Tuesday, 19 December 2017

गेली दोन तीन वर्ष झाली..
लग्न मंडपात, स्टेजवर.. म्हणजे, नवरा नवरीच्या अगदी समीप असेल तरच. त्या वधूवरांना आशीर्वादित करण्यासाठी मी अक्षता किंवा फुलं घेत असतो.
अन्यथा, हे दोन्ही विषय मी अगदी कटाक्षाने टाळत असतो. समज आल्यावर, प्रत्येक व्यक्तीने याचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही. अन्नाची नासाडी, आणि नको ते अतिरिक्त खर्च हे टाळलेच पाहिजे.
याचबरोबर.. लग्नामध्ये असणारा अजून एक खर्चिक विषय म्हणजे..
" लग्नपत्रिका "
सुरवातीच्या काळात, मी स्क्रीन प्रिंटींगचा व्यवसाय सुद्धा केला आहे. त्यावेळी, माझा व्यवसाय असून सुद्धा. लग्नपत्रिका हा विषय मला कायम खटकायचा. त्याला, कारण हि तसच घडलं होतं.
माझा एक मुस्लीम मित्र, त्यावेळी माझ्याकडे लग्नपत्रिका छापायला आला होता.
सगळा मथळा तयार झाल्यावर, त्याने एका पांढऱ्या हॅन्डमेड पेपरवर अगदी साधी आणि सुटसुटीत अशी लग्नपत्रिका माझ्याकडून छापून घेतली.
त्या लग्नपत्रिकेवर, फक्त नवरा नवरीचं आणि त्यांच्या आई वडिलांची नावं, विवाहसोहळा ज्या ठिकाणी पार पडणार होता, त्या ठिकाणचा पत्ता. आणि, आमंत्रितांसाठी शुभेच्छापर दोन ओळी त्यावर लिहिल्या होत्या. याव्यतिरिक्त, दुसरा कोणताही मजकूर किंवा देवा धर्माची नावं किंवा धार्मिक स्थळांचे फोटो अथवा, कुराणमधील काही आयतं वगैरे काहीच लिहिलं नव्हतं.
माझ्या मनात हि शंका पटकन आली, आणि सहजच मी त्या मित्राला विचारता झालो.
कि.. प्रिंटेड लग्नपत्रिका, किंवा देवा धर्माचा विषय यामध्ये कुठेच नमूद केला नाहीये. किंवा नातेवाईकांची नावं सुद्धा नाहीयेत. याचं कारण काय..?
तर तो म्हणाला.. हे फक्त एक आमंत्रण आहे. त्यावर नको त्या गोष्टी कशाला पाहिजेत. या कागदाचं काम झालं, कि आपण त्याला लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकून देणार असतो. त्यावेळी देवादिकांची नावं किंवा कचऱ्यात पडलेल्या त्यांच्या तसबिरी पाहून आपल्या धार्मिक भावना दुखवणार नाहीत का..?
विषय अगदी छोटा होता, पण तो माझ्या मनाला खूप भिडला. त्यानंतर मी कित्तेक मित्रांना याविषयी सांगितलं. पण माझा विषय कोणीच मनावर घेतला नाही. त्यामुळे, आजही कित्तेक कचरा पेट्यात आपल्याला.. देवी, देवतांचे फोटो पडलेले आढळतात.
खरोखरच ज्यांना या विषयाची जान झाली असेल. त्यांनी या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. कारण एकतर, त्या लग्नपत्रिका सुद्धा खूप महाग असतात. आणि माझ्यामते एकप्रकारे तो वायफट खर्चच आहे.
एकदा मी तिरुपतीला गेलो असता, त्या भागात मी एक खूप सुंदर लग्नपत्रिका पाहिली होती.
आपलं व्हिजिटिंग कार्ड असतं ना, अगदी तेवढीच लग्नपत्रिका. फक्त नवरा बायकोचं नाव आणि विवाहस्थळाचा पत्ता, विषय संपला. पत्रिकेचा खर्च हि वाचला, आणि नेमकं उदिष्ट सुद्धा साध्य झालं.
आणि याही पुढे जाऊन, फक्त फोनाफोनी करून, किंवा.. मेसेज पाठवून सुद्धा तुम्ही हे काम लीलया पार पाडू शकता. यामध्ये मुख्य विषय म्हणजे वेळेची बचत होते. पैसे वाचतात, आणि धावपळ सुद्धा कमी होते. जुने मानपानाचे विषय वगैरे आता सगळ्यांनी सोडून द्यायला हवेत. कारण हि वेळ प्रत्येकावर येणार असते. त्यामुळे या विषयात सर्वांना सवलत मिळू शकते.
जमल्यास, या विषयाचं सर्वांनी आचरण करावं. त्यामुळे, पैशाचा अपव्यय सुद्धा टळेल. आणि कोणाच्या धार्मिक भावना सुद्धा दुखवल्या जाणार नाहीत..!

No comments:

Post a Comment