आपली सुद्धा 'पिळदार' शरीर यष्टी असावी. पण, घरच्या गरिबीमुळे माझं ते स्वप्न स्वप्नच राहणार. हे मला, चांगल्याप्रकारे ठावूक होतं..
ब्यान्नव-त्र्यान्नव च्या सुमारास, आमच्या पुण्या भागात एक नवीनच पेव फुटलं होतं. गुजरात मधील एक डॉक्टर, पोस्टाने काही लाल, पिवळ्या, काळ्या गोळ्या पाठवायचा. आणि, त्या गोळ्यांच्या नियमित सेवनाने. दोन महिन्यातच, व्यक्तीचं जवळ-जवळ वीस-तीस किलो वजन हमखास वाढायचं. जबरी तब्बेत होऊन जायची...
त्या डॉक्टर चं नाव होतं. " डॉ.अमिशकुमार दावडा. "
जाऊदेत... तब्बेतच बनवायची आहे ना. तर मग, अशी नाही तर तशी. ह्या उद्देशाने, मी सुद्धा त्या डॉक्टर कडून गुजरात वरून गोळ्या मागवल्या.
एका वेळेला सात, अशा दिवसातून तीन वेळा गोळ्या खाव्या लागायच्या. आणि, काय सांगू तुम्हाला त्या गोळ्यांचा प्रताप...
गोळ्या खाल्ल्या.. कि अशी कडकडून भूक लागायची कि बास रे बास.. त्याकाळचा, माझा आहार ऐकताल तर तुम्हाला सुद्धा चक्कर आल्याशिवाय राहणार नाही..
दिवसातून, मी तीन वेळा जेवायचो. आणि, एका वेळेला माझा आहार असायचा.
" गव्हाच्या, सात मोठ्या चपात्या. "
दिवसभरात एकवीस चपात्या, आणि कुकरचं एक भांडं भात. मी एकटाच फस्त करायचो. सोबत वरण आणि भाजी सुद्धा आलीच कि..
त्यावेळी, माझ्या ह्या राक्षसी आहाराला, माझ्या घरचे सुद्धा जाम वैतागले होते.
पूर्ण घराला लागणारं जेवण, मी एकटाच फस्त करत होतो. आमच्या वहिनी तर, चपात्या लाटून- लाटून अगदी हैराण झाल्या होत्या.
पण, त्या गोळ्यांनी मला त्याचा चांगला असर दाखवला. दोन महिन्यात, माझं वजन पन्नास वरून थेट ऐंशी किलो झालं. कोल्हापुरातल्या पैलवाना सारखा,
मी, " गोल गुटगुटीत झालो होतो.. "
माझी खूप जुनी इच्छा फळाला आली होती. माझी तब्बेत झालेली पाहून, आमच्या गावात आणखीन बऱ्याच मुलांनी त्या गोळ्या मागवल्या. आणि, जो तो 'टराटर' फुगायला लागला होता.
झालं.. माझा दोन महिन्यांच्या गोळ्यांचा कोर्स एकदाचा संपला. आणि, त्याचबरोबर माझी भूक सुद्धा मंदावली. तेंव्हा कुठे, आमच्या घरच्यांनी मोकळा श्वास घेतला. पण, नंतरच्या काळात एक वेगळीच गम्मत घडली. दिवसाला, एकवीस चपाती खाणारा मी माणूस. परंतु, त्या गोळ्यांचा डोस संपल्या नंतर, मला दिवसातून दोन चपात्या सुद्धा जात नव्हत्या.
बघता-बघता, दोन महिन्याच्या आत. मी पूर्वी होतो तसाच झालो. उलट, त्यापेक्षा थोडा खराबच झालो. काय करावं ते सुचत नव्हतं. भूक अशी लागतच नव्हती.
जाऊदेत, माझं तरी एवढ्यावरच भागलं होतं. परंतु, ह्या तब्बेतीच्या मोहापाई झिरो फिगरवाल्या एका बाईला आपला जीव गमवावा लागला. तर, माझ्या एका मित्राच्या पायावरून कसलं तरी वारं गेलं. आणि तो कायमचाच लंगडा झाला. एका मित्राच्या चेहेरा, अगदी काळा ठिक्कर पडला.
ते त्याने, पुन्हा गोरं व्हायचं काही नावच घेतलं नाही...
बापरे, हे सगळे प्रकार पाहून मी तर पुरताच घाबरून गेलो होतो.
पण, कोणतंही नुकसान न होता पूर्वपदावर आलो. त्याचं बाकी मला समाधान वाटत होतं.
कोणाचाही सल्ला न घेता. आम्ही, परस्पर हा उद्योग उरकला होता. त्याची फळं तर आम्हाला भोगावी लागलीच होती. नंतर, त्या डॉक्टरचा आम्हाला काहीच तपास लागला नाही. मी तर, एक शिव्याने भरलेलं खरमरीत पत्र त्याला लिहून पाठवलं होतं. पण मला नंतर समजलं, त्याला मराठी येत नसणार. त्यामुळे, माझे ते श्रम सुद्धा वाया गेले.
त्या, अमिशकुमार दावडा ने, आम्हाला चांगलंच आमिष दाखवून. खूप पैसा कमवला असेल. आणि तो श्रीमंत सुद्धा झाला असेल.. पण एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटतेय. त्याने, त्याचं काम केलं होतं. आणि, कोणतीही शहानिशा न करता आम्ही त्याला दुजोरा दिला होता. आमचं, 'बलवत्तर' नशीब आमच्याबरोबर होतं. म्हणून, आम्ही बचावलो.
त्या अमिशकुमार ने, काय करायचं ते केलं असेल. पण आम्हाला फसवून. त्याने, त्याच्या आडनावाचा 'अपभ्रंश' मात्र आमच्या हातात ठेवून दिला होता.
छान
ReplyDeleteधन्यवाद सर..
ReplyDelete