Tuesday, 10 October 2017

#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- ३ )
=========================
त्या अवघड दरीतून,
मी.. चालत-चालत कसाबसा हमरस्त्यावर येऊन पोहोचलो. तोपर्यंत, त्या भागात बघ्यांची तोबा गर्दी जमा झाली होती. माझा अवतार तर खूपच विचित्र झाला होता. माझं संपूर्ण शरीर, रक्ताने माखलं गेलं होतं.
त्या खोल दरीतून, मी रस्त्यावर पोहोचताच..
कुलूच्या दिशेने.. समोरून चालत येणाऱ्या दोन महिलांनी मला पाहिलं. आणि, अशा विचित्र अवतारात माझं रक्ताने माखलेलं शरीर पाहून. त्या बसक्या नाकाच्या दोन्ही हिमाचली महिला, चक्कर येऊन जमिनीवर खाली पडल्या. त्यावरून, तुम्ही कल्पना करू शकता. कि, माझी किती भयंकर अवस्था असेल. बघ्यांची गर्दी, फक्त बघायचं काम करत होती. परंतु दुर्दैवाने, त्यातील कोणीही पुढे येऊन, मला आधार किंवा दिलासा दिला नव्हता.
मी.. त्या जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीतून तसाच थोडं पुढे चालत गेलो. आणि, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झाडाखाली बसून. त्या ट्राफिक जाम मधून हळूहळू पुढे निघालेल्या, आणि माझ्याकडे पाहत असणाऱ्या, प्रत्येक कार चालकांना हात जोडून मी मदतीची याचना करत होतो. पण.. त्या गर्दीमध्ये मला एकही ' देव माणूस ' दिसत नव्हता.
कपाळातून वाहणारं रक्त, काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हतं. माझ्या, हातामधील रुमाल सुद्धा रक्ताने 'किच्च' भिजला होता. आता, मला.. त्याठिकाणी बसून, जवळपास अर्धा तास उलटून गेला होता. पण, मला मदत करायला कोणीच तयार नव्हतं. अगदी हात जोडून सुद्धा. मनात वाटत होतं, आयला.. खरोखर माणुसकी मेली आहे राव.
तेवढ्यात, एकाएकी माझा मोबाईल खणखणला. पुणे महापालिकेत कामाला असणाऱ्या माझ्या मोठ्या वहिनींच्या भावाचा फोन आला होता.
माझ्या मनात शंका आली..
बहुतेक, या अपघाताची बातमी टीव्हीवर झळकली असावी. किंवा, आमच्यातील सुखरूप असणाऱ्या कोणीतरी त्याला फोन तरी केला असावा.
आणि.. माझा नेम अचूक ठरला. नेमकं तेच घडलं. अवघ्या अर्ध्या तासातच अपघाताची हि बातमी टीव्हीवर झळकली होती. आणि, हि भयंकर वार्ता संपूर्ण पुणे शहरात अगदी वाऱ्यासारखी पसरली होती. मला भयंकर दुखापत झाली असताना सुद्धा. मी, विजुशी..
( माझा मेहुणा ) अगदी व्यवस्थितपणे बोललो होतो.
" हो.. दुर्दैवाने आमचा भयंकर अपघात झाला आहे. पण सुदैवाने, मला काही सुद्धा झालं नाहीये..! "
असं, खोटं खोटंच मी त्याला सांगितलं. मी, स्वतः होऊन सवरून खोटं, पण.. अगदी व्यवस्थितपणे बोलत होतो. त्यामुळे, त्याला सुद्धा जरा हायसं वाटलं. त्यानंतर, इच्छा नसताना सुद्धा मी स्वतः माझ्या घरी फोन करून या अपघाताची माहिती कळवली.
मी सुखरूप आहे. हे, समजल्यामुळे माझ्या घरच्यांचा जीव अगदी भांड्यात पडला. कारण, अपघाताची इत्यंभूत माहिती, जी मला सुद्धा माहित नव्हती. ती, त्यांना समजली होती. आणि, रेंज मिळत नसल्याने त्यांना मला फोन सुद्धा करता येत नव्हता.
चला.. जे झालं ते अगदी चांगल्यासाठीच..
त्याठिकाणी मी भयंकर जखमी असताना, मला किंवा आम्हा अपघातग्रस्त व्यक्तींना मदत पोहोचली नाही. पण.. तेथपर्यंत मिडिया पोहोचला होतो.
सांगा, हि अजब गोष्ट आहे कि नाही..!
जो तो.. आमचा हा जखमी तमाशा पाहून पुढे निघून जात होता. तितक्यात, दैवयोगाने माझ्यासमोर एक मारुती कार येऊन थांबली. त्या कारमध्ये, साधारण पस्तीस,चाळीशीतल्या वयाचे दोघेच नवरा बायको होते. मी त्यांना माझे दोन्ही हात जोडले. आणि, अगदी अजीजीने म्हणालो.
" प्लीज.. मुझे हॉस्पिटल मे ले चलो. आपकी, बोहोत बडी मेहेरबानी होगी..! "
माझं एवढं बोलून झालं..
पण.. माझ्या शरीरातील रक्त, संपत चालल्या सारखं मला वाटत होतं. थोडी चक्कर सुद्धा येऊ पाहत होती. पण, मी धीर सोडला नव्हता.
त्या, उभयतांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाहीत. माणसाच्या रुपात साक्षात परमेश्वरच माझ्या समोर उभा राहिला होता. माझी विनंती स्वीकार करत.
त्यांनी, स्वतःची गाडी रक्ताने खराब होण्याची परवा न करता. मला, मागील सीट वर बसवलं. मी सुद्धा खूप हट्टी.. मी त्यांना, पुन्हा एक विनंती केली. कि, रस्त्यावर आमच्यापैकी अजून कोणी जखमी असेल, तर त्यांना सुद्धा आपल्या कारमध्ये घ्या.
माझ्या विनंतीला मान देत.. त्या व्यक्तीने, रस्त्यावर विव्हळत पडलेल्या माझ्या आणखी तीन सहकार्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेतलं. आणि, ती गाडी तिथून जवळच असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात पोहोचली.
मला अजूनही अगदी स्पष्ट आठवतंय. त्या रुग्णालयाचं नाव " ओयासिस " होतं.
मला मनातून तीव्र भीती वाटत होती. कि, हे रुग्णालय माझ्यासाठी " मृगजळ " ठरू नये म्हणजे मिळवली. आम्हा सर्वांना त्या इस्पितळात नेलं गेलं.
तिथे असणाऱ्या नर्सेसने, मला आणि माझ्या सगळ्या अपघाती मित्रांची सगळी विचारपूस केली. आम्ही सुद्धा, घडलेली सगळी हकीकत त्यांना बयान केली.
त्या नर्सने.. मला एका खुर्चीवर बसवलं. आणि, पहिली माझी संपूर्ण जखम तिने स्वच्छ करून घेतली. जखम स्वच्छ करत असताना. त्या नर्सने मला विचारलं, तुमच्या अंगावर हे पांढरं-पांढरं काय पडलं आहे..?
परंतु, ते पांढरं पावडरी सारखं काय पडलं आहे. ते काही माझ्या लक्षात आलं नाही. तिने, कपाळावरील जखम स्वच्छ करून, त्यावर रक्त थांबण्याचं औषध लाऊन, त्यावर पट्टी बांधली. तरी सुद्धा, जखमेतून थोडं-थोडं रक्त येतच होतं. खूप खोल घाव होता हो. आणि अचानकपणे, मी माझ्या कानामध्ये करंगळी घातली. तर, त्याला लागून रक्त बाहेर आलं. एकतर मी फार चिकित्सक माणूस. मला काही राहवेना, आणि मी त्या नर्सला पुन्हा एकदा आवाज दिला. ती माझ्यासामीप आली. मी तिला माझी अडचण सांगितली. तिने माझा कान तपासला, सगळं रक्त पुसून घेतलं. आणि खात्री झाल्यावर ती मला म्हणाली.
डरो नही... ये सिरके उपर से आया हुवा खून, तुम्हारे कानके अंदर गया था..!
त्या नर्सच्या तोंडून हे सगळं ऐकलं तेंव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. माझ्या मनातील नको ती शंका दूर झाली होती. शेवटी.. बाहेर जाताजाता, ती नर्स मला म्हणाली.. हा अपघात असल्यामुळे, याची पोलीस केस होणार आहे. त्यामुळे आम्ही फक्त प्रथमोपचार देऊ.. तुमच्यावर होणारे बाकी इतर उपचार, सरकारी दवाखान्यातच केले जातील.
आता मला थोडं हायसं वाटत होतं. मी खूप विचार केल्यानंतर, माझ्या अंगावर असणारं ते.. पांढरं- पांढरं काय पडलं होतं ? ते, माझ्या ध्यानात आलं.
ड्रायव्हर आणि क्लीनरच्या.. रोजच्या जेवणाच्या स्वयपाकाचं, ते गव्हाचं पीट होतं..!
ड्रायव्हर केबिनमध्ये, वरील बाजूस असणाऱ्या डिकीमध्ये ठेवलेलं ते गव्हाचं पीठ. अपघाता दरम्यान.. खाली माझ्या अंगावर पडल्यामुळे, ते गव्हाचं पीठ माझ्या पूर्ण चेहेऱ्याला लागलं होतं.
लाल रक्त, आणि.. पांढरं पीट, दोघांची चागलीच रंगसंगती घडून आल्यामुळे, बहुतेक माझा चेहेरा भयंकर चित्र विचित्र दिसत असावा.
बहुदा, त्यामुळेच त्या दोन हिमाचली महिला मला पाहून बेशुद्ध पडल्या असाव्यात.
माझ्यासोबत असणाऱ्या.. इतर तीन मित्रांना सुद्धा बर्यापैकी मुका मार बसला होता. आणि, थोडं फ्रेक्चर सुद्धा झालं होतं. त्यांना सुद्धा, खूप वेदना होत होत्या. दवाखान्यातील नर्सने, जमेल तसे त्यांना प्रथमोपचार दिले. तो पर्यंत, अपघाताच्या घटनास्थळी केमेरा सहित #स्टार_माझा मिडिया पोहोचला होता.
आणि, आम्ही या खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहोत. हे सुद्धा, कुलूच्या सरकारी इस्पितळात कोणाकडून तरी कळवण्यात आलं होतं. तासा भरात, आम्हाला घेण्याकरिता एक सरकारी रुग्नवाहिका तिथे आली. त्या दवाखान्यातील, डॉक्टरांचे आणि नर्सेसचे आभार मानून आम्ही तेथून निघालो.
आम्हाला, दवाखान्यात घेऊन आलेलं ते दैवी दाम्पत्य. आणि, ती कार मात्र तेथून ताबडतोब निघून गेली होती.
आमचा जीव वाचवण्याच्या धावपळीत,
अनवधानाने आमच्याकडून, त्या उभयतांचे आभार मानायचे राहूनच गेले होते. चुकून माझ्या विनंतीला मान न देता. त्यांनी, आम्हाला इस्पितळात दाखल केलं नसतं.
तर कदाचित,
हे सगळं काही लिहायला, आज.. मी या जगात नसतो..!
क्रमशः

No comments:

Post a Comment