Saturday, 24 June 2017

मनुष्य जन्म पुन्हा नाही..
हि किती विलक्षण गोष्ट आहे ना. इथे कोणत्याच चुकीला माफी नसते. चुकी केल्यानंतर आपण त्याबद्धल लाख प्रायश्चित्त करू. पण, ते समोरचा मान्य करेल तेंव्हाच.
ह्या संपूर्ण हयातीत काही लोकांना दोन दोन आयुष्य अनुभवायला मिळतात. कारण, सगळेच लोक काही कामगार नसतात. कामगार वर्गातील लोकांची दोन जीवनक्रम असतात. एक तर आपल्या घरातील आणि नातेवाईक मंडळी. तर दुसरी आपल्या कामातील मित्रांचा गोतावळा.
पूर्वी मी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला होतो. त्यावेळी एक घटना घडली होती. दिवाळीचा सण आला होता. दोनेक दिवसांनी कंपन्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यामुळे.. काही व्हेंडर लोकं, साहेबांना आणि कामगारांना मिठाईचे पुडे आणि काही भेटवस्तू देण्यासाठी येत होते. आनंदाचे दिवस होते, लोकांचे धंदे मजबूत चालू होते. त्यामुळे सगळे व्यापारी लोकं खूप आनंदात होते. त्यामुळे त्यांचा आनंद आणि पैसा ते इतर कामगार वर्गात सुद्धा वाटत होते.
तर त्या दिवशी, एक मोठा व्हेंडर स्वतः मारुती व्हॅन मधून मिठाईचे पुडे आणि काही भेटवस्तू देण्यासाठी आमच्या कंपनीत आले होते. त्यांनी मला माझी भेटवस्तू आणि मिठाईचा पुडा मला दिला. आणि माझ्यापेक्षा सिनीअर असणाऱ्या दुसऱ्या एका सुपरवायझरला सुद्धा त्यांनी भेटवस्तू आणि मिठाईचा पुडा दिला. त्या साहेबांनी पूर्ण गाडी भरून मिठाईचे पुडे आणले होते.
सहज म्हणून, मी त्या साहेबांना म्हणालो. साहेब, एवढे मिठाईचे पुडे कशाला आणले आहेत हो..?
तर ते म्हणाले, आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या इतर कामगारांना सुद्धा मिठाई देण्याची माझी इच्छा आहे. त्या साहेबांचे हे बोल ऐकून मला फार बरं वाटलं. तितक्यात माझे सिनियर सुपरवायझर त्यांना म्हणाले.
कशाला.. त्या कामगारांना कशाला मिठाईचे पुडे देताय..? नका देऊ, काही कामाचे नाहीयेत ते. माझ्या सिनिअर मित्राचे ते बोल मला काही आवडले नाही. म्हणून मी थोडं मध्ये बोललो, तर म्हणाले. तू गप्प बैस रे, मला शहाणपणा शिकवू नकोस..!
कितीही केलं तरी ते मला बरेच सिनियर होते. शेवटी मी सुद्धा गप्प बसलो. आणि ते साहेब सुद्धा कामगारांना मिठाईचे पुडे न देताच निघून गेले.
त्यानंतर महिनाभराने, तेच साहेब काही कामासाठी आमच्या कंपनीत आले होते. त्यांना एक जॉब खूप अर्जंट करून हवा होता. मी त्यांना घेऊन आमच्या एका वर्करपाशी गेलो. आणि त्याला म्हणालो, साहेबांना हा जॉब खूप अर्जंट आहे. जरा पटकन करून दे.
त्यावर.. तो कामगार त्या साहेबांना म्हणाला. पंडित साहेब म्हणतायेत म्हणून मी त्यांना नकार देत नाहीये. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही फक्त कामापुरते आमच्याकडे येता. सणावाराला तुम्हाला आम्हाला साधा मिठाईचा पुडा सुद्धा द्यावासा वाटत नाही.! कसले आहात तुम्ही मोठे साहेब..? बापरे, ह्या एका वाक्याने, त्या साहेबांच्या केल्या करविल्यावर पाणी पडलं होतं. आणि दुख्खी अंतकरणाने ते साहेब त्या कामगाराला म्हणाले..
नाहीरे.. मी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मिठाईचे पुडे आणले होते. पण मोठ्या साहेबांनी मला सांगितलं कि त्यांना कशाला मिठाईचे पुडे देताय. बघा, हवं तर पंडित साहेबांना विचारा..!
आता काही बोलावं तर मीच वाईट होणार होतो. पण शेवटी जे खरं आहे, ते मला सांगावं लागलच. हे सगळं ऐकल्यावर त्या कामगाराने त्या साहेबांना लगेच माफी मागितली. आणि त्यांचा तातडीचा जॉब त्यांना करून दिला.
या घडल्या प्रकारा नंतर, सर्व कामगार त्या मोठ्या सुपरवायझरवर खूप चिडून होते. पण त्याला बोलायची कोणाची हिम्मत नव्हती. पण ते कामगार सुद्धा काही साधे नव्हते. त्यांनी सुधा अगदी काट्याने काटा काढला.
वर्षभराने.. माझे सिनियर सुपरवायझर सेवानिवृत्त होणार होते. त्यादिवशी आमच्या स्टाफची चार लोकं वगळता एक सुद्धा कामगार कामावर हजर नव्हता. सर्वांनी अगदी ठरवून सुट्ट्या घेतल्या होत्या.
कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीच तिथे हजर नव्हत्या. तर मग, आता करायचं तरी काय. त्यामुळे, त्या सिनियर सुपरवायझरला त्यादिवशी बिना सत्काराचं त्याच्या घरी जावं लागलं होतं.
ज्या कंपनीत, आपण आपलं सगळं आयुष्य घालवलं. तिथून बाहेर पडताना, शेवटचा अलविदा अगदी चांगल्याप्रकारे आणि आनंदात व्हावा. अशी सर्वांची इच्छा असते.
परंतु.. कर्म तशी फळं, हि मनुष्याला भोगावी लागतातच..!

No comments:

Post a Comment