Thursday, 13 July 2017

सामाजिक बांधिलकी हा विषय मला खूप लवकर समजला.
इयत्ता अकरावी मध्ये असताना, पुण्यातील एका अंध शाळेत. आम्ही पाचसहा मित्र, सातवी आठवीच्या अंध मित्रांचे रायटर म्हणून त्यांना पेपर लिहायला मदत करायला जायचो.
त्यावेळी, आम्ही सगळे मित्र स्वतःची पदरमोड करून हे कार्य करण्यासाठी जात असुत. सलग तीन वर्ष, एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे काम केलं. त्यानंतर, शिक्षण आणि कामाच्या व्यापाने हे काम करण्याचा योग पुन्हा काही आला नाही.
त्यावेळी.. एक पेपर लिहिण्याकरिता, आम्हाला सरकार कडून काहीतरी चार रुपये मिळायचे. असे सात पेपरचे मिळून आम्हाला काहीतरी तीसेक रुपये मिळायचे. आणि त्यात कळस म्हणजे, सगळे पेपर लिहून झाल्यावर, ते अंध विद्यार्थी सुद्धा, आम्हाला वीसेक रुपये बक्षीस म्हणून देऊ करायचे. कितीही नाही म्हंटलं, तरी ते काही ऐकायचे नाही.
त्या अंध मित्रांनी, हे पैसे देण्यामागचं कारण म्हणजे. परीक्षेत, त्यांना येत नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लिहायचो. त्यामुळे खुश होऊन, ती अंध मुलं आम्हाला हि लाच देऊ करायचे. त्यात त्यांची सुद्धा काही चूक नव्हती. त्या शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांनीच असा पायंडा पाडला होता. आणि हि मुलं सुद्धा त्यांच्या पायावर पाय देत. अगदी तसच वागत होते.
पण आम्ही मित्र काय करायचो, शाळेतून रायटर म्हणून मिळालेले पैसे, आणि या मुलांनी देऊ केलेले पैसे एकत्र जमा करायचो. आणि त्या पैश्यातून त्या शाळेला काहीतरी भेटवस्तू द्यायचो. हि मुलं अंध असल्याने त्यांना या गोष्टीचा पत्ता लागायचा नाही. पण आम्ही आमचं काम करून मोकळे व्हायचो. आणि, आम्ही पैसे घेतल्याने त्या मुलांना सुद्धा समाधान वाटायचं.
हल्लीच दोनचार महिन्यापूर्वी, माझे फेसबुक मित्र Prashant KulkarniAnand A KulkarniRoopali Parkhe Deshingkar यांनी सुद्धा काही अंध मित्रांचे पेपर लिहिण्यासाठी रायटर म्हणून मदत केली होती. हि निश्चितच चांगली आणि आनंदाची गोष्ट होती. त्यावेळी, या तिघांचं मला विशेष कौतुक वाटलं होतं. कारण आजच्या धावपळीच्या युगात. अंध व्यक्तीला रस्ता पार करून द्यायला सुद्धा कोणी पुढे सरसावत नाहीत. तर मग, त्यांच्या करिता वेळ वाया घालवून त्यांचे पेपर लिहायला कोण जाईल..?
त्यामुळे, या भरीव योगदानाबद्धल तुम्हा सर्व मित्रांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो.
सर्वसाधारणपणे, रायटर मंडळी अंध मित्रांना पेपर लिहायला "मदत" करतातच. म्हणजे, आपल्याला त्या समोरील विषयातील जितकं येईल तितकं लिहित राहायचं. असं करण्यामागे, आपलं सुद्धा एक चांगलंच उद्धिष्ट असतं. एकतर या सगळ्या जन्मजात पिडीत व्यक्ती. आपल्या हातून कोणाचं तरी भलं व्हावं. हा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला. तर त्याचं जीवनमान नक्कीच उंचावेल. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल, तो सुद्धा मुख्य प्रवाहात येईल. हाच आपला त्यामागचा मूळ उद्देश असतो.
पण मित्रहो.. काहीवेळा,
स्पर्धा परीक्षा दरम्यान, हि "मदत" म्हणजे, फार मोठं पातक सुद्धा ठरू शकतं..!
परवा.. अंधांना सहाय्य करणारा एक अंधमित्र मला भेटला. आणि अगदी खेदाने मला तो म्हणाला, पंडित भाऊ, शिक्षणाचा सगळा बाजार झालाय हो. आणि त्यात, आपली अंध लोकं तर खूप हुशार. तो काय म्हणतोय ते मला काही समजेना.
म्हणून मी, त्याला काय झालं विचारलं असता. त्याने मला जे काही सांगितलं, ते ऐकून मी अगदी सुन्न झालो.
तो म्हणाला..काही हुशार रायटर मंडळी, अंध मित्रांच्या नोकरी लागण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षाचे पेपर लिहायला जातात. ती मुलं, अगदी उच्चशिक्षित बेकार मंडळी असतात. आणि या अंध मुलांना ते शंभर टक्के पेपर लिहून देण्याचं आश्वासन देतात. आणि त्याच्या बदल्यात, परीक्षा पास होऊन, या अंध बांधवाला नोकरी लागल्यावर. काही ठराविक रक्कम, ते त्या अंध व्यक्ती कडून घेतात.
आपण या गोष्टीचा कधी विचार सुद्धा करू शकत नाही. पण ऐकावं ते खरोखर नवल आहे कि नाही.
शेवटी.. त्या आरक्षित जागेवर, कोणीतरी अंध व्यक्तीच कामाला लागणार असतो. पण ज्या अंध विध्यार्थ्याने खरोखर जीव तोडून अभ्यास केला असेल. तो अंध विध्यार्थी, या विकाऊ आणि डोळस रायटर विध्यार्थ्या समोर अगदी कुचकामी ठरणार हे नक्की. आणि हाती आलेली नोकरी गमावून बसणार. आणि त्या ठिकाणी दुसराच कोणीतरी कामाला लागणार. हे सुद्धा तितकच खरं आहे. खरं तर असं व्हायला नकोय, यासाठी काही निकष म्हणून, फक्त लिहिता वाचता येणाऱ्या ( उच्चशिक्षित नाही ) विध्यार्थ्यांनाच यांचे रायटर म्हणून नेमलं गेलं पाहिजे. त्यामुळे, ज्याचा शेर त्याला मिळेल.
आणि यामुळे, आपल्या हातून एखादं मोठं पातक होण्यापासून सुद्धा आपण बचावू शकतो.

No comments:

Post a Comment