Thursday, 26 October 2017

आता नव्यानेच, तिरुमला येथे सर्व प्रकारचे दर्शन पास देणं कायमचं बंद केले आहेत. ऑनलाईन बुकिंग करून आलेल्या व्यक्तींना ठरलेल्या वेळात. तासाभरात दर्शन मिळून जातं. पण फ्री लाईन मध्ये दर्शन घेणं खूपच कठीण झालं आहे. खूप गर्दी असल्याचा भास निर्माण करून, भाविकांना बारा, पंधरा तास दर्शन बारीच्या बराकीमध्ये कैद्यासारखं विनाकारण कोंडून ठेवलं जातं.
बराकीमध्ये.. एका काळ्या बोर्डवर, आपण तिथे आहोत त्या दिवसाची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. आणि आज दर्शन बारीसाठी थांबणाऱ्या भाविकांना दर्शन कधी मिळेल. ती तारीख आणि संभाव्य वेळ सुद्धा लिहिलेली असते. ती तारीख, साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीची असते.
त्यातल्या त्यात एक गोष्ट अगदी बरी झाली आहे. बायोमेट्रिक मोफत दर्शनाचा पास मिळाल्यावर, तुम्ही त्या बराकीतून बाहेर पडून ज्या वेळचं दर्शन मिळालं आहे. त्या दिवशी त्याच वेळेला दर्शनासाठी पुन्हा येऊ शकता. मधल्या वेळात, तुम्ही त्या भागात तुमचं इतर फिरणं वगैरे सुद्धा करू शकता. आता पूर्वीसारखं, बराकीमध्ये कोंडून राहावं लागत नाही.
तरीसुद्धा दक्षिणेतील काही भाविक, त्या बराकीत राहणंच पसंत करतात. त्यापासून त्यांना फायदा एकच. बाहेर रूम बुक करून त्यांचा राहायचा ताप आणि खर्च वाचतो. शिवाय, फ्री दर्शन करणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानाने खाण्यापिण्याची अगदी मोफत सोय सुद्धा केलेली असते.
आणि.. दर्शन सुद्धा अगदी दिलेल्या वेळच्या दोनचार तास अगोदरच होऊन जातं. पण नाही म्हणता, चोवीस तास नाही, तर किमान दहा बारा तास नक्कीच खर्ची पडतात. तेवढी सहनशीलता आपल्या अंगी असेल, तर तिथे असणाऱ्या बराकीमध्ये निवांत झोपून राहावं. दर्शन बारी सुरु झाली, कि झोपेतून उठून पुढे चालू लागायचं. त्या भागातील लोकांना, आता याची सवय झाली असल्याने. ती लोकं बराकीत येताना सगळा बोऱ्या बिस्तरा सोबत घेऊनच येत असतात. आणि बराकीतील पायऱ्यांवर मस्तपैकी पहुडले जातात.
इथे रूम बुकिंगचा सुद्धा एक वेगळाच त्रास आहे. तिथे बऱ्याच प्रकारच्या रूम भाविकांना मिळत असतात. अगदी पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपया पर्यंतच्या भाड्याच्या रूम्स तिथे उपलब्ध असतात. पण ग्रुप बुकिंगसाठी आपण मोठ्या रूम्स मागितल्या. कि सगळ्या रूम्स संपल्या आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. प्रत्यक्षात त्या रूम्स मोकळ्याच असतात. आणि मग विनाकारण छोट्या रूम घेऊन आपल्याला दाटीवाटीने राहावं लागतं.
हे सर्व होत असताना, बाहेर काही एजंट लोकं आपल्याला भेटतात. आणि काळ्या बाजारात देवस्थानातील मोठ्या रूम मिळवून देण्याची सोय करतात. पंधराशे रुपयाची रूम, पाच ते सहा हजार रुपयांना ते आपल्याला देऊ करतात. आणि पन्नास रुपयांची रूम चक्क पाचशे ते हजार रुपयाला देत असतात. हे सगळं काही, आतील कामगार लोकांचे लागेबांधे असल्या शिवाय होऊ शकणार आहे का..? सांगा ना, त्याशिवाय हे होऊ शकणार आहे का..?
हे सगळं करण्यामागचं गणित काय असावं..? तर तिथे घडत असणारा आर्थिक व्यवहार. तिरुमला देवस्थानाने तिथे असणारी कोणतीच मिळकत कोणाला विकत दिलेली नाहीये.
तिथे असणारी.. हॉटेल्स, चहाचे ठेले, कपडे आणि टोप्यांचे स्टोल्स सगळं काही भाडेतत्वावर दिलं आहे. आणि दरवर्षी त्याचे नव्याने लिलाव केले जातात. हे लिलाव सुद्धा काही साधे नसतात.
रोडच्या कडेला असणाऱ्या चहा, कॉफीचे स्टोल्स.. दरवर्षी वीस ते पन्नास लाखाच्या घरात लिलाव केले जातात. तर मग, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये किती पैसा गुंतवावा लागत असेल. याची कल्पनाच न केलेली बरी. आणि, इतक्या मोठ्या रकमा देऊन लिलाव घेतले जातात. तर मग, ते पैसे व्याजासहित वसूल होण्यासाठी. भाविक मंडळी तिथे थांबलीच पाहिजे. भाविक जास्तीकाळ थांबले नाहीत, तर यांचे धंदे तरी कसे होणार..?
दुसरं तिसरं काही नाही, फक्त हे एकमेव आर्थिक कारण आहे. ज्यामुळे, भाविक लोकांना तिथे वेठीस धरलं जात आहे. पण खरं सांगतो, हे चांगलं नाहीये. नाही म्हणता, काही लोकांना या गोष्टी लगेच समजतात, आणि पर्यायाने ते भाविक इथे येनं टाळतात. आणि त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे, हल्लीच माझ्या ऐकण्यात आलं आहे. कि, बालाजीच्या दरवर्षी होणाऱ्या उत्पन्नात हल्ली बरीच घट येत चालली आहे.
नाभिक ( न्हावी ) लोकांचा विषय तर फारच निराळा आहे.
बालाजीला येणारा जवळपास प्रत्येक भाविक आपली डोक्यावरील केसं देवाला अर्पण करत असतो. पुरुषांचा विषय सोडा, पण या धार्मिक कामात स्त्रिया सुधा बिलकुल मागे नसतात.
यामागचं मुख्य कारण म्हणजे, या जगात सौंदर्या सारखं दुसरं दान नाही.
डोक्यावरील केस म्हणजे, स्त्री आणि पुरुषांची सुंदरता असते. त्यामुळे, सर्वात मोठा त्याग किंवा दान म्हणजे आपली केस असतात. ( यामुळेच, आपले आईवडील गेल्यावर. आपण त्यांना आपल्या डोक्यावरील केसं अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतो. ) नाही म्हणता, या केसांपासून सुद्धा बालाजी देवस्थानाला भरपूर मिळकत होत असते.
आजपर्यंत.. भारतवर्षात कमीतकमी नोकरीचे तास म्हणजे आपण आठ तास मानतो. पण बालाजी देवस्थानात या नाभिक लोकांना फक्त सहा तासांची ड्युटी आहे. इथे केस कापण्यासाठी, दिवस आणि रात्रीतील चार पाळ्यांमध्ये काम चालत असतं. त्यामुळे, साहजिकच बऱ्याच व्यक्तींना तिथे रोजगार मिळाला आहे. यावेळी तर, प्रथमच मला तिथे नाभिक महिला सुद्धा दिसून आल्या.
सहा तासामध्ये.. एक नाभिक साधारणपणे, सत्तर ते ऐंशी लोकांचं मुंडन करतो. आणि मुंडन करणाऱ्या प्रत्येक भाविकाडून " ख़ुशी ख़ुशी " म्हणत. तो कमीतकमी वीस रुपये तरी नक्कीच मिळवतो. म्हणजे, नाही म्हणता एक नाभिक दिवसाला कमीतकमी हजार ते दीड हजार रुपये वर कमाई करतो. शिवाय त्याला मिळणारा पगार वेगळाच.
या नाभिक मंडळींना सुद्धा, देवस्थानाकडून सुरवातीलाच चाळीस पन्नास हजार रुपयांच्या घरात पगार आहेत. खरं सांगायला गेलं तर. हि नाभिक मंडळी सुद्धा कामाला लागताना. काहीतरी चिरीमिरी देऊनच कामाला लागत असतील. यात बिलकुल शंका नाही.
हि नाभिक मंडळी, मुंडन करणाऱ्या भाविकाने पैसे दिले तरच अगदी व्यवस्थितपणे त्याचं केशवपन करतात. नाहीतर, पैसे न दिल्यास. त्या भाविकाच्या डोक्यावर वस्तऱ्याने दोनचार वार तरी ते नक्कीच करतात. खरं सांगायला गेलं तर, सगळेच सारखे नसतात. पण त्यातील काही नाभिक. हि, वरकमाई घेणं टाळताना सुद्धा मी पाहिलं आहे. पण, अशा प्रामाणिक लोकांची संख्या तिथे फारच कमी आहे.
प्रसादाच्या लाडूच्या बाबतीत सुद्धा तेच.
देवस्थाना मार्फत, एका भाविकाला दर्शनपास मागे दोन लाडूंचा प्रसाद मिळत असतो. ते दोन लाडू काही आपल्याला पुरेसे पडत नाहीत. मग त्याच ठिकाणी आपल्याला एक नवीन एजंट भेटतो. आणि.. ऐंशी ते शंभर रुपयां पर्यंत एक लाडू. असे, हवे तितके लाडू तो आपल्याला देऊ करतो.
हे सुद्धा, देवस्थानाच्या आतील कामगारांचे आणि या एजंट लोकांचे लागेबांधे असल्याशिवाय होऊ शकतं का..? त्यामुळे, दोन पाच वर्षांपूर्वी देवस्थाना मार्फत पन्नास रुपयाला एक लाडू, याप्रमाणे हवे तितके लाडू भाविकांना द्यायला त्यांनी सुरवात केली होती.
पण, अवघ्या दोन तीन वर्षातच हि योजना बंद पडली. आता, हि योजना बंद पडण्यामागे नेमकं काय गौडबंगाल असेल..? ते मात्र मला कधीच समजलं नाही.
यंदा.. माझ्या काही मित्रांनी, ऐंशी रुपयाला एक असे हवे तितके लाडू त्या ठिकाणाहून काळ्या बाजारात खरेदी केले. पूर्वी प्रसाद म्हणून मिळणारा लाडू, अक्षरशः दोन हातात मावत नव्हता.पण आता मिळणारा लाडू एका हातात सहज मावून जातो.
आपण धार्मिक लोकं, देवाचा पैसा कसा लाटावा..?
या विचाराने असं दुष्कृत्य कधीच करणार नाही. कारण आपल्या मनामध्ये एक धार्मिक भीती दडून बसलेली असते. आणि ते खरं सुद्धा आहे. कारण परमेश्वराच्या लाठीमध्ये आवाज नसतो. तो अशा लोकांना बरोबर शासन करत असतो. तरी सुद्धा पैशाला हपापलेली लोकं अशा गोष्टी करायला बिलकुल मागेपुढे बघत नाहीत.
शेवटी.. " करावे तसे भरावे " हा नियम कोणालाच चुकला नाही.

समाप्त 

ll विना वेंकटेशा ननाथो ननाथा, सदा वेंकटेशा स्मरामि स्मरामि ll

No comments:

Post a Comment