Thursday, 26 October 2017

माझं जन्मगाव जरी, पिंपरी-चिंचवड असलं.
तरी.. माझं मूळगाव हे कराडपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असणारं निळेश्वर वडोली हे आहे. माझा जन्म पुण्यात झाला असल्याने, फक्त.. काही धार्मिक कार्य किंवा कोणाच्या सुखदुखात तेवढं माझं गावी हमखास जाणं होत असतं. लग्नसमारंभ आणि देवाची यात्रा या कार्यक्रमांना मी काहीतरी जुगाड करून त्याठिकाणी माझी हजेरी लावत असतो.
बरीच वर्ष झाली.. कामाच्या व्यापामुळे, मला आमच्या गावजत्रेला काही जाता येत नव्हतं. पण यावर्षी ते काम मी जमवलंच. आमची गावजत्रा, हि दसऱ्या दिवशी असते. सगळीकडे नवरात्रीत देवीचे घट बसत असतात. पण आमच्या गावात, हेच घट महादेवाचे ( म्हणजेच निळेश्वराचे ) बसत असतात.
पुणे भागात, परडीमध्ये घट बसवले जातात. पण आमच्या भागात हेच घट, पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळीवर बसवले जातात. पत्रावळीवर असणाऱ्या मातीमध्ये विविध धान्य पेरून, त्यावर एक छोटा माठ ठेवला जातो. त्या माठामध्ये पाणी भरून ठेवतात, आणि त्याच माठापासून आपल्या देव्हार्यापर्यंत विड्याच्या पानाची माळ एका दोऱ्यात गुंफून लावली जाते. सातव्या दिवशी, धपाटे आणि उसळीचा नैवद्य दाखवला जातो. आणि आठव्या दिवशी घटाला नैवद्य म्हणून, गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कडक अशा गोड पुऱ्या घटापाशी बांधल्या जातात. याला आमच्याकडे कडाकनी असं म्हणतात. या गोडसर आणि कडक कडाकनी चवीला खूपच स्वादिष्ट असतात.
आमचे नवरात्रीत असणारे उपवास फार कडक असतात. उपवासाच्या पहिल्या दिवशी, काहीही खाल्लं जात नाही. किंवा साधं पाणी सुद्धा घ्यायचं नसतं. नंतर दुसऱ्या दिवशी, सायंकाळी पाचनंतर महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं पेलाभर दुध अमृत म्हणून घ्यायचं. आणि त्यादिवशी फक्त ते पेलाभर दूधच प्यायचं. आणि तिथूनपुढे मग तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. त्यानंतर.. तिसऱ्या दिवसापासून, नऊ दिवस फक्त फळं, ज्यूस आणि सुकामेवा खायचा. बाकी इतर.. खिचडी, वरई, भेंडी, भोपळा आणि इतर उपवासाचं काहीबाही असतं. ते काहीच खायचं नाही.
इतके कडक उपवास असल्याने, इच्छा असून सुद्धा कामाच्या व्यापाणे जमत नसल्याने. उभ्या आयुष्यात फक्त एकदाच मी आणि माझ्या सौने हे उपवास केले आहेत.
दसऱ्या दिवशी, आमच्या गावात गोड नैवेद्याची जत्रा असते. या जत्रेला " पेढ्याची जत्रा " असं म्हंटल जातं. यादिवशी, गावातील प्रत्येक व्यक्ती आपट्याच्या ( सोनं ) पानासोबत किलोभर का होईना पेढे घेऊन एकमेकांना वाटत असतात. त्यादिवशी गावामध्ये किमान तीसेक पेढ्याची दुकानं लागत असतील. यावेळी तर, आमच्या गावात मराठी बोलणारे बिहारी व्यापारी सुद्धा दिसले. संध्याकाळी सहाच्या दरम्यान, मुख्य मंदिरातून देवाची पालखी निघते. पालखी वाहायला मराठ्याची लोकं असतात. पालखी समोर गुरव असतो, तर पालखी सोबत दिवे घेऊन जायला बारा बलुत्याची लोकं असतात. पालखीमध्ये देवाचा मुखवटा, आणि देवाच्या पायातील वहान असते. पालखी निघाल्यावर, सर्व भाविक पालखीचं दर्शन घ्यायला एकच झुंबड करत असतात. हि पालखी, प्रथम गावाच्या वेशीवर नेली जाते. त्याठिकाणी सीमोल्लंघन करून ती पालखी पुन्हा एकदा गावातील मारुतीच्या मंदिरात विसावली जाते.
हे सगळं उरकल्यावर, गावातील एका मुख्य कार्यक्रमाला सुरवात होते. गावातील मुख्य चौकात सगळा गाव जमा होतो. मग तिथे, धार्मिक कामाकरिता निधी गोळा केला जातो. आणि गतवर्षीच्या जमाखर्चाचा हिशोब सांगितला जातो.
प्रत्येक गावकरी, सढळ हाताने देणगी देत असतो. या देणगीची कोणतीच पावती वगैरे दिली जात नाही. सगळा तोंडी हिशोब असतो.
यावर्षी, देणगीच्या माध्यमातून.. गावामध्ये नव्याने निर्माण होणारी शिवसृष्टी, अध्यायावत तालीम, सटवाई देवीचं मंदिर, गणपती मंदिर आणि निळेश्वर मंदिराच्या कामाकरिता देणगी जमा करण्यात आली. अवघ्या तासाभरात, गावातील अंतर्गत तंटा वगळता सुमारे पाच लक्षाचा रोख निधी जमा झाला.
त्यानंतर.. रात्री दहाच्या सुमारास, दिवट्याच्या उजेडात आणि हलगीच्या तालात वाजत गाजत पालखी निळोबाच्या मंदिरात विसावा घेते. आणि, इथेच यात्रेची सांगता होते.
निळेश्वराच्या मंदिरामागे, एक जुन्या काळातील विहीर आहे. पूर्वी याच विहिरीतल्या पाण्याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे केले जायचे. पण काळाच्या ओघात, मंदिरात येणाऱ्या गावकरी भाविकांनी. थोडा-थोडा करत निर्माल्य म्हणून जमलेला कचरा. त्या विहिरीत टाकायला सुरवात केली. आणि आजच्या घडीला, तीच विहीर अगदी उकीरड्या सारखी झाली आहे. त्या विहिरीतून भयंकर दुर्गंधीयुक्त दर्प येत असतो. मी सहजच काही लोकांच्या हे लक्षात आणून दिलं.
आणि म्हणालो.. दरवर्षी एवढी देणगी जमा होत आहे. तर, त्यातील लाख दोन लाख रुपये खर्च करून, त्या विहिरीला स्वच्छ करून घ्या. त्यातील गाळ काढून, थोडा खंदक घेऊन त्या विहिरीला पुनर्जीवित करा. तर एक जन मला म्हणाला..
नाही, आता ती विहीरच बुजवून टाकायची आहे..!
गावामध्ये गटातटाच्या राजकारणाला, नको तितका उत येत असतो. त्यामुळे आजच्या घडीला गावामध्ये फक्त मंदिरं, तालीम आणि शिवसृष्टी बांधायची चढाओढ चालू आहे. आणि जुन्या पुरातनकालीन विहिरी सारखा अनमोल ठेवा, काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जात आहे. नाही म्हणता, या गोष्टीचं दुखः मनामधून काही केल्या जात नाही.
निळोबाच्या नावानं चांगभले..
( सोबत :- आवळे बंधूंच्या हलगीच्या तालात वाजत गाजत निघालेल्या पालखीची, एक छोटीशी चित्रफित जोडत आहे. )

No comments:

Post a Comment