Thursday, 26 October 2017

तर मग हे नक्की वाचा, तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. आणि काही गोष्टी सुद्धा तुम्हाला समजतील. कारण, तिरुपती बालाजी देवस्थानातील मुजोरगिरी काही केल्या संपत नाहीये.
हि पोस्ट थोडी मोठी आणि दोन भागात आहे, पण माहिती जबरदस्त आहे. हि माहिती, तुम्हाला पैसे देऊन सुद्धा वाचायला मिळणार नाही.
खरं तर.. तिरुपती बालाजी, हे माझं आराध्यदैवत आहे.
गेली वीस वर्ष, सातत्याने मी बालाजीच्या दर्शनाला अगदी नित्यनेमाने जात आहे.
वीस वर्षातील.. सुरवातीची आठ दहा वर्ष तर, मी चक्क वर्षातून तीन ते चार वेळा बालाजीच्या दर्शनाला गेलो आहे.
एवढंच काय, त्यावेळी मी एक संकल्प सुद्धा सोडला होता.
कि एका वर्षी, वर्षभर महिन्यातून एकदा मी हि वारी करेन. पण माझा हा संकल्प, काही तडीस गेला नाही. पण आज ना उद्या, मी हा संकल्प नक्कीच पूर्णत्वास नेणार आहे.
या वीस वर्षात.. तिरुपतीला गेल्यावर, जेमतेम दोन तीन वेळाच. रेणीगुंठा ते तिरुमला हा प्रवास मी बसने केला असेल. नाहीतर, रेणीगुंठा येथून बसने सप्तगिरी पर्वताच्या पायथ्याला अलीपिरी येथील पादमंडपात उतरून. तेथून पुढे सप्तगिरी पर्वतावर मी पायी वारी केली आहे.
गेल्यावर्षी.. तिरुमला येथे पायी जाण्यासाठी, श्रीनिवास मंगापुरम येथील नवीन रस्त्याची मला एका मित्राकडून माहिती मिळाली. तिथे सुद्धा, बालाजी रायाचं नितांत सुंदर असं एक मंदिर आहे.
त्यामुळे.. गेल्यावर्षी पासून, मंगापूरम येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या.
" श्रीवारी मेट्टू " येथील नव्या रस्त्याने मी तिरुमला येथे पायी जात आहे.
रेणीगुंठा ते अलीपिरी, हे अंतर साधारण तेरा किलोमीटर आहे. आणि रेणीगुंठा ते श्रीनिवास मंगापुरम ( श्रीवारी मेट्टू ) हे अंतर, एकूण एकोणतीस किलोमीटर आहे.
हे अंतर, आपण सरकारी बसने किंवा भाड्याच्या जीपने सुद्धा पार करू शकतो. तिथून पुढे, पायी यात्रा सुरु करण्याअगोदर. या दोन्ही पायी यात्रेच्या मार्गावर आपल्या सोबत असणाऱ्या अवजड सामानाची, देवस्थानच्या मदतीने अगदी विनामूल्य आणि सुरक्षित अशी वाहतूक केली जाते. त्यांचा नियम एकच असतो, सगळ्या ब्यागा कुलुपबंद असाव्यात. त्यामुळे, चालत जाताना आपल्याला अंगा खांद्यावर बोजा वाहायची गरज पडत नाही. त्या संस्थानाने दिलेली हि सुविधा. अगदी वाखाणण्याजोगी आहे. यात तिळमात्र शंका नाही.
अलीपिरी मार्गे तिरुमला येथे जाण्यासाठी, पायी यात्रा करताना. तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या आणि काही पायी रस्ता सुद्धा आहे. असा एकूण, अकरा किलोमीटरचा टप्पा भाविकांना पार करावा लागतो.
या पायी यात्रेला, साधारणपणे पाच ते सहा तास लागतात.
परंतु, श्रीनिवास मंगापूरम येथील रस्त्याने तुम्ही गेलात. तर हा साधारण तीन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही अवघ्या एक ते दीड तासात तिरुमला येथे पोहोचता. या दोन्ही बाजूने होणारा पायी प्रवास खूपच आनंददायी, प्रसन्न आणि अवीट गोडीचा असतो.
या यात्रेदरम्यान, पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये. म्हणून, पायी यात्रा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यात्रेच्या प्रवासादरम्यान मध्यभागात " दिव्यदर्शन " नामक एक दर्शन पास अगदी मोफत दिला जातो.
तो पास, तुम्हाला अशा ठिकाणी दिला जातो. जेथून त्या पायवाटेवरून बाहेर पडून तुम्ही एखाद्या वाहनाने तिरुमला येथे जाऊ शकत नाही. काही केल्या, तुम्हाला वर पर्यंत चालतच जावं लागतं. अशी विशिष्ट व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. पायी यात्रा करून, पास मिळालेल्या व्यक्तीला दर्शनाला जाण्यासाठी. पारंपारिक वेश परिधान करणं किंवा वेळेचं असं कोणतच बंधन नसतं. पास मिळाल्या पासून, चोवीस तासाच्या आतमध्ये आपण कधीही हे दिव्यदर्शन घेऊ शकतो.
परंतु.. गेल्या दोनेक महिन्यापासून. या दोन्ही मार्गावरील पायी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना सुद्धा काही जाचक नियम आणि आटी लावण्यात आल्या आहेत.
अलीपिरी मार्गे, रात्री बारा वाजल्यापासून भाविकांना दिव्यदर्शन पास द्यायला सुरवात केली जाते. तिथून पुढे, चौदा हजार भाविकांचा टप्पा पूर्ण झाला. कि त्यादिवशी, तिथून पुढे पायी येणाऱ्या भाविकांना दिव्यदर्शन पास दिला जात नाही.
आणि.. श्रीवारी मेट्टू मार्गे, सकाळी सहा वाजल्यापासून दिव्य दर्शनाचे पास दिले जातात. ते सहा हजार भाविकांचा टप्पा पूर्ण झाला. कि हे पास देणं बंद केलं जातं.
असे दोन्ही बाजूने मिळून, दिवसभरात फक्त वीस हजार पायी यात्रा करणाऱ्या भाविकांनाच दिव्यदर्शन पास दिले जातात. खरोखर हा फार मोठा अन्याय आहे.
कारण.. पायी जाणारे काही भाविक, हे प्रत्येक पायरीवर हळदी कुंकवाचं पाणी लावत. किंवा, कापूर प्रज्वलित करत जात असतात. आणि, हे काम म्हणावं इतकं सोपं नाहीये. कारण, एकेवर्षी आम्ही उभयतांनी सुद्धा, अलीपिरी मार्गे प्रत्येक पायरीवर कापूर प्रज्वलित करत. हि पायी वारी पूर्ण केली आहे.
तिरुमला येथील ट्रस्टी लोकांनी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चक्क देवाला सुद्धा वेठीस धरलं आहे. देव आपला दगड होऊन बसला आहे. पण तो हे सगळं पाहत आहे. हे त्या ट्रस्टी लोकांना समजत नाहीये. देवस्थानाच्या माध्यमातून, ते चिक्कार पैसा लाटत असतील. दर तीन वर्षांनी तेथील ट्रस्टी बदलत असतो. तिथे ट्रस्टी होण्यासाठी, फार मोठी रस्सीखेच चालू असते. ट्रस्टी होण्याच्या निवडणुकीसाठी तेथे बराच पैसा आणि मनुष्यबळ खर्च करावं लागतं. पण ट्रस्टी झाल्यानंतर, केवळ तीनच वर्षात, तो संभाव्य ट्रस्टी अब्जाधीश होऊन बाहेर पडत असेल. हि अगदी, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
शेवटी काय.. जिथे माल आहे, तिथे भ्रष्टाचार असणारच..!
पण एवढं करून, ते ट्रस्टी सुखी असतीलच. असं छाती ठोकपणे सांगता येत नाही. शंभर दुखणी आणि लफडी त्यांच्या मागे लागलेली असतात. हे एक निर्विवाद सत्य आहे.
श्रीवारी मेट्टू मार्गे, सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच यात्रेकरूंना पायी प्रवासासाठी सोडलं जातं. त्यानंतर, संध्याकाळी सहा वाजल्यापासून पायी यात्रा करू इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना डोंगर चढण्यास मज्जाव केला जातो.
कारण, या पायवाटेच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. आणि या जंगलात बरीच हिंस्र श्वापदं सुद्धा आहेत. त्यामुळे इथे हा निर्बंध ठेवण्यात आला आहे. मध्यंतरी त्या भागात, एका बिबट्याने काही यात्रेकरूंवर जीवघेणा हल्ला सुद्धा केला होता. पण सुदैवाने त्यातील कोणालाही जास्तीची इजा झाली नाही. हि सगळी त्या भगवंताचीच कृपा.
त्यामामाने, अलीपिरी मार्गे पायी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी चोवीस तास रस्ता खुला असतो. अलीपिरी मार्ग चढण्यास जरी कठीण आणि वेळकाढू असला. तरी, या रस्त्याने पायी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या जास्ती आहे. कारण, एकतर हे ठिकाण रेणीगुंठा आणि तिरुपती पासून अगदी जवळ आहे. आणि हा पायी रस्ता फार सुरक्षित सुद्धा आहे. या पायवाटे मध्ये, रस्त्यावर जागोजागी फूड स्टोल, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आहे. शिवाय जागोजागी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयं सुद्धा आहेत. त्यामुळे बहुतकरून यात्री लोकं, अलीपिरी मार्गे जाणच पसंत करत असतात. या पायी यात्रेमध्ये दक्षिण भारतातील गोरगरीब लोकांचा जास्तीचा भरणा असतो.
त्यामागील मुख्य कारण म्हणजे, एकतर त्यांचा बसने जाण्याचा खर्च वाचतो. शिवाय, आगाऊ बुकिंग न करता. त्यांचं दर्शन सुद्धा अगदी मोफत होतं. आणि लाडूचा प्रसाद सुद्धा मोफत मिळतो.
वरील नवीन अटी निर्माण करून, बालाजी देवस्थानाने गोरगरीब भाविकांच्या भावनांना फार मोठी हानी पोहोचवली आहे. याची फळं त्यांना नक्कीच भोगावी लागतील.
क्रमशः

No comments:

Post a Comment