Sunday, 3 December 2017

खरं सांगायला गेलं तर..
बेकरी मध्ये बनणारे पदार्थ मला बिलकुल आवडत नाहीत. कारण, मैदा हा माझा सर्वात मोठा दुश्मन आहे. पण नाही म्हणता, कधी कधी नाईलाजाने बेकरीत मिळणारे पदार्थ मी खात असतो.
मी पालिकेत कामाला लागलो तेंव्हा,
म्हणजे, प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला आम्हाला रोख रकमेत पगार मिळत असायचा. त्यामुळे, कधी कधी मी सरकारी नोकर आहे कि नाही..? त्याची सुद्धा मला शंका वाटायची. 
पण साधारण पंधरा वर्षांपूर्वी, आमचे पगार सुद्धा बँकेत जमा होऊ लागले. आणि माझ्या मनाने सुटकेचा निश्वास सोडला.
तर, त्यावेळी.. पगार झाला, कि घरी जाताना मुला बाळांना काहीतरी खाऊ न्यावा,
म्हणून.. मी स्वारगेट वरून निघताना बसमधून मुद्दाम आमच्या पालिकेच्या बस थांब्याला उतरायचो. आणि तिथे समोरच असणाऱ्या, " रामसर " नावाच्या बेकरी मधून काही जिन्नस खरेदी करायचो. आणि, बेकरीत मिळणारे ते गोडधोड पदार्थ घरी घेऊन जायचो. त्यानंतर रेल्वे रुळावरून पुढे चालत जाऊन, शिवाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर मी पोहोचायचो.
अनारकली म्हणजे, खारी प्रकारात मोडणारा खोबऱ्याचा किस आणि टुटीफ्रूटीचं भरपूर सारण भरून तयार केलेला एक खुसखुशीत असा गोड पराठा आहे. ज्याला एका पोळीचे चार तुकडे करून विकला जातो.
त्यावेळी.. मला पगार खूप कमी होता, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला फार मोठा आनंद मिळायचा. तो आजच्या घडीला पैसे देऊन सुद्धा विकत मिळणार नाही.
तर, त्यावेळी.. त्या बेकरीतून नव्याने विकत घेतलेला अनारकली नावाचा एक पदार्थ. मला, आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडला होता. त्यामुळे दर महिन्याला ही अनारकली माझ्या घरी अगदी हक्काने यायची. पण काही काळानंतर, माझ्या कामाचा रूट सुद्धा बदलला. आणि, बसने येणं जाणं सुद्धा बंद झालं. आणि योगायोगाने रोखीने पगार मिळायचा सुद्धा बंद झाला. त्यामुळे, दर महिन्याला पगार झाल्यावर घरी खाऊ घेऊन जायचा विषय सुद्धा बंद झाला.
त्यामुळे..या विषयावर, आजही माझी बायको मला खूप टोकत असते.
परवा.. माझ्या कामाचा एक भाग म्हणून, मी नेमका शिवाजीनगर परिसारत गेलो होतो. आणि सहजच मला त्या जुन्या विषयाची आठवण झाली. मग काय.. रामसर बेकरीमधून लागलीच सहा अनारली मी विकत घेतल्या.
त्यावेळी.. हि अनारकली फक्त पाच रुपयाला एक मिळायची. आता मात्र, तिची किंमत पंधरा रुपये झाली आहे. पण तुम्ही काहीही म्हणा, १९३२ सालापासून सेवेत असलेली हे बेकरी. त्यांच्या इथे बनत असलेल्या प्रत्येक पदार्थाची चव अगदी टिकवून आहे. इथे मिळणारा प्रत्येक पदार्थ कागदी खाकी पिशवीच्या वेष्टनात घालून दिला जातो. तुम्ही सुद्धा कधीतरी नक्की ट्राय मारा.

No comments:

Post a Comment