Saturday, 24 June 2017

बाईकस्वार व्यक्तींनी,
पावसाळ्यात.. खालील सुचनांचं नक्की पालन करा..
पावसाळा.. हा तमाम लोकांचा आवडता ऋतू जरी असला. तरी नियमांचं पालन न करण्याने, पावसाळ्यात दुचाकी स्वारांचे आपल्याला भयंकर अपघात होत असताना दिसतात. पाऊस तर, त्याच्या नियोजित आणि ठरलेल्या वेळेत येत असतो. पण अपघात झाल्यावर, सगळी लोकं बिचाऱ्या पावसाला दोष देत असतात.
पाऊस पडत होता ना, त्यामुळे झालं..!
१ ) पावसाळा येण्या अगोदर, आपण सर्वांनी आपल्या दुचाकी वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं अत्यंत अवश्यक आहे. तुम्ही ती केली नसेल, तर ताबडतोब करून घ्या. गाडीची व्यवस्थितपणे सर्व्हिसिंग करून घेतल्यावर, भर पावसात वाहनं बंद पडण्याची शक्यता फारच कमी असते.
२ ) बाईक स्वार व्यक्तींनी, स्वतःच्या सोयीकरिता.. पावसाळी रेनसूट, त्याचबरोबर हेल्मेट आणि पावसाळी चपला, सँडल किंवा तत्सम बुटाची एखादी जोडी खरेदी करून ठेवावी.
चामड्याचे किंवा महागडे शूज किंवा चपला पावसात वापरून त्यांना खराब करून, मी किती श्रीमंत आणि स्टेटस जपणारा व्यक्ती आहे. असा दिखाऊपणा कोणीही दाखवू नका. कारण, ते स्टेटस बघणारा तर फक्त बघून जातो, पण नुकसान मात्र आपलं होत असतं. ( भरपूर आमदनी असणाऱ्या व्यक्तींनी, ह्या विषयावर बिलकुल विचार करू नये. )
३ ) पावसाळ्यात शक्यतो.. जुने, टाकाऊ आणि अगदी सुस्थितीत असणारे कपडे वापरावेत. आणि पावसाळा संपल्यावर, त्या कपड्यांना ताबडतोब अलविदा सुद्धा करावा. चांगली ठेवणीतली आणि नवीन कपडे पावसाळ्यात वापरली असता. चुकून त्यावर, तेल मिश्रित चिखलाचे डाग किंवा शिंतोडे ऊडल्यास. ते काही केल्या जात नाहीत. त्यामुळे, या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळाव्यात. कारण, ब्रांडेड कपडे बरेच महाग असतात. पुन्हा एकदा, ( भरपूर आमदनी असणाऱ्या व्यक्तींनी ह्या विषयावर बिलकुल विचार करू नये. )
४ ) बाईकच्या पाठीमागील मड गार्डला, एखादा रबरी फ्लॅप तुम्ही नक्की लाऊन घ्या. रबरी फ्लॅप लावल्याने, आपल्या दुचाकीच्या मागील चाकातून पाठीमागील बाजूस हवेत उडणारं चिखल मिश्रित पाणी, आपल्यामागे असणाऱ्या बाईक स्वाराच्या कपड्यावर व चेहऱ्यावर उडू शकतं. त्यामुळे, आपल्यापासून इतरांना होणारा त्रास वाचू शकतो. आणि, स्वतःबरोबरच इतरांची सुद्धा काळजी घेण्याचं समाधान तुम्हाला मिळू शकेल.
५ ) तुमच्या रोजच्या ओळखीच्या किंवा पायाखालच्या रस्त्यात जरी पाणी साठलं असेल. तरी सुद्धा, त्या पाण्यातून बाईक चालवताना तुम्ही कमालीची सावधानता बाळगत अगदी सावकाशपणे वाहनं चालवा. कारण, चुकून त्या रस्त्यावर एखादा मोठा खड्डा पडला असेल. किंवा, एखाद्या पावसाळी चेंबरचं झाकण उघडलं गेलं असू शकतं. अनावधानाने चुकून, त्या खड्यात अडकून दुचाकी सहित तुम्ही त्या खड्यात पडलात. तर, पुढील होणाऱ्या गोष्टींची आपण कल्पनाच न केलेली बरी.
६ ) तुमच्या रोजच्या रस्त्यात, जर तुम्हाला रेल्वेरूळ क्रॉसिंग करावी लागत असेल. तर त्या रेल्वेच्या गुळगुळीत रुळावरून तुम्ही बाईक अगदी सावकाश हाकत चला. चुकून थोडीजरी गफलत झाली, तर तुमचा टांगा पलटी होणारा म्हणजे होणारच. आणि, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. डांबरी रस्त्याचा आणि रेल्वे रुळाचा मार फार जबरी आणि कधीही बरा न होणारा असतो बरं का.
७ ) पावसात.. चिखलाने किंवा रस्त्यावर उडणाऱ्या माती मिश्रित तेलकट पाण्याच्या फवाऱ्याने. तुमचा रेनसूट, आणि शूज खराब होऊ नये म्हणून. बाईकच्या समोरील बंपरला, जाडसर प्लास्टिकची तावदानं लाऊन घ्यावीत. हल्ली रस्त्यावर, तशी तावदानं विक्रीस उपलब्ध असतात. त्यामुळे, बाईकचं इंजिन सुद्धा चिखलमय होत नाही. आणि आपला सुद्धा बचाव होतो.
८ ) रोजच्या रोज न चुकता, तुम्ही तुमच्या बाईकची हेडलाईटची काच स्वच्छ करून घेत चला. पावसाळ्यात, चिखलाचे बारीकसारीक शिंतोडे उडून हेड लाईटच्या काचेवर चिखलाचं एक छोटसं आवरण तयार होत असतं. त्यामुळे, रात्रीच्या वेळी प्रवास करताना, हेडलाईटचा प्रकाश थोडासा कमी पडतो. अंधुक प्रकाश असल्याने, आपल्याला व्यवस्थितपणे दिसत नाही. त्यामुळे सुद्धा एखादा नवीन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
९ ) अगदी जोराचा आणि धुव्वादार पाऊस असेल, तर.. तुम्ही परिधान केलेल्या हेल्मेटची समोरील काच, वरील बाजूस उघडी करून ठेवा. त्यामुळे, तुमचा चेहरा ( स्पेशली, मुलींचा मेकअप ) पाण्याने भिजू शकतो. पण चुकून, हेल्मेटच्या काचेवर नाकातील दमट श्वासोच्छ्वासाने काचेवर धुकं तयार झाल्यास, अंधुक दिसल्याने सुद्धा एक मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० ) पावसाळ्यात भरधाव वेगाने वाहनं चालवणं टाळा. पावसात, गाड्या स्लीप होण्याचं प्रमाण फार जास्ती असतं. शिवाय, रस्ता ओला असल्याने. चुकून, रस्त्यावर नादुरुस्त गाड्यांचं ऑइल वगैरे सांडलेलं आपल्याला दिसत नाही. असा प्रसंग घडल्यास, गाडी स्लीप झाल्यावर. आपल्याला फार मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं. तेच जर, आपण अगदी सावकाशपणे वाहन हाकत असू. तर, शंभर टक्के नुकसान न होता, ते अगदी दहा टक्क्यावर येऊन पोहोचतं. शेवटी यात आपलाच फायदा आहे. आपल्या शरीराला जास्ती इजा पोहोचणार नाही.
११) सर्वात शेवटची, आणि महत्वाची सूचना..
आमच्याकडे कार घेण्यासाठी पैसे नसल्याने, आम्ही दुचाकी वापरत आहोत. त्यामुळे, कार चालक आणि मालक व्यक्तींनी. किमान पावसाळ्यात तरी, दुचाकी स्वारांना जास्तीचा त्रास न देता. किंवा, त्यांच्या सर्व चुका पोटात घेत, मोठेपणाने सौजन्य दाखवावे. हि नम्रतेची विनंती..!


No comments:

Post a Comment