दहावीचा निकाल.. लागला कि लावला..?
काल, दहावीला बसलेल्या मुलांच्या घरी अगदी आनंदी आनंद आणि दिवाळी साजरी झाली असेल. काय जबरदस्त निकाल लागला आहे. रत्नागिरीतील एका मुलाला तर चक्क शंभर टक्के मार्क्स मिळाले आहेत. काय बोलावं आता, ऐकावं ते नवलच. अहो.. शंभर टक्के मार्क्स मिळतीलच कसे..? लिखाणात.. वेलांटी, कान्हा, मातरा काहीतरी चुकलं असेल कि नाही..? कि पेपर तपासणारी यंत्रणा सुद्धा अगदी कुचकामी झाली आहे..? काल दुपारी, आमच्या येथील एका मुलाला दहावीला एक्केचाळीस टक्के मार्क्स मिळाले. आणि, तो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाला. पास झाल्यावर तो गडी इतका खुश झाला होता. कि आनंदाच्या भरात त्याने चक्क गुलाल उधळला. त्यावर, माझे मित्र मला सांगत होते. कि त्याला अजून मराठी सुद्धा नीट वाचता येत नाहीये. परीक्षा देऊन आल्यावर, तो फक्त पाच दहा मार्कांचा पेपर लिहिला आहे असं आम्हाला सांगायचा. तर मग, हा एक्केचाळीस टक्यांचा पराक्रम त्याच्याकडून कसा काय घडला असेल..?
हल्ली, दहावीतील मुलांना.. साठ ते सत्तर टक्के मार्क्स तर अगदी सहजपणे मिळून जातात. हि गेल्या आठ दहा वर्षातील स्पष्ट दिसणारी घटना आहे. दहावीतील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी, म्हणून हात आखडता न घेता. प्रत्येक महाविध्यालयाने, त्यांच्या शाळेतील मुलांना शाळेतून मिळणारे पंचवीस किंवा तीस टक्के ग्रेस मार्क अगदी मोफत देऊन टाकले आहेत. मग पासिंग करिता उरलेले पाच दहा टक्के मार्क्स मुलं अगदी सहज मिळवून जातात. त्यामुळे, दहावीतील नापासांची संख्या त्यामानाने बरीच कमी झाली आहे.
सर्व पालकांना, सुरवातीपासूनच आपल्या पाल्याची अभ्यासातील झेप कुठवर आहे. हे चांगलंच माहित असतं. पहिली ते नववी पर्यंत, त्याला किती टक्के मार्क मिळाले आहेत. आणि, त्याच्या प्रगतीचा आलेख वाढतोय कि कमी झालाय, हे सुद्धा त्यांना चांगलच माहिती असतं.
तरी सुद्धा.. ऐपत असणारे पालक, आणि ऐपत नसणारे पालक सुद्धा. कर्ज काढून त्यांच्या मुलांना दहावीच्या परीक्षेसाठी खाजगी शिकवण्यांना पाठवताना आपल्याला पाहायला मिळतं. ते खाजगी शिकवणीवाले शिक्षक मंडळी, तुमच्या पाल्याला शिक्षण काय कोळून पाजणार असतात का..? अहो, तुमच्या मुलाचा जेवढा बुद्यांक असणार आहे, तो तेवढीच मजल मारणार. फारफारतर, त्यात दोन पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो. त्याउपर भव्यदिव्य असं काहीच घडणार नाही. असं माझा अभ्यास मला सांगतोय. माझ्या या वक्तव्यावर बरेच ट्युशन प्रेमी आणि ट्युशन चालक व्यक्ती नाराज होतील. पण आहे हि अगदी सत्य परिस्थिती आहे. पण काय आहे, प्रत्येकाला त्यांचा मुलगा पहिल्या नंबरने पास होताना पहायचं असतं. निव्वळ त्याकरिता, हा सगळा आटापिटा चालू असतो.
माझ्या माहितीप्रमाणे, सर्व शाळांमध्ये अजूनही व्यवस्थितपणे शिक्षण दिलं जात आहे. तर मग, खाजगी शिकवण्या लाऊन लोकांचे खिसे तुम्ही का म्हणून भरताय..?
तुमचा मुलगा पहिली ते नववी पर्यंत कधीही नापास झाला नाहीये. तर तो दहावीला तरी कसा काय नापास होईल..? दहावी म्हणजे काय, अगदी न झेपणारी गोष्ट आहे का..? फारतर टक्के थोडे कमी पडतील. यापुढे दुसरं काय होणार आहे.
लाख, दोन लाखाच्या खाजगी शिकवण्या लाऊन. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्णपणे परावलंबी करत आहात. त्यामुळे, शाळेत व्यवस्थितपणे शिकवलं जात नाही. असा अपप्रचार सुद्धा होताना दिसतोय. दिवसा शाळा आणि शाळेतून आल्यावर मुलांना खाजगी शिकवण्या चालू असतात. झोपेत सुद्धा त्या मुलांना फक्त अभ्यासच दिसत असतो. हे चुकतंय हो कुठेतरी.
मुलांना सतत अभ्यासात ठेऊन तुम्ही त्यांचं बालपण हिरावून घेत आहात. असं तुम्हाला वाटत नाही का..? आणि इतकं सगळं करून सुद्धा, तुमच्या मुलाला जेमतेम साठ सत्तर टक्के मार्कच पडले. तर ते मुल सुद्धा टेन्शन मध्ये. आणि पैश्यापरी पैसा गेल्याने, तुम्ही सुद्धा टेन्शनमध्ये. सांगा ना.. यातून साध्य काय होणार आहे..?
खाजगी शिकवण्यांना होणारा खर्च तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवला. तर तोच पैसा, तुमच्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी कामाला येईल. थोडं डोक्याने काम घ्या. इयत्ता दहावी नंतर, अभ्यासक्रम थोडा बदलतो. त्यावेळी, विविध पर्याय निवडत असताना, खाजगी ट्युशन लावण्याला माझा बिलकुल विरोध नाहीये. पण दहावीला खाजगी ट्युशनची बिलकुल आवश्यकता नाहीये. असं माझं ठाम मत आहे.
काहीवेळेस, चुकून दहावीला काही मुलांना ऐंशी नव्वद टक्के मार्क्स मिळतात. आणि तीच मुलं, पुढे अकरावीला नापास होतात. दहावीला जास्ती टक्के पडले. म्हणून, आपण त्यांना लगेच विज्ञान शाखेत पाठवतो. अहो, पण नववी पर्यंत मराठी माध्यमात त्याला इंग्रजीचं कितपत ज्ञान होतं. याची आपण कधी गोळाबेरीज करत असतो का..? शिक्षणा बाबतची त्या मुलाची आवड कोणीच पाहत नसतं. जो तो आपलंच घोडं पुढे ताणत असतो. आत्ताच आमच्या इथे, दहावीला ऐंशी टक्के मार्क घेणारा एक मुलगा बारावीला नापास झाला. हे दुक्ख पचवता न आल्याने, त्या मुलाच्या बापाने फाशी लाऊन घेतली. यातून साध्य काय झालं..?
प्रत्येक पालकाला अपेक्षा असते, माझं मुल खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. पण तुम्हाला खरं सांगतो. नशिबाच्या पुढे काहीएक नसतं हो. मी नशीब म्हणतोय म्हणून, सर्वांनी नशिबावर विसंबून राहता कामा नये. नाशिबासोबत अभ्यासाची नाळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आहे त्यात समाधान माना. खूप काही शिकून, सगळीच मुलं साहेब झाल्यावर. इतर साधीसुधी कामं तरी कोण करणार..?
जीवन म्हणजे, एक तराजू आहे. ते, थोडं खालीवर होत राहणारच. जास्तीचा ताण घेऊ नका, मुलांची आवड पाहून त्यांना त्यांचे मार्ग निवडूद्यात. त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा आस्वाद घेउद्यात. देवाने चोच दिली आहे, तशी त्याच्या दाण्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे.
असो.. दहावीतील सर्व यशस्वी विध्यार्थ्याचं. आणि, त्यांच्या पालकांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन..!
No comments:
Post a Comment