Thursday, 13 July 2017


एकोणीसशे एक्क्यान्नव सालातील हि घटना आहे..
माहेरची साडी या सिनेमाने,
त्यावेळी तिकीट बारी अगदी जाम करून टाकली होती. खूप दूर दुरहून लोकं हा सिनेमा पाहायला पुण्यात येत होते. काहीवेळेस तर, मुद्दाम पाहुण्यांकडे राहायला येऊन सुद्धा काही लोकांनी हा सिनेमा पाहिला होता. त्यावेळी या सिनेमाने, तब्बल सहा कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
हा सिनेमा म्हणजे, त्यावेळी सासुरवाशीण महिलांसाठी एकप्रकारची जत्राच ठरली होती.
आता.. असं काही असलं, 
कि या कामात आपण मागे राहता कामा नये. हे मी ठरवलं. आणि, आम्ही पाच सहा मित्रांनी. पुण्यातील, प्रभात सिनेमात हा चित्रपट पाहायला जायचं ठरवलं.
त्या दिवशी, दुपारचे सगळे शो हाऊसफुल झाले होते. शेवटी नाईलाजाने, आम्हाला रात्री नऊ ते बाराच्या शोची तिकिटं घ्यावी लागली.
तुम्हाला काय सांगू, त्या रात्री तो नाईट शो सुद्धा हाऊसफुल होता..! एवढी तुफान लोकप्रियता, या सिनेमाने त्याकाळी मिळवली होती.
एकदाचा सिनेमा सुरु झाला,
सिनेमा जसा रंगात येऊ लागला. तशा सासूरवास असणाऱ्या बाया बापड्या, विशिष्ट सीन पाहून हमसू हमसून रडत होत्या. स्वतःला त्या सीनमध्ये घालून हे आपलच दुखः दिसत आहे. असं समजून. त्या बिचार्या, त्यांच्या मनाची समजूत घालत होत्या.
रडताना..मिनटा, मिनिटाला त्यांच्या साडीच्या पदराचे काठ ओलेचिंब होत होते.
नाही म्हणता, या सिनेमात भाऊक प्रसंग आल्यावर माझ्या डोळ्याच्या कडा सुद्धा पाणावत होत्या.
आणि.. ती घटिका समीप आली..
शेवटचा सीन,
अलका कुबल मृत्यू शय्येवर पडलेली असते. आणि भाऊक होत, विक्रम गोखले दुक्खी अंतकरणाने पुढील डायलॉग बोलत असतात. आजवर कधीही न भेटलेला बाप, तिच्यासाठी मृत्यू शय्येवर माहेरची साडी घेऊन ( अंगावरील शाल ) आलेला असतो. सगळे प्रेक्षक, स्वतःला सिनेमामध्ये हरवून बसले होते. आणि नकळत, ते सुद्धा त्या सिनेमाचा एक हिस्सा झाले होते.
आणि तितक्यात..
आमच्या शेजारी बसलेला एक मनुष्य, डोळ्यातून आसवं गाळत.. त्याच्या खुर्चीवरून उठत एकदम कोपऱ्यात मोकळ्या जागेत गेला. हि त्याची अचानक झालेली क्रिया, मी त्याला पाहत होतो.
त्या शेवटच्या सीनमध्ये इतकी ताकत होती. कि, सिनेमागृहात आगदी भयाण शांतात पसरली होती. आणि अचानक, तो कोपऱ्यात गेलेला मनुष्य.
विक्रम गोखले यांना उद्देशून मोठ्याने ओरडला..
भाडखाव.. सगळं झाल्यावर आत्ता आलास व्हय तू..?
आणि काय सांगायचं.. सगळी लोकं त्या भाऊक प्रसंगात अगदी बुडून गेले असताना. या व्यक्तीचे हे बोल ऐकून,
लोकांच्या डोळ्यातील पाणी खाली जाऊ कि वर जाऊ अशा स्तिथीत आलं होतं. त्यांचा सगळा मूड ऑफ झाला होता. सिनेमातील गाभिर्य निघून गेलं होतं.
आणि त्यानंतर, डीसमूड झालेला एक प्रेक्षक रागा रागाने त्या व्यक्तीला म्हणाला..
तू पहिला बाहेर जा, नाहीतर लई मारीन बघ तुला..!
तेंव्हा कुठे, तो व्यक्ती सुद्धा शुद्धीत आला. आपण सिनेमा पाहत आहोत. याचं त्याला भान आलं. आणि, चिडलेल्या प्रेक्षकाच्या माराच्या भीतीने,
तो बिचारा सिनेमागृह सोडून ताबडतोब बाहेर निघून गेला..!
याला म्हणतात हाडाचा कलाकार, विक्रमजींना सलाम आहे..!

No comments:

Post a Comment